सांस्कृतिक भारत : पुद्दूचेरी (पाँडेचेरी)

पुद्दूचेरीचे भौगोलिक क्षेत्रफळ 492 चौरस आहे. राज्याच्या प्रमुख भाषा तमिळ, तेलगु, मल्याळम, इंग्रजी व फ्रेंच या आहेत. 1956 पर्यंत फ्रेंच हीच स्थानिक कायदेशीर भाषा होती. 2011 च्या जनगणनेनुसार पुद्दूचेरीची लोकसंख्या 654,392 इतकी आहे.

पुद्दूचेरीत पूर्वाश्रमीची फ्रेंच वसाहत होती. दक्षिण भारतातील केंद्र शासित प्रदेश. पुद्दूचेरी, करईकल, माहे आणि यानम या फ्रेंच वसाहती विखुरलेल्या आहेत. पुद्दूचेरी ही फ्रेंचांची भारतातील राजधानी व मुख्यालय समजले जात होते. जवळपास 138 वर्षे येथे फेंचांचे राज्य होते. पुद्दूचेरी 1 नोव्हेंबर 1954 रोजी भारतात विलीन झाले. पूर्वेला बंगालची खाडी व उर्वरीत तिन्ही बाजूंना तमिळनाडू राज्य. पूर्व किनाऱ्यावर करईकल तर माहे पश्चिम घाटावर मलबार किनाऱ्यावर कालिकत विमानतळ आहे. माहे पासून 70 किमी यानम आंध्रप्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्याला जोडून आहे. यानम विशाखापट्टनम विमानतळापासून 200 किमी अंतरावर आहे.

केंद्र शासित प्रदेश पुद्दूचेरीच्या एकूण लोकसंख्येपैकी 45 टक्के लोकसंख्या शेती व शेतीसंबंधी उद्योगांवर आधारीत आहे. 90 टक्के शेती सिंचनाखाली येते. धान व डाळी ही पिके प्रमुख आहेत. माहे प्रांतात नारळ, मसाले, सुपारीची पिके तर यानम मध्ये डाळी, शेंगदाणे व मिरचीची पिके घेतली जातात. तसेच अन्य पावसाळी पिकेही येतात.

वस्त्र, संगणक, संगणकाचे सुटे भाग, इलेक्ट्रानिक उत्पादने, औषधी, चामड्याच्या वस्तू, साखर, धागे, स्पिरिट, बियर, पोटॅशियम क्लोरेट, वापरा व फेका प्रकारच्या सिरिंज, छताचे पत्रे, वॉशिंग मशीन, पो‍लादी नळ्या, स्वयपाकाचा गॅस आदी उद्योग पुद्दूचेरीत चालतात.

पुद्दूचेरीला फ्रेंच संस्कृती हा सांस्कृतिक वारसा आहे. येथील सुनियोजित शहरांच्या रचनेमध्ये फ्रेंच लोकांचा वारसा झळकत राहतो. वॉर मेमोरियल, फ्रेंच बौलेवर्ड टाऊन, श्री अरविंदो आश्रम, आयुरोव्हिले म्युझियम, चुननावर रिसॉर्ट, बोटॅनिकल गार्डन, डान्सिंग म्युझिकल फाऊंटन, ओसूडू लेक ही पर्यटन स्थळे महत्त्वाची आहेत. पुद्दूचेरीला लिखित साहित्याचाही इतिहास असून तमिळ कवी भारतीदासन हे पुद्दूचेरीचे कवी म्हणून ओळखले जातात.

पुद्दूचेरीचे लोकप्रिय नृत्य म्हणजे रामायणातील मिथकावर आ‍धारीत असे वानर नृत्य आहे. हे नृत्य पाच ते आठ तास सलग पद्धतीने साजरे केले जाते. दोन मोठे ड्रम या नृत्यासाठी वाजवले जातात. या ड्रम्सना रामढोल म्हणतात. या नृत्याला वानर नृत्यही म्हणतात. नृत्याच्या वेळी पुरूष लोखंडी रींगा वापरतात. या रींगांची संख्या दहा पर्यंत असते. या रींगा पायात घालून विशिष्ट पदन्यासाने नाच केला जातो. नृत्य करताना या रींगांचा संगीतबद्ध नाद ऐकू येत असतो. या लोखंडी रींगांना अंजली असे म्हणतात.

