शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या योजना

कृषी विभागामार्फत विस्तार, फलोत्पादन, मृद व जलसंधारण कामासाठी सन 2014-15 मध्ये राबविलेल्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना, कोरडवाहू शेती अभियान, कोरडवाहू क्षेत्र विकास, कृषी यांत्रिकीकरण अभियान, मृदा आरोग्य अभियान, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत, सूक्ष्म सिंचन कार्यक्रम (VIIDP), जलयुक्त शिवार अभियान, पीक विमा खरीप हंगाम 2014-15 आदी ठळक योजनांमुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. वर्षभरातील योजना निहाय कृषी विभागाच्या कार्याची माहिती पुढीलप्रमाणे…
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान (कडधान्य पिके)

सन 2014-15 मध्ये तूर, मूग, हरभरा या कडधान्य पिकांची उत्पादन व उत्पादकता वाढविण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान जिल्ह्यामध्ये राबविण्यात आले. सदर अभियानामध्ये पीक प्रात्यक्षिके, अनुदानाद्वारे प्रमाणित बियाणे पुरवठा, एकात्मिक मुलद्रव्ये व्यवस्थापन, तसेच औजारे पुरवठा या घटकाचा अंतर्भाव होता. सन 2014-15 एकूण 13 कोटी 12 लाख रुपये निधी खर्च करण्यात आला आहे.

सन 2015-16 करीता सदर अभियानाअंतर्गत एकूण रु. 14 कोटी 50 लक्ष रुपये निधी मंजूर असून सद्यस्थितीत आंतरपिक पद्धतीवर आधारित सोयाबीन + तूर पिकाचे व कपाशी + मुगाचे सहा प्रकल्प राबविण्यात आले. रब्बी हंगामात हरभरा पिकाचे 71 प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
कोरडवाहू शेती अभियान

शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम जिल्ह्यात सन 2013-14 पासून राबविण्यात येत असून एकूण 13 तालुक्यातील 13 गावांमध्ये तीन वर्षे हे अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून कोरडवाहू शेतकऱ्यांना ट्रॅक्टर, कृषी औजारे, शेतमालासाठी वाहन, दालमिल, पॅक हाऊस, शेडनेट हाऊस, पाईप/डिझेल पंपसेट, ठिबक व तुषार संच, प्लास्टिक क्रेट्स, हरितगृह इत्यादी लाभाचे घटक अनुदानावर पुरवठा करण्यात येत आहेत. तसेच सिमेंट नालाबांध व शेततळे यासारख्या घटकांच्या माध्यमातून कोरडवाहू शेतीसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करण्यात येत आहे.

सन 2013-14 मध्ये 1 कोटी 39 लक्ष रुपये व सन 2014-15 मध्ये तीन कोटी 53 लक्ष रुपये असा एकूण चार कोटी 92 लक्ष रुपयाचा निधी या अभियानांतर्गत खर्च करण्यात आलेला आहे. तसेच सन 2015-16 करीता जिल्ह्याचा तीन कोटी 22 लक्ष रुपये अनुदान निधीचा वार्षिक कृती आराखडा सादर करण्यात आलेला आहे.

कोरडवाहू क्षेत्र विकास

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमांतर्गत सन 2014-15 मध्ये जिल्ह्यात 3 प्रकल्प राबविण्यात आले असून 1 कोटी 9 लक्ष 54 हजार रुपये निधी खर्च झाला. या निधीमधून पशुधन खरेदी, पाणी उपसा साधने, पाईप, भूसुधारणा, पॅकहाऊस, हरितगृह हे घटक राबविण्यात आले आहे. सन 2015-16 करीता जिल्ह्यातील पाच गावांची निवड करण्यात आलेली असून रु. 1 कोटी 39 लक्ष निधीचा वार्षिक कृती आराखडा तयार असून 34 लक्ष रुपयाचा पहिला हप्ता प्राप्त आहे.
मृदा आरोग्य अभियान

नैसर्गिक साधन सामग्रीचे व्यवस्थापनासाठी मृद परिक्षण व सर्वेक्षणाचे आधारे योग्य खताच्या संतुलित वापरासाठी मृद आरोग्य अभियान सुरू करण्यात आले आहे. दर तीन वर्षात एकदा शेतकऱ्यांना मृद आरोग्य पत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे. सन 2015-16 मध्ये एकूण 398 गावांमध्ये 17 हजार 747 मृद नमुने काढण्यात आले असून विश्लेषणासाठी मृद नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत सादर करण्यात आले आहे.
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान

या अभियानांतर्गत सन 2015-16 करीता जिल्ह्याला एकूण सहा कोटी 11 लक्ष 35 हजार रुपयाचा कार्यक्रम मंजुर होता. यातून केळी लागवड, पॅक हाऊस, शेड नेट, पॉली हाऊस, 20 अश्वशक्तीच्या आतील ट्रॅक्टर, पॉवर ट्रेलर, सामुहिक शेततळे, संत्रा पुनरुज्जीवन हे घटक राबविण्यात येत आहेत.
राष्ट्रीय कृषी विकास योजना

महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीत बहुवार्षिक फळपिके वाचविण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांतर्गत अमरावती जिल्ह्यास नऊ कोटी 67 लक्ष रुपयाचा कार्यक्रम मंजूर होता. ऑक्टोबरअखेर सात कोटी 39 लक्ष रुपये प्राप्त असून त्याचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
सूक्ष्म सिंचन कार्यक्रम (VIIDP)

विदर्भ सधन सिंचन विकास कार्यक्रमांतर्गत सूक्ष्म सिंचन योजना सन 2012-13 पासून राबविण्यात येत आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यास 75 टक्के व इतर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर ठिबक व तुषार संच उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सर्व सूक्ष्म सिंचन प्रस्ताव ऑनलाईन असून शेतकऱ्यांच्या खात्यावर RTGS प्रणालीद्वारे अनुदानाची रक्कम जमा केली जाते.

सन 2013-14 मध्ये 12,085 लाभार्थींना 11,392 हे. क्षेत्रावर ठिंबक/तुषार सिंचन संचासाठी रु. 2561.63 लाख अनुदान अदा करण्यात आले. सन 2014-15 मध्ये 740 लाभार्थ्यांना 666 हेक्टर क्षेत्रासाठी रु. 158.83 लाख अनुदान अदा करण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार अभियान
अमरावती जिल्ह्यात एकूण 253 गावे निवडण्यात आली असून त्यापैकी आजअखेरपर्यंत 248 गावांमध्ये एकूण 4,358 कामे पूर्ण झाली आहेत. 253 कामे प्रगतीपथावर आहेत. झालेल्या कामातून 20122 टी.एम.सी. इतका पाणी साठा उपलब्ध झाला आहे. त्यातून 22879 हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचन क्षमता निर्माण झाली आहे.
पीक विमा योजना

खरीप हंगाम सन 2014-15 मध्ये राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये 1,16,130 शेतकऱ्यांना रु. 83 कोटी 92 लक्ष विमा नुकसान भरपाई मंजूर झाली. तसेच हवामान आधारीत पीक विमा योजना सन 2014-15 अंतर्गत जिल्ह्यातील एकूण 37,886 शेतकऱ्यांना रक्कम रु. 15 कोटी 24 लक्ष रुपयांचा विम्याचा लाभ मिळालेला आहे.

सन 2015-16 मध्ये हवामानावर आधारित पीक विमा योजनेत जिल्ह्यातील 39,740 शेतकऱ्यांनी 53,228 हेक्टरचा विमा काढून रु.552.30 लाखाचा शेतकरी भरणा केलेला आहे. तसेच हवामानावर आधारित फळपिक विमा योजनेत जिल्ह्यातील 6076 शेतकऱ्यांनी 7190.12 हेक्टरचा विमा काढुन रु.237.27 लाखाचा शेतकरी भरणा केलेला आहे. राष्ट्रीय कृषी पीक विमा योजनेत जिल्ह्यात 1,43,563 शेतकऱ्यांसाठी 1,34,835 हेक्टरचा विमा काढून रु.666.33 लाखाचा भरणा शेतकऱ्यांनी केलेला आहे.
-सुरेश काचावार,
जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती.

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India