टिटवाळ्याचा महागणपती आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ठाणे जिल्ह्याचे वैशिष्ट्य

ठाणे परिसरास तब्बल दोन हजार वर्षाहून अधिक काळचा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. सात वाहनांपासून शिल्पहारांपर्यंत अनेक राजवटींच्या खुणा ठाणे जिल्ह्यात सर्वत्र आढळून येतात. जिल्ह्यातील होणारे, कुलियात ही बंदरे (नालासोपारा, कल्याण) इसवी सनापूर्वीपासून प्रचलित आहेत. मुंबईलगत असल्याने ठाणे जिल्ह्याचे झपाट्याने नागरीकरण होत आहे. देशात सर्वात वेगाने नागरीकरण होणारा प्रदेश अशी ठाणे जिल्ह्याची ओळख आहे. गेल्या वर्षी झालेल्या जनगणनेच्या आकडेवारीनुसार ठाणे हा देशातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा जिल्हा ठरला आहे. डोंगरी भाग, सागर आणि खाडीकिनारे, राज्यातील सर्वाधिक आदिवासींचे वास्तव्य तसेच विस्तारीत मुंबईचे वाढते नागरीकरण अशी विविधता हे जिल्ह्याचे ठळक वैशिष्ट्य आहे. अशा या ऐतिहासिक जिल्ह्यात पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे.
अनेक उत्तम प्रकारची पर्यटनस्थळे येथे आहेत. त्यांची माहिती घेऊ या.
येऊर
मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवलीचे एवढे मोठे जंगल हे जगातील एकमेव उदाहरण आहे. या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग ठाण्यात मोडतो. अर्थात पूर्वी बोरीवलीपर्यंतचा परिसर ठाणे जिल्ह्याचाच एक भाग होता. ठाणे शहरातील उपवन येथून येऊरकडे जाणारा रस्ता आहे. शहराच्या अगदी जवळ घनदाट अरण्य पाहून पर्यटक आश्चर्यचकित होतात. येऊर हे एक आदिवासी खेडे आहे. याच परिसरात हवाई दलाचे एक केंद्रही आहे. विविध प्रकारच्या वनस्पतींनी हे जंगल समृद्ध असून येथे बिबटे, हरीण, काळवीट, मोर, ससे, कोल्हे, रानडूक्कर, सांबर, मगर आदी सर्व प्रकारचे प्राणी आढळून येतात. संजय गांधी उद्यानाच्या 110 कि.मी. जंगलापैकी 40 किलोमिटरचा परिसर येऊरमध्ये मोडतो. येथे विवेकानंद आश्रम, आयुर्वेद पंचकर्म केंद्रही आहे.

ठाणे रेल्वे स्थानकालगत येऊरकडे जाणारी बस ठराविक अंतराने सुटते. पाटोणपाड्यापर्यंत बसने येऊन पुढे जंगलात चालत जावे लागते. एका दिवसाच्या जंगल सफारीसाठी येऊर एक उत्तम ठिकाण आहे.
टिटवाळ्याचा महागणपती
मुंबईतील सिद्धीविनायक अथवा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा येथील महागणपतीची ख्याती सर्वदूर पसरलेली आहे. पौराणिक देवकथेनुसार या मंदिरात शकुंतला आणि दुष्यंत यांचा गंधर्व विवाह झाल्याचे मानले जाते. चिमाजी आप्पांनी वसई किल्ला जिंकल्यानंतर हे मंदिर बांधले, हा इतिहास आहे. संकष्टी, अंगारकी तसेच मंगळवारी येथे भाविक मोठ्या संख्येने येतात.

मध्य रेल्वेवरील कसारा मार्गावर टिटवाळा हे उपनगरी रेल्वे स्टेशन असून तिथून हे मंदिर तीन किलोमीटर अंतरावर आहे. रेल्वे स्थानकापासून भाविकांची ने-आण करण्यासाठी रिक्षा आणि टांगे उपलब्ध आहेत.
मलंगगड
ठाणे जिल्ह्यात कल्याणपासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंगगड हा महाराष्ट्रातील सर्वात प्राचीन किल्ल्यापैकी एक मानला जातो. सह्याद्रीच्या अगदी अखेरच्या डोंगररांगेत असणारा किल्ला निसर्गप्रेमी, गिर्यारोहक आणि भाविकांचे आवडते ठिकाण आहे. गडावर मलंगबाबाचा दर्गा असून हिंदू -मुस्लिम धर्माचे भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांच्या सोयीसाठी याठिकाणी ट्रॉलीसेवा सुरु करण्यात येणार आहे. यापुढे पायऱ्या चढण्या-उतरण्याचा त्रास वाचेल. दरवर्षी माघ महिन्यातील पौर्णिमेला गडावर यात्रा भरते. त्यावेळी हजारो भाविक येथे येत असतात.

कल्याण रेल्वे स्थानकाजवळून ठराविक अंतराने मलंगगडासाठी बससेवा उपलब्ध आहे.
सिंहगड
मुरबाड तालुक्यात दक्षिण-पूर्वेला 16 किलोमीटर अंतरावर सिंहगड आहे. 1942 च्या ब्रिटीशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यात हुतात्मा भाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी गामा पाटील या क्रांतिवीरांच्या बलिदानाने पावन झालेला हा परिसर निसर्गरम्य आहे. आताही हा परिसर निर्मनुष्य आहे. 1942 च्या चलेजाव आंदोलनात या क्रांतिकारकांनी गनिमी काव्याने इंग्रजांना सळो की पळो करुन सोडले. ब्रिटीश सैनिकांनी कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पकडण्यासाठी विशेष मोहिम राबवली. तेव्हा कोतवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सिंहगडाचा आश्रय घेतला. अखेर फितुरीमुळेच ब्रिटिशांना त्यांचा ठावठिकाणा कळला. या बलिदानाचे स्मरण करण्यासाठी दरवर्षी ठाणे-मुंबई परिसरातून इतिहासप्रेमी-गिर्यारोहक येतात.

कसे जाल :

सिंहगडला जाण्यासाठी मुरबाडहून धसईमार्गे उचलेगाव अथवा कल्याण-धसई बससेवा उपलब्ध आहे. मुरबाड तालुक्यातच म्हसा गावापासून 14 किलोमीटर अंतरावरील देहरी गावाजवळ सातवाहन काळाची आठवण करुन देणारा गेारक्षगड आहे. त्यालगत असणारा दुसरा सुळका म्हणजे मच्छिंद्रगड, गोरक्षगडाच्या पोटात एक विशाल गुहा असून तिथे पाण्याचे टाकही आहेत. पर्यटक या गुहेत मुक्कामही करु शकतात. तिकडे जंगलामुळे हा परिसर पर्यटकांना भुरळ घालतो.
अंबरनाथचे शिवमंदीर
इ.स. 800 ते 1200 या कालावधीत अपरान्त म्हणजे आताच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्यात शिलहार राजांची सत्ता होती. शिलहार राजा शिवभक्त असल्याने त्यांनी त्यांच्या राज्यात 12 शिवमंदीरे बांधल्याचा उल्लेख सापडतो. त्यातील अनेक मंदिरे आता भग्न अवस्थेत असली तरी ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथील शिलहारकालिन शिवमंदीर तत्कालिन स्थापत्य आणि शिल्पकारांची साक्ष देत अजूनही उभे आहेत. मंदिरातील शिलार लेखातील उल्लेखानुसार इ.स. 1050 मध्ये या मंदिराची उभारणी पूर्ण झाली. या मंदिराने 954 व्या वर्षात पदार्पण केले आहे. या मंदिरावरील अप्रतिम कलाकसुरी डोळ्याचे पारणे फेडणारी आहे. मध्य रेल्वेवरील अंबरनाथ रेल्वे स्थानकापासून पूर्व विभागात मंदिराकडे जाण्यासाठी रिक्षा उपलब्ध असतात.
काकोळे तलाव
अंबरनाथमध्ये मंदीर पाहण्यासाठी दिवसभराची वेळ काढून आलात तर जांभिवली गावाजवळील काकोळे तलावास अवश्य भेट द्या. कल्याण रेल्वे स्थानकाला पाणीपुरवठा व्हावा यासाठी ब्रिटिश काळात येथील तलावावर धरण बांधण्यात आले. त्यावेळी रेल्वेमार्ग उभारणीचे कंत्राट घेतलेल्या ग्रेट इंडियन पेनेन्सुला अर्थात जी.आय.पी. कंपनीनेच हे धरण बांधले. त्यामुळे याठिकाणास जी.आय.पी.टॅंक अथवा जांभुळतळा असेही म्हटले जाते. या तळ्याकाठी पूर्वी आढळणारी गर्द वनराई आता नामशेष झाली असली आणि तळ्याभोवती औद्योगिकरणाचा विळखा पडत असला तरीही अजूनही या तळ्याचे सौंदर्य अबाधित आहे.
शहाडचे बिर्ला मंदीर
कल्याणहून रेल्वेने टिटवाळ्याला जाताना वाटेत शहाड स्थानक लागते. येथे बिर्ला उद्येाग समूहाचा सेंच्युरी रेयॉन हा कारखाना आहे. याठिकाणी कंपनीने एक सुरेख विठ्ठल मंदिर बांधले आहे. बिर्ला मंदिर या नावाने ओळखली जाणारी ही वास्तू भव्य आहे. शिर्डी-शनि शिंगणापूरप्रमाणे भाविकांना टिटवाळा आणि बिर्ला मंदिरास एकाच फेरीत भेट देता येते.
माळशेज घाट
कल्याण नगर रस्त्यावर माळशेज घाट आहे. आतापर्यंत पावसाळी पर्यटनस्थळ म्हणून प्रचलित असले तरी लवकरच महाबळेश्वर आणि माथेरानप्रमाणेच एक बारमाही थंड हवेचे ठिकाण म्हणून विकसित होत आहे. एम.टी.डी.सी. आणि वन विभागाने घाट परिसरात विकासकामे हाती घेतली असून त्यातून पर्यटकांना सोयी उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. पावसाळ्यात दाट धुक्याची शाल वापरलेला हा डोंगर-दऱ्यांचा परिसर पर्यटकांना अक्षरश: वेड लावतो. आता घाटात पर्यटकांसाठी खास पॅाईंट केले जात आहेत. पर्यटकांच्या वाहनांसाठी रस्त्यावर दोन ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली आहे.
एमटीडीसीकडून सुविधा
माळशेजच्या टोकावर एमटीडीसीची हॉटेल आणि निवास व्यवस्था असून आता तिथेही अधिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या जात आहेत. एमटीडीसी हॉटेल्सपासून काही अंतरावर एक धरण असून तिथे दरवर्षी फ्लेमिंग पक्षी रशियातून हजारो मैलचे अंतर कापून येतात. माळशेज परिसर पर्यटन विकासाचा एक भाग म्हणून लवकरच मुरबाड तालुक्यातील कितबी येथे पर्यटनग्राम उभारले जात आहे. आदिवासींच्या घाटात राहण्याचा आनंद पर्यटकांना येथे मिळू शकेल. केवळ पावसाळ्यातच नव्हे तर बारमाही माळशेज घाटातील थंड, मोकळ्या हवेचा पर्यटकांना आता लाभ घेता येईल.

फ्लेमिंगोचा थवा आकाशात उडू लागला की त्यांच्या लालरंगाच्या पंखामुळे जणू काही आगीचा लोळच हवेत असल्यासारखे दिसते. म्हणूनच त्यांना मराठीत अग्निपंखी हे नाव आहे. पावसाळ्यात माळशेज घाटातील डोंगर कड्यावरुन पांढऱ्याशुभ्र पाण्याचे धबधबे वाहू लागतात. तीव्र वेगाच्या त्या पाण्याच्या धारेखाली भिजण्याचा आनंद अवर्णनीय असतो. दाट धुके असते.

कसे जाल :कल्याणहून माळशेजमार्गे पुणे अथवा नगर जिल्ह्यात जाणाऱ्या एसटी बस नियमित उपलब्ध आहेत. कल्याणहून अडीच तासात माळशेजला येता येते.

अर्थात ठाणे जिल्ह्यातील यापेक्षा अधिक लहान-मोठी पर्यटन स्थळे आहेत. वर्षांगणिक काही नव्या पर्यटन स्थळांची भर पडत आहे. 21व्या शतकातील शहर अशी ख्याती असणाऱ्या नवी मुंबई परिसरातील गवळीदेव आणि पांडवकडा हे दोन धबधबे पावसाळी पर्यटकांचे विशेष आवडीचे आहेत. नवी मुंबईतील महापे नाक्यापासून रिक्षाने 15 मिनिटात गवळीदेव धबधब्यांपर्यंत पोहोचता येते. पांडवकडा धबधबा कोकणभवन परिसरात आहे. भारती विद्यापीठामागील डोंगरावरुन हा धबधबा कोसळतो, नवी मुंबईतील खारघर रेल्वे स्थानकात उतरुनही या धबधब्याकडे जाता येते.

ठाणे जिल्ह्याची सीमा असणाऱ्या वांगणी तसेच माथेरानच्या वाटेवरही पावसाळ्यात अनेक धबधबे दिसतात. गर्दींची ठिकाणे सोडून शांत ठिकाणी येऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांना हा परिसर खुणावतो. बदलापूर जवळील भोज गावाजवळचे कुंडेश्वर हे ठिकाणही सहलीसाठी आदर्श आहे.

संकलन- जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे.

महाराष्ट्रातले चेरापुंजी : पालघर जिल्ह्यातील जव्हार

मुंबई शहरापासून अवघ्या काही अंतरावर असलेला पालघर जिल्हा हा निसर्ग सौंदर्याने नटलेला जिल्हा आहे. नागरी, डोंगरी आणि सागरी अशा तिनही प्रकारची भौगोलिक परिस्थिती असलेला हा जिल्हा आहे. अप्रतिम निसर्ग सौंदर्याचे वरदान या जिल्ह्याला लाभलेले आहे.

जव्हार हा खरं तर महाराष्ट्रातला काहीसा दुर्लक्षित, दुर्गम असा भाग. पण, पावसाळ्याच्या दिवसात इथलं वातावरण मनाला अक्षरश: वेड लावतं. दाट धुकं, थंड हवा, तुफान कोसळणारा पाऊस असं धुंद करणार वातावरण इथं पावसाळ्याच्या दिवसात अनुभवायला मिळतं. पालघर जिल्ह्यातील आदिवासी वस्ती असणाऱ्या, पर्यटनस्थळांमध्ये जव्हारचे स्थान अव्वल दर्जाचे आहे. सह्याद्रीलाच संलग्न असलेल्या लहानमोठ्या डोंगर, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी जव्हारचा परिसर व्यापलेला असून जव्हार हे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटरपेक्षाही अधिक उंच आहे.

जव्हारला लागूनच जवळपास मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा यासारखी लहान लहान हिल स्टेशन्स पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मात्र हा सारा परिसर हिरवागार व डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यांनी व लहानमोठ्या धबधब्यांनी ओलाचिंब असतो. यामुळे या ठिकाणाला महाराष्रारहतील चेरापुंजी म्हटलं तर वावगं ठरू नये.

जयविलास पॅलेस:
जव्हार आणि आसपासच्या परिसरात बरीच प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. यापैकी मुख्य म्हणजे जयविलास पॅलेस हा राजवाडा. हा राजवाडा खाजगी मालमत्ता असला तरी भव्यतेवरून त्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येते. राजवाड्यात मुकणे घराण्यातील राजांची सुंदर तैलचित्रे आहेत. याशिवाय जुने दुर्मिळ फर्निचर आणि अन्य वस्तूही येथे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. जव्हार हे वारली पेंटिंगसाठी प्रसिद्ध आहे. अतिशय शांत वातावरणात अरण्यांनी वेढलेले वैशिष्ट्यपूर्ण हवामानाचे ठिकाण होय. आदिवासींचे दैवत असलेले जयविलास आणि भूपतगडचे भग्नावशेष पाहण्यासारखे आहेत.

बाणगंगा:
जव्हारमध्ये जुन्या राजवाड्याजवळ असलेले श्री मुक्तेश्वर महादेव मदिर. या मंदिराजवळ असणाऱ्या एका जिवंत झऱ्याला बाणगंगा म्हणून ओळखले जाते. म्हणून या मंदिराला बाणेश्वर महादेव मंदिर म्हणून देखील ओळखले जाते. संस्थान काळात स्वत: राजे दर शिवरात्रीस महादेवाची महापूजा बांधत असत. या मंदिरातील पूजा-अर्चा राजघराण्याकडून होत असे. कालांतराने इतर मंदिरांसह देवस्थान समितीकडे हे महादेव मंदिर जव्हार नरेशांनी सुपूर्त केले. त्यानंतर २००१ साली या मंदिराचा जीर्णोद्धार जव्हारच्या नागरिकांच्या सहकार्यातून करण्यात आला.

महाशिवरात्री, त्रिपुरारी पौर्णिमा, होळी हे उत्सव या मंदिरात आजही भक्तीभावाने साजरे होतात. श्रावण महिन्यात याठिकाणी दर्शनासाठी अलोट गर्दी होत असते. प्रत्येक श्रावणी सोमवारी मंदिरात होणाऱ्या शिव भक्तीच्या भजनाचे सूर जुन्या राजवाड्यापर्यंत घुमतात आणि या राजवाड्याचा प्रत्येक चिरा शिव महिमा ऐकायला जणू जिवंत होतो. या मंदिरासमोर असलेल्या वृक्षाच्या ढोलीतील खोडला गणपतीच्या सोंडेचा आकार आल्याने या वृक्षासमोर जाताना निसर्गाची ही किमया पाहावयाला पावले आपोआपच थबकतात.

हनुमान पॉईंट:खळाळणारं पाणी, फेसाळत्या पाण्याचे धबधबे, हिरवीगार वनराई हे अनुभवायचं असेल तर इथे येण्याला पर्याय नाही. जव्हारमध्ये प्रवेश करताच अंदाजे ४०० मीटर्स खोली असलेली नारळीदरा ही दरी पहायला मिळते. त्यात अनेक छोटे-मोठे धबधबे वाहत असतात. जव्हारचा हनुमान पॉईंट तर प्रसिद्धच आहे. तिथे उभं राहून सभोवताली नजर टाकल्यास निसर्ग सौंदर्याचा नजराणाच तुमच्यासमोर खुला होतो. अतिशय उत्कृष्ट असा हा पॉईंट आहे. याशिवाय सूर्यास्त पाहण्यासाठी इथला सनसेट पॉईंट प्रसिद्ध आहे.

दाभोसा धबधबा:
जव्हारचं मुख्य आकर्षण म्हणजे दाभोसा धबधबा. तुफान वेगाने कोसळणारं पाणी. या धबधब्यातल्या पाण्याचे तुषारच सुमारे १०० फूट उंचीपर्यंत उडतात. या धबधब्याशिवाय इथे हिरडपाडा धबधबाही आहे. अलीकडेच बांधण्यात आलेलं खडखड धरण लोणावळ्यातल्या प्रसिद्ध भुशी डॅमची आठवण करून देतं. जोरदार पावसाने हे धरण भरुन वाहू लागलं की त्या पाण्यात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटता येतो. पाण्यात भिजण्यासाठी तिथे खास पायऱ्याही बांधण्यात आल्या आहेत. जव्हारपासून सुमारे सहा ते सात किलोमीटरवर हे धरण आहे. इथली आदिवासी आणि वारली संस्कृती प्रसिद्ध आहे.

कसे जाल ?

नजीकचे रेल्वे स्टेशन : इगतपुरी किंवा नाशिक (मध्य रेल्वे.), डहाणू (पश्चिम रेल्वे)
इगतपुरी- जव्हार : ६१ कि.मी.
नाशिक- जव्हार : ८० कि.मी.
डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.
मुंबई-जव्हार (कसारा मार्गे) : १८० कि.मी.

संकलन: 
मनीषा पिंगळे
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर.

रानवाटा...

जाणून घेऊया महाराष्ट्रातील अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने

सुट्टी लागली की आपण सहसा राज्याबाहेरील पर्यटनस्थळे पाहण्याला प्राधान्य देतो... पण वनांनी समृद्ध अशा महाराष्ट्रात अनेक अशी अभयारण्ये आहेत ज्यांना भेट दिल्याशिवाय आपली भ्रमंती पूर्ण होऊ शकत नाही. या रानवाटांवरून जाताना केवळ आपल्या समृद्ध वनांचीच नाही तर या वनांमध्ये वास करणाऱ्या विविध प्राणी, पशु-पक्षी आणि फुलांचीही माहिती मिळते. ही निसर्गसंपदा आपल्याला सुखावून टाकते. आपल्या अशांत मनाला शांत करते. इथे रंगीबेरंगी फुलपाखरं आहेत, इथं आहे वनांचा राजा सिंह, इथे आहेत वाघोबा, इथे आहे गवा आणि हरणे, इथे आहेत चिवचिवाट करणारे असंख्य प्रकारचे पक्षी... वाळलेल्या गवतावरून सरपटणारे प्राणीही आपले लक्ष वेधून घेतात. इथे खळखळाट करणाऱ्या नद्या आहेत, इथे आहे कमालीची शांतता आहे.. तुमच्या श्वासांचीही लय जाणवून देणारी.

कधी अचानक दचकायला लावणारी तर कधी अचानक लक्ष वेधून घेणारी चित्रविचित्र हालचाल ही येथे आहे... शोभेच्या झाडांबरोबर औषधी वनस्पतींचा एक सुंदर खजिना इथे आहे. आकाशाला गवसणी घालणारे वृक्ष आणि दाटीवाटीने उभे राहिलेले बांबू... सगळंच कसं मनोहारी आहे...

महाराष्ट्र... एक असं राज्य जिथे गडकिल्ल्यांचा एक वैभवशाली इतिहास आहे. जिथे ७२० कि.मी लांबींचा सुंदर समुद्र किनारा आहे... जिथे ज्योतिर्लिंग आणि लोकांची असंख्य श्रद्धास्थानं असलेली शक्तीपीठं आहेत, इथे आहे सुंदर वनांचा खजिना... त्यामुळे पर्यटनाच्यादृष्टीने महाराष्ट्रात काय पाहिजे असं जर कुणी विचारलं तर “जो जे वांछिल तो ते लाभो” असं भरभरून देणाऱ्या साऱ्याच गोष्टी या महाराष्ट्रात आहेत. इथे साहसी खेळ प्रकारासाठी असंख्य ठिकाणं आहेत... गावरान मेवा उपलब्ध करून देणाऱ्या आणि आपली रसना तृप्त करणारे असंख्य खाद्य प्रकार आपल्यासाठी उपलब्ध आहेत... अशा या सर्वगुण संपन्नतेने समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातील वनांची आणि अभयारण्यांची माहिती या लेख मालिकेतून देण्याचा प्रयत्न आहे. ही मेजवानी आहे खास आपल्या सर्वांसाठी... चला तर मग जाणून घेऊया राज्यातील अभयारण्याची ही एकत्रित माहिती...

तुम्हाला माहिती आहे ? आपल्या महाराष्ट्रात सहा राष्ट्रीय उद्याने, ४७ अभयारण्ये, चार संवर्धन राखीव क्षेत्र अशी एकूण ५७ वन्यजीव संरक्षित क्षेत्रे आहेत. त्याचे एकूण क्षेत्रफळ १००५४.१३ चौ.कि.मी. म्हणजे राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या ३.२६ टक्के इतके आहे.

राज्यातील १९ संरक्षित क्षेत्रांचा समावेश करून (पाच राष्ट्रीय उद्याने आणि १४ अभयारण्ये) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प, नागपूरचा पेंच व्याघ्र प्रकल्प, अमरावतीचा मेळघाट व्याघ्र प्रकल्प, कोल्हापूरचा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प नवेगाव-नागझिराचा व्याघ्र प्रकल्प आणि बोरचा व्याघ्र प्रकल्प असे सहा व्याघ्र राखीव क्षेत्र तयार करण्यात आले आहेत. यापैकी बोर व्याघ्र प्रकल्पाची कार्यवाही सध्या सुरु आहे.

आता अभयारण्याची ही यादी पहा आणि ठरवा... आपण आपल्या वनांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रातील किती अभयारण्यांना खरंच भेट दिली आहे ?

अ.क्र
अभयारण्य/ राष्ट्रीय उद्यानाचे नाव
जिल्हा
क्षेत्र (चौ.कि.मी)
अंबाबरवा अभयारण्य
बुलढाणा
१२७.११०
अंधारी अभयारण्य
चंद्रपूर
५०९.२७०
अनेर डॅम अभयारण्य
धुळे
८२.९४०
भामरागड अभयारण्य
गडचिरोली
१०४.३८०
भीमाशंकर अभयारण्य
पुणे-ठाणे
१३०.७८०
बोर अभयारण्य
वर्धा-नागपूर
६१.१००
चांदोली राष्ट्रीय उद्यान
सांगली-सातारा-कोल्हापूर-रत्नागिरी
३१७.६७०
चपराळा अभयारण्य
गडचिरोली
१३४.७८०
देऊळगाव-रेहेकूरी अभयारण्य
अहमदनगर
२.१७०
१०
ज्ञानगंगा अभयारण्य
बुलढाणा
२०५.२१०
११
माळढोक अभयारण्य (पुनर्रचित)
सोलापूर-अहमदनगर
१२२९.२४
१२
गौताळा औत्रमघाट अभयारण्य
औरंगाबाद-जळगाव
२६०.६१०
१३
गुगामल राष्ट्रीय उद्यान
अमरावती
३६१.२८०
१४
जायकवाडी पक्षी अभयारण्य
औरंगाबाद-अहमदनगर
३४१.०५०
१५
कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य
अहमदनगर
३६१.७१०
१६
कारंजा-सोहळ काळवीट अभयारण्य
अकोला
१८.३२१
१७
कर्नाळा फोर्ट पक्षी अभयारण्य
रायगड
१२.१५५
१८
काटेपूर्णा अभयारण्य
अकोला
७३.६९०
१९
कोयना अभयारण्य
सातारा
४२३.५५०
२०
लोणार अभयारण्य
बुलढाणा
३.८३१
२१
मालवण सागरी अभयारण्य
सिंधुदुर्ग
२९.१२२
२२
मयुरेश्वर सुपे अभयारण्य
पुणे
५.१४५
२३
मेळघाट अभयारण्य
अमरावती
७८८.७५०
२४
नायगाव मयूर अभयारण्य
बीड
२९.९०१
२५
नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य
नाशिक
१००.१२०
२६
नरनाळा अभयारण्य
अकोला
१२.३५०
२७
नवेगाव राष्ट्रीय उद्यान
गोंदिया
१३३.८८०
२८
नागझिरा अभयारण्य
भंडारा-गोंदिया
१५२.८१०
२९
पैनगंगा अभयारण्य
यवतमाळ-नांदेड
४२४.८९०
३०
पेंच राष्ट्रीय उद्यान
नागपूर
२५९.७१०
३१
फणसाड अभयारण्य
रायगड
६९.७९०
३२
राधानगरी अभयारण्य
कोल्हापूर
३५१.१६०
३३
सागरेश्वर अभयारण्य
सांगली
१०.८७७
३४
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
मुंबई( ठाणे)
८६.९६५
३५
ताडोबा राष्ट्रीय उद्यान
चंद्रपूर
११६.५५०
३६
तानसा अभयारण्य
ठाणे
३०४.८१०
३७
टिपेश्वर अभयारण्य
यवतमाळ
१४८.६३२
३८
तुंगारेश्‍वर अभयारण्य
ठाणे
८५.७००
३९
वान अभयारण्य
अमरावती
२११.००६
४०
यावल अभयारण्य
जळगाव
१७७.५२०
४१
ऐडशी रामलिंगघाट अभयारण्य
उस्मानाबाद
२२.३७४
४२
मानसिंगदेव अभयारण्य
नागपूर
१८२.५८०
४३
नवीन नागझिरा अभयारण्य
गोंदिया-भंडारा
१५१.३३५
४४
नवेगाव अभयारण्य
गोंदिया
१२२.७५६
४५
नवीन बोर अभयारण्य
नागपूर
६०.६९
४६
नवीन माळढोक पक्षी अभयारण्य
उस्मानाबाद
०१.९८
४७
भोरगड संवर्धन राखीव क्षेत्र
नाशिक
३.४९३
४८
उमरेड करांडला अभयारण्य
नागपूर-भंडारा
१८९.२९
४९
कोलामार्का संवर्धन राखीव
गडचिरोली
१८०.७२
५०
ताम्हिनी अभयारण्य
पुणे-रायगड
४९.६२
५१
कोका अभयारण्य
भंडारा
९७.६२४
५२
मुक्ताई भवानी अभयारण्य
जळगाव
१२२.७४
५३
न्यू बोर विस्तारित अभयारण्य
वर्धा
१६.३१
५४
मामडापूर संवर्धन राखीव
नाशिक
५४.४६
५५
प्राणहिता अभयारण्य
गडचिरोली
४२०.०६
५६
सुधागड अभयारण्य
रायगड-पुणे
७७.१२८
५७
ईसापूर अभयारण्य
यवतमाळ-हिंगोली
३७.८०३

एकूण क्षेत्रफळ चौ.कि.मी

१००५४.०१३

डॉ. सुरेखा म. मुळे.
(अभयारण्ये संदर्भ: वन विभाग)
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India