दक्षिण भारतातला पोंगल हा सणही पुद्दूचेरीत साजरा करत असले तरी मासीमागम नावाचा उत्सव खास पुद्दूचेरीचा आहे, मासि नावाच्या तमिळ महिन्यात (फेब्रुवारी-मार्चच्या दरम्यान) पौर्णिमेच्या दिवशी हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी अनेक भक्‍त आपले पापक्षालन करण्यासाठी खोल समुद्रात स्नान करतात. यामागे मिथक असे आहे की, सोवरी राजाने कोळी महिलेशी विवाह केला म्हणून कोळी वस्तीत राजाला प्रवेश मिळाला. या सणाकडे माणुसकीचा सण म्हणूनही पाहिले जाते.

विल्लीयनूर मंदिर उत्सव, बेस्टील दिवस (फ्रांस डे) हे उत्सव पुद्दूचेरीत उत्साहाने साजरे केले जातात. मंदिर उत्सव हा पारंपरिक भारतीय सण आहे तर बेस्टील दिवस हा फ्रांसचा सण आहे. फ्रेंच पद्धतीने बनवलेले (पदार्थ) अन्न उत्सवही फेब्रुवारी महिन्यात पाळला जातो. पारंपरिक ख्रिसमससह अरविंद घोष यांची जयंतीही दिमाखात साजरी केली जाते.

दक्षिण भारतातील पुद्दूचेरी हे उत्तम पर्यटन स्थळ मानले जाते. पुद्दूचेरी हे फ्रेंच रचनेचे शहर असून विशिष्ट पद्धतीच्या इमारती, चर्चेस, मंदिरे आणि पुतळे हे अगदी योजनाबद्धरित्या उभारले आहेत. अरविंद घोष यांचा आश्रम आणि चार समुद्र किनारे हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण ठरतात. त्यातील रॉकी बीच जास्त लोकप्रिय आहे. अॅरोव्हीले नावाचे प्रायोगिक शहर पुद्दूचेरी पासून आठ किमी वर आहे, तेही पर्यटकांसाठी आकर्षण ठरते.

गिनगी, गुदुवयार, मलतार, पमबाइयार, पेनियार, करिकल, अरसालर, नांदलर, नत्तर, नुलर, प्रवादयनार, वंजीर, माहे, पोनियार, गौतमी या नद्या पुद्दूचेरीतून वाहतात.

पुद्दूचेरीत इतर आदिवासी आढळत नाहीत म्हणून आदिवासी संस्कृती वा त्यांच्या घटक बोलीही नाहीत.

(या व्यतिरिक्‍त अजून काही महत्वपूर्ण नोंदी अनावधानाने राहून गेल्या असतील तर अभ्यासकांनी लक्षात आणून द्याव्यात ही विनंती.)

- डॉ. सुधीर राजाराम देवरे
मोबाइल: 75886 18857
Email: drsudhirdeore29@gmail.com,
sudhirdeore29@rediffmail.com

एक सफर चौलची

अलिबाग पासून सुमारे १८ कि.मी. अंतरावर दडलेलं एक गाव चौल ! इथल्या रेवदंडा-नागाव याप्रमाणेच चौल-रेवदंडा अशी जोडगोळी ! चौल हे एक आतिशय प्राचीन बंदर आहे. या बंदराला अनेक नावे आहेत. चेमुल, तिमुल, सिमुल, सेमुल, सेमुल्ल, सिबोर, चिमोली, सैमुर, जयमूर, चेमुली, चिवील, शिऊल, चिवल, खौल, चावोल, चौले आणि चौल अशा अन्य नावांनीही या स्थळाचा उल्लेख आलेला आहे. दोन हजार वर्षा पूर्वीचे हे एक बंदर ! त्याकाळी इजिप्त, ग्रीस, आखातातील काही देश, चीन देखील आंतरराष्ट्रीय व्यापार सुरु होता.

एका गावाला एवढी नावे कशी असा प्रश्न पडला ना ? त्याचे उत्तर चौलच्या बंदरात दडलेले आहे. इतिहासाचा प्रदिर्घ कालखंड, त्यातच बंदरात असल्याने संपर्कात आलेल्या अनेक देशी-परदेशी सत्ता, व्यापारी, प्रवासी या स्थळांचा आपापल्या भाषा-संस्कृती लिपी उच्चारानुसार उल्लेख केला आणि त्यातून ही नावे जन्माला आली. रामेश्वर हे चौलचे ग्रामदैवत आहे. या रामेश्वराचे भव्य मंदिर येथे आहे. उतरता कौलारु छत, पुढे नदी मंडप, दिपमाळ आणि सुंदर पुष्टीकरण ! रामेश्वर मंदिराचा गाभारा सुमारे ४.४२ मीटर असून मध्यभागी १५ मी. लांब रुंद व जमिनीपासून थोडी उंच पितळी पत्राने मढलेली शाळूंका आहे. गाभाऱ्‍याची संपूर्ण ईमारत स्वतंत्र असून ती बाहेरील उंच शिखर असलेल्या घडीव दगडी मंदिरात समाविष्ट आहे. गाभाऱ्‍याच्या समोर सभामंडप असून त्यात तीन कुंड आहेत. पर्जन्य, वायु आणि अग्नी अशी त्यांची नावे आहेत. दुष्काळ पडला, पाऊस आटला की पर्जन्य कुंड, वादळी वारा असला की वायू कुंड आणि थंडी वाढली की अग्नी कुंड उघडायचे. अशा प्रकारे गावातील त्या त्या गेाष्टीची उणीव ही कुंड भागवत असतात.

या मंदिराशिवाय चौलमध्ये राजकोट, हमामखाना आणि कलावतीचा वाडा या तीन ऐतिहासिक वस्तू आहेत. यातील राजकोट हा विजयपूरच्या आदिलशाहाने बांधला. पुढे तो चौलच्या राजवटी बरोबर सत्ताबद्दल होऊन मराठ्याकडे गेला. पण पुढे-पुढे या किल्ल्याच्या आश्रयानेच मराठ्याच्या साम्राज्यालाच उपद्रव होऊ लागल्याने पेशव्याच्या आरमारचे सुभेदार बाजीराव बेलोसे यांनी सुरुंग लावून हा राजकोट पाडला. दुसरी वास्तू हमामखाना ही ! हमामखाना म्हणजे शाही स्नानगृह ! कमानीची रचना, तेथील खोल्यांवरील चुन्यातील नक्षीकामाने या वास्तुला सुंदरता आली. येथील कारंजी, हौद तर येथील शाही श्रीमंतीच ! कलावतीचा वाडा ही अशीच आणखी एक सुंदर वास्तू ! या इमारतीच्या कमानी, सज्जे, घुमटाकार छत यामुळे ही वास्तू आणखी सुंदर वाटते. त्या महालाच्या चौक-मंडपातून नृत्य-गायन ऐकू आल्याचा भास होतो. इतिहासाने वर्तमानाला आणलेली ही गुंगीच आहे असे वाटते. तसेच चौल मधील रामेश्वर मंदिरात पोळा, नागपंचमी, गणेशचतुर्थी हे सण येथे साजरे केले जातात. श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भाविकांची रांग लागते. महाशिवरात्रीचा मोठा सण येथे साजरा केला जातो. चौल येथील दत्त मंदिर हे ही एक प्रेक्षणीय स्थळ आहे. तेथे डिंसेबरला दत्त यात्रा असते. ही स्थळे अशी आहेत की कोणत्याही ऋतुमध्ये गेल्यास येथे फिरण्याचा आनंद आगळाच आहे.

चौलचा अगदी प्राचीन उल्लेख "पेरिप्लस ऑफ एरिथ्राईन सी" या आणि टॉलेमीच्या दोन हजार वर्षापूर्वीच्या प्रवास वर्णनात येतो. चौलजवळील वाघजाईच्या डोंगरातील सातवाहन काळातील लेणीही त्‍या काळातील चौलशी असलेले नातेसंबध दर्शविते, पण चौलच्या प्राचीन बंदराबद्दल कुठलेही पुरावे नाहीत. तेव्हा त्याच्या शोधात २००१ ते २००७ अशी सलग सात वर्षे पुण्यातील डेक्कन कॉलेजने चौलमध्ये वेगवेगळ्या भागात उत्खनन केले. या प्राचीन बंदराचे अवशेष, "जेटी"ची भिंत, सातवाहन कालीन नाणी, मातीची भांडी, खापरे, तत्कालीन रोमन संस्कृतीत वापरले जाणारे महाकुंभ आणि असे बरंच काही !
कसे जावे ?

मुंबई-अलिबाग एस.टी.ने अलिबागला जाता येते. तेथून टम-टमच्या सहाय्याने चौलला जाऊ शकतो. दुसरा सुंदर समुद्र मार्ग म्हणजे गेट ऑफ इंडिया. गेट ऑफ इंडियावरून बोटीने मांडवा पर्यंत जाता येते. तेथून त्यांच्या बस अलिबाग पर्यंत उपलब्ध आहे. अलिबागला पोहोचल्यावर टम-टम, एस.टीने चौलला जाता येते. परंतु, पावसाळ्यात मात्र ही बोट सेवा बंद असते.

- श्वेता दांडेकर
dandekarshweta12@gmail.com
9757282750

फिरंगाणातील अर्थात मुंबई परिसरातील किल्ले : दुर्गाडीचा किल्ला

दुर्गाडीचा किल्ला, ठाणे जिल्ह्यात असून कल्याण रेल्वे स्थानकाकडून भिवंडीच्या रस्त्यावर कल्याण शहराच्या सीमेवरील खाडीच्या तीरावर हा किल्ला आहे. हा लेख दुर्गाडीच्या किल्ल्याबाबत असला तरी कल्याण व दुर्गाडी तसे फारसे दूर नाहीत. आजही दुर्गाडी ही कल्याणची शीव आहे. म्हणूनच कल्याणचा इतिहास वगळून केवळ दुर्गाडीची माहिती देणे अनुचित ठरेल. बहुतांशी प्रमाणात कल्याणचा जो इतिहास तोच दुर्गाडीचाही इतिहास आहे.

कल्याण हे खाडीीकिनारी असलेले गाव अगदी प्राचीन काळापासून व्यापारी पेठ म्हणून प्रसिद्ध होते. सातवाहनांच्या काळापासून या बंदरातून व्यापार चालू होता. यादवांच्या पाडावानंतर हा मुलुख मुसलमानांच्या ताब्यात गेला. बहामनी राज्याच्या स्थापनेनंतर कल्याण शहर प्रथम बहामनी राज्यात होते. पहिल्या अहमदशहाने उत्तर कोकणावर स्वारी करुन इतर मुलुखाबरोबर कल्याणही जिंकले व पुढे आपल्या स्वतंत्र शाहीची (निजामशाहीची) घोषणा केली. याप्रमाणे कल्याण निजामशाहीत आले.पुढे विजापूरचा आदिलशहा व दिल्लीचे मोगल यांनी संयुक्त चढाई करुन निजामशाही संपवली व परिणामत: कल्याण आदिलशाही साम्राज्याचा भाग बनला.

इ.स.1657 मध्ये शिवाजी महाराजांनी कोकणावर मोहिम काढली. त्यावेळी महाराजांनी दादाजी बापूजी रांझेकरांना कल्याण काबीज करण्यास फर्मावले व त्यानुसार रांझेकरांनी दिनांक 24 ऑक्टोबर 1657 रोजी कल्याण काबीज केले. कल्याण काबीज होताच शिवाजी महाराज स्वत: कोकणाच्या स्वारीवर निघाले. फौजेसह ते नुकत्याच जिंकलेल्या कल्याणमध्ये आले. यावेळी कल्याणमध्ये स्वराज्याच्या आरमाराची स्थापना झाली. यावेळी त्यांनी ताब्यात घेतलेली गलबते व होड्या हे स्वराज्याचे पहिले आरमार होय. हे स्वराज्याचे पहिले आरमार प्रथम कल्याणच्या खाडीत तरंगले हे येथे आवर्जून नमूद केले पाहिजे. त्याचवेळी कल्याण येथेच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा पहिला सरखेल किंवा नौदलप्रमुख म्हणून दर्यासारंगाची नेमणूक केली. त्याचप्रमाणे इब्राहिमखान, दौलतखान व मायनाक भंडारी हे अत्यंत शूर, धाडसी व निष्ठावंत अधिकारी आरमारात सामील केले.

खाडीच्या किनाऱ्यावर एका टेकाडावर दुर्गाडी किल्ला आहे. किल्ल्याच्या चारही बाजू उपदिशांना म्हणजेच आग्नेय, नैऋत्य, वायव्य व ईशान्य या दिशांना अभिमुख आहेत.  चार कोपऱ्यात चार बुरुज व पूर्व कोपऱ्यातील बुरुजालगत असलेला आणखी एक बुरुