कौटुंबिक हिंसाचार व प्रतिबंधक कायदे

स्त्रियांच्या होणाऱ्या कौटुंबिक छळास प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 व नियम 2006 संपूर्ण भारतात 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू केला. कायद्याची माहिती नसेल तर त्याचा पीडित महिला लाभ घेवू शकत नाही. कौट़ुंबिक हिंसाचार कशास म्हणावे हे सर्वसामान्यांना समजावे एवढयासाठीच हा अल्पसा प्रपंच.

वास्तविक स्त्री ज्या परिवारासोबत वा साथीदारासोबत एकाच छताखाली रहात असेल आणि तिचा छळ त्या पुरुषाकडून होत असेल तर ती कौटुंबिक हिंसाचार कायद्यान्वये न्यायदंडाधिकाऱ्याकडे संरक्षण मागू शकते. थोडक्यात पीडित महिला व तिच्या मुलांना निवासाच्या अधिकारासह तिच्या सुरक्षितेचा, आर्थिक संरक्षणाचा आदेश न्यायदंडाधिकारी देवू शकतात. छळापासून संरक्षण मग ते शारीरिक, लैंगिक, आर्थिक, तोंडी किंवा भावनिक अत्याचार असोत महिलांना त्याविरुध्द न्याय मागता येतो.

कौटुंबिक हिंसाचार म्हणजे शारीरिक, शाब्दिक, लैंगिक, मानसिक किंवा आर्थिक छळ, हुंडा किंवा मालमत्ता देण्यासाठी महिलेला अपमानित करणे, तिला शिवीगाळ करणे, विशेषत: अपत्य नसल्यामुळे तिला हिणवणे किंवा धमकावणे, त्रास देणे, दुखापत करणे, जखमी करणे किंवा पीडित महिलेचा जीव धोक्यात आणण्यास भाग पाडणे किंवा तिच्या कोणत्याही नातेवाईकाकडे हुंडयाची मागणी करणे व या सर्व गोष्टींचा दुष्परिणाम पीडित व्यक्ती अथवा तिच्या नातेवाईकांवर होणे तसेच आर्थिक छळ करणे म्हणजे महिलेचे स्वत:चे उत्पन्न, स्त्रीधन, मालमत्ता किंवा इतर आर्थिक व्यवहार किंवा तिच्या हक्काच्या कोणत्याही मालमत्तेपासून तिला वंचित करणे, घराबाहेर काढणे या बाबींना कौटुंबिक हिंसाचार म्हटले जाते.

शारीरिक छळात मारहाण, तोंडात मारणे, तडाखा देणे, चावणे, लाथ मारणे, गुद्दे मारणे, ढकलणे, लोटणे (जोराचा धक्का मारणे), इतर कोणत्याही पध्दतीने शारीरिक दुखापत किंवा वेदना देणे. या बाबींचा शारीरिक छळात समावेश होतो.
लैंगिक अत्याचारामध्ये जबरदस्तीने समागम करणे, अश्लिल फोटो काढणे, बिभत्स कृत्य जबरदस्तीने करावयास लावणे, तुमची समाजातील किंमत कमी होईल या दृष्टीने अश्लील चाळे करणे किंवा तुमची बदनामी करणे किंवा अनैसर्गिक अश्लिल कृत्य करणे याबाबींचा समावेश होतो.

तोंडी आणि भावनिक अत्याचार जसे अपमान करणे, वाईट नावाने बोलावणे, चारित्र्याबद्दल संशय घेणे, मुलगा झाला नाही म्हणून अपमान करणे, हुंडा आणला नाही म्हणून अपमान करणे. महिलेला किंवा तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला शाळेत, महाविद्यालयात किंवा इतर शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यास मज्जाव करणे, नोकरी स्वीकारण्यास व करण्यास मज्जाव करणे, स्त्रीला व तिच्या ताब्यात असलेल्या मुलाला घरामधून बाहेर जाण्यास मज्जाव करणे, नेहमीच्या कामासाठी कोणत्याही व्यक्तीबरोबर भेटण्यास मज्जाव करणे, महिलेला विवाह करावयाचा नसल्यास विवाह करण्यास जबरदस्ती करणे, महिलेच्या पसंतीच्या व्यक्ती बरोबर विवाह करण्यास मज्जाव करणे, त्याच्या अथवा त्यांच्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर विवाह करण्यास जबरदस्ती करणे, आत्महत्येची धमकी देणे इतर कोणतेही भावनात्मक किंवा तोंडी अपशब्द वापरणे यांचा समोवश होतो.

आर्थिक अत्याचारात हुंडयाची मागणी करणे, महिलेच्या किंवा तिच्या मुलांचे पालन –पोषणासाठी पैसे न देणे, महिलेला किंवा तिच्या मुलांना अन्न, वस्त्र, औषधे इत्यादी न पुरविणे, नोकरीला मज्जाव करणे, नोकरीवर जाण्यासाठी अडथळा उत्पन्न करणे, नोकरी स्वीकारण्यास संमती न देणे, पगारातून रोजगारातून आलेले पैसे काढून घेणे, महिलेला तिचा पगार, रोजगार वापरण्यास परवानगी न देणे, राहात असलेल्या घरातून हाकलून देणे, घराचा कोणताही भाग वापरण्यास किंवा घरात जाण्यास, येण्यास अडथळा निर्माण करणे, घरातील नेहमीचे कपडे, वस्तू वापरण्यापासून रोखणे, भाड्याच्या घराचे भाडे न देणे या बाबींचा समावेश होतो.

स्त्रीचा जन्मच मुळी अत्याचार सोसण्यासाठी झाला आहे अशी आपल्या समाजाची धारणा आहे. या धारणेला गरीब, श्रीमंत, जात,धर्म, पंथ, शिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, नोकरीवाली, बिगरनोकरीवाली असा कुठलाही अपवाद नाही. स्त्री- पुरुष समानता ही बाब आपल्याकडे केवळ आपण आधुनिक विचारणीचे आहोत हे दाखविण्यापुरतीच मर्यादीत आहे. वास्तव नेमके याच्या उलट आहे. भारतीय संविधानाच्या कलम 14 नुसार भेदभावापासून मुक्ती, कलम 15 अन्वये स्त्री पुरुष समानता आणि कलम 21 अन्वये जीवित व स्वातंत्र्याचे संरक्षण करण्याचा हक्क महिलांनाही दिला आहे. तरीही महिला कौटुंबिक हिंसाचारास बळी पडतात. त्यांची प्रतिष्ठा सांभाळली जात नाही. समाजसुधारक, विचारवंतही आपल्या समाजाचे पूर्ण मानसिक परिवर्तन करु शकलेले नाहीत. समाज सुधारणा करण्यासाठी केवळ प्रबोधन पुरेसे नसते. दंडशक्तीही तितकीच महत्वाची आहे, म्हणून कौटुंबिक हिंसचारास प्रतिबंध करणारा हा कायदा केंद्र सरकारने केला.

या कायद्याद्वारे पीडित महिलेला न्याय, संरक्षण मिळू शकते. या कायद्याच्या आधारे पीडित महिला तिच्या अथवा तिच्या मुलांविरुध्द होणारे अत्याचार थांबवू शकते. स्त्रीधन, दागदागिने, कपडे इत्यादींवर ताबा मिळवू शकते. संयुक्त खाते अथवा लॉकर हिंसा करणाऱ्या पुरुषास वापरण्यास प्रतिबंध करु शकते. स्त्री ज्या घरात राहत असते ते घर सोडावे लागणार नाही. हिंसाकारी पुरुषास स्त्री राहात असलेले घर विकण्यास प्रतिबंध करु शकतो. वैद्यकीय उपचाराचा खर्च मागू शकतो भावनिक व शारीरिक हिंसाचाराबद्दल नुकसान भरपाई स्त्रीला मागता येते.

त्याचप्रमाणे पीडित महिलेला मोफत कायदेविषयक केंद्राद्वारे सल्ला, सेवा पुरविणाऱ्या संस्था, वैद्यकीय सुविधा, निवासगृह इत्यादी मधून आवश्यक त्या सेवा सुविधा प्राप्त करुन घेता येतात. भारतीय दंड संहिता 498 अ कलमाखाली पोलिसात तक्रार दाखल करता येते. त्याचप्रमाणे भारतीय दंडसहितेच्या कलम 125 अंतर्गत मिळणाऱ्या पोटगी व्यतिरिक्त, अतिरिक्त पोटगी, स्वत:साठी तसेच स्वत:च्या अपत्यासाठी मागता येते.

या कायद्यांतर्गत कौटुंबिक हिंसाचाराने पीडित पत्नी, सासू, बहिण, मुलगी, अविवाहित स्त्री, आई, विधवा इत्यादी म्हणजे लग्न, रक्ताचे नाते, लग्न सदृश्य संबंध (लिव्ह इन रिलेशनशीप), दत्तकविधी अशा कारणाने नाते संबंध असणाऱ्या व कुठल्याही जाती धर्माच्या स्त्रिया तसेच त्यांची 18 वर्षाखालील मुले दाद मागू शकतात.या कायद्यांतर्गत छळ होत असलेली किंवा झालेली स्त्री सरंक्षण अधिकाऱ्याला, सेवा पुरविणाऱ्या संस्थांना, तसेच पोलीस स्टेशन किंवा दंडाधिकाऱ्याकडे तोंडी किंवा लेखी तक्रार करु शकते.

आकाश जगधने

बचतगटाने साकारला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग

बचतगटाच्या महिला उद्योग स्थापनेत मोठ्या प्रमाणावर पुढे येत असून पारंपारीक गृह उद्योगांपलीकडे महिला झेप घेत आहे. पारंपारीक घरगुती खाद्यपदार्थ्यांच्या पुढे जावून पुरुषांच्या बरोबरीने महिला उद्योगांची कास धरीत आहे.

यवतमाळ शहरालगत असलेल्या उमरसरा येथील एका बचतगटाने तर सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग सुरु केला आहे. या बचतगटाच्या महिला केवळ उद्योग स्थापन करुन थांबल्या नाहीत तर या उद्योगात त्यांनी नेत्रदिपक प्रगती करुन इतर महिलांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

क्रांतीजोती सावित्रिबाई फुले महिला बचतगट असे गटाचे नाव असून पाच वर्षापूर्वी 10 महिलांनी मिळून या बचतगटाची स्थापना केली. प्रत्येकी 50 रुपये मासिक बचतीतून महिलांनी या उद्योगात भरारी घेतली आहे. पारंपारीक वस्तूंच्या निर्मीतीपलिकडे विचार करुन या महिला आज महिन्याला दोन हजारावर सिएफएल बल्बची निर्मीती करुन त्याची विक्री करतात. बीए शिक्षण झालेल्या सुषमा फुलकर या महिलेच्या संकल्पनेतून हा उद्योग सुरु झाला. श्रीमती फुलकर यांचा मुलगा पुण्याला इंजिनिअरींगचे शिक्षण घेत असतांना तो ज्या इमारतीत राहायचा त्या ठिकाणी महिला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग करायच्या. एकदा त्यांच्या मुलाने या उद्योगाबद्दल त्यांना सांगितले. त्यांनी तो उद्योग प्रत्यक्ष पाहिल्यानंतर तसा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. सीएफएल बल्बची कल्पना डोळ्यासमोर ठेवून सुषमा फुलकर यांनी पुणे येथे यशदाच्या प्रशिक्षण केंद्रात बल्ब निर्मीतीचे प्रशिक्षण घेतले. पुणे येथे या बल्बची निर्मीती करीत असलेल्या महिलांकडूनही त्यांनी या उद्योगाबाबत जाणून घेतले. त्यानंतर त्यांनी बचतगटाच्या अन्य महिलांनाही याचे प्रशिक्षण दिले. आज गटातील अन्य महिलांच्या सहकार्याने हा उद्योग यशस्वीपणे उभा राहीला आहे.

बल्बसाठी लागणाऱ्या कच्च्या वस्तू व बल्ब निर्मीतीसाठी लागणारी मजूरी पकडून एकून एका बल्बसाठी 40 रुपये खर्च येतो. बाजारात हा बल्ब 80 रुपयाला विकल्या जातो. उद्योगासाठी बचतगटाने जुलै 2011 मध्ये 1 लाख रुपयाचे कर्ज घेतले होते. काही महिन्यातच गटाने कर्जाची परतफेड केली असून महिन्याकाठी 15 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न गटाला होत असल्याचे सुषमा फुलकर यांनी सांगितले. बचतगटाच्यावतीने उत्पादीत या बल्बची 1 वर्षाची गॅरंटीही दिली जाते. या दरम्यान बल्ब खराब झाल्यास दुरुस्त किंवा बदलुन देण्याचे सोयही करुन देण्यात आल्याने ग्राहकांकडून या बल्बला विशेष मागणी आहे. गटाच्या नावाने यवतमाळ शहराच्या मध्यवस्तीत डा. टि.सी.राठो रूग्णालयाजवळ बल्ब विक्रीचे दुकानही सुरु करण्यात आले आहे. येत्या काळात बल्ब निर्मीतीच्या व्यवसायाला व्यापक स्वरुप दिल्यानंतर लाखो रुपयाची उलाढाल होणार असल्याची प्रतिक्रीयाही श्रीमती फुलकर यांनी व्यक्त केली.

मंगेश वरकड

बचतगटाने साकारला सिएफएल बल्ब निर्मीतीचा उद्योग

राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन प्रयत्नशील आहे. या समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी सामाजिक न्याय विभाग विविध योजना विभागामार्फत विविध योजना राबविण्यात येतात. पण त्याचबरोबर मागासवर्गीय वर्गातील युवक व युवतींना पोलिस व सैन्यदलात भरतीसाठी संधी मिळावी यासाठी त्यांना भरतीपूर्व प्रशिक्षण योजनाही या विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेचा अधिकाधिक लाभ घेण्यास त्यांना मदत व्हावी याकरिता माहिती देण्यात येत आहे.

राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जाती व नवबौद्ध् घटकांच्या लोकसंख्येमध्ये सुमारे 15 ते 20 लाख अनुसूचित जाती आणि नवबौद्ध् घटकांतील सुशिक्षित बेरोजगार लोकांची संख्या आहे. अनुसूचित जाती व नवबौद्ध् घटकातील युवकांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव असल्यामुळे बऱ्याचवेळा हे युवक सक्षम असतानादेखील त्यांना सैन्य व पोलीसदलात भरतीसाठी संधी मिळत नाही. ही उणीव भरुन काढण्यासाठी या युवकांना राज्य पोलीस व सैन्य दलातील अनुशेषांतर्गत संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने आदिवासी विभागामार्फत चालविल्या जाणाऱ्या सेवापूर्वक प्रशिक्षण केंद्राप्रमाणेच सामाजिक न्याय विभागातर्फे सैन्य व पोलीस दलात भरती सेवापूर्व प्रशिक्षण केंद्र सन 2006 पासून सुरु करण्यात आली आहेत.

या योजनेमध्ये प्रशिक्षण सत्राचा कालावधी तीन महिन्याचा असून राज्यातील सर्व प्रमुख सैन्य व पोलिस भरती प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांमार्फत हे प्रशिक्षण देण्यात येते. तसेच या प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांची निवड समाजकल्याण संचालक पुणे यांच्यामार्फत करण्यात येते. प्रशिक्षणाच्या तीन महिन्याच्या कालावधीत उमेदवाराची रहाण्याची सोय प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेमार्फत करण्यात येते. एका प्रशिक्षण सत्रात 100 युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात येते. प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करताना पात्र उमेदवारांची यादी जिल्हा सेवायोजन कार्यालयाकडून मागविण्यात येते व त्यातील उमेदवारांची निवड विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यामार्फत करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. या योजनेंतर्गत प्रशिक्षण घेणाऱ्या युवक, युवतींना जेवण, रहाणे, खेळाचे साहित्य, बूट, मोजे, अंथरुण इ. सुविधा मोफत पुरविल्या जातात.

योजनेच्या अटी आणि शर्ती
उमेदवार हा अनुसूचित जातीं व नवबौद्ध् घटकातील असणे आवश्यक आहे. उमेदवाराचे वय 18 ते जास्तीतजास्त 25 वर्षे, शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वीं पास उत्तीर्ण, शारी?रिक पात्रता - युवकाची उंची 165 सें.मी., छाती 79 सें.मी. फुगवून 84 सें.मी. युवतीची उंची 155 सें.मी. आवश्यक आहे. जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, सेवायोजन कार्यालय अंतर्गत नाव नोंदणी दाखला व ओळख पत्राची सत्यप्रत देणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार शारी?रिकदृष्ट्या निरोगी व सक्षम असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणाचे स्वरुप
प्रशिक्षण कालावधीत धावणे, उंच व लांब उडी, गोळा फेक, पुल अप्स, अडथळा शर्यत, दोरीवरुन चढणे, मंकी रोप, बैठका, चीनअप, पद कवायत, रायफल फायरिंग, गिर्यारोहन इ. मैदानी चाचणीचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण देण्यात येते. या व्यतिरिक्त सामान्य ज्ञान, मानचित्र अध्ययन, अग्नीशमन, वहातूक नियंत्रण प्रशिक्षण, प्रथमोपचार, स्वास्थ्य शिक्षा, वायरलेस कम्युनिकेशन, व्यक्तिमत्व विकास, आपत्ती निवारण व्यवस्थापन, मुलाखत कौशल्य या बाबत प्रशिक्षण दिले जाते.

अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी संबंधित विशेष जिल्हा समाज कल्याण  अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

विशेष जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांचे दूरध्वनी क्रमां
मुंबई (022)25275073,    मुंबई उपनगर (022) 25222023,              ठाणे (022) 25341359,                            रायगड (02141) 222288, रत्नागिरी (02352)230957, सिंधुदुर्ग (02362) 228882, नाशिक (0253)2412203, धुळे (02564), नंदूरबार (02564)226310, जळगांव (0257) 2263328, अहमदनगर (0241) 2329378, पुणे (020) 24456336, सातारा (02162) 234246, सांगली (0233)2374739, सोलापूर (0217)2734950,कोल्हापूर (0231)2651318, औरंगाबाद (0240)2331993,जालना (02482) 225172, परभणी (02452)220595,हिंगोली (02456)223702, बीड (02442)222672, नांदेड (02462) 224477, उस्मानाबाद (02472)222014,लातूर (02382) 258485, बुलढाणा (07262) 242245, अकोला (0724)2426438, वाशिम (07252)235399, अमरावती (0721)2661261, यवतमाळ (07232) 242035, वर्धा (01752) 243331,नागपूर (0712) 2555178, भंडारा (07184) 252608,गोंदिया (07182)234117, चंद्रपूर (07172)253198, गडचिरोली (07132)222329.

मुक्ता पवार
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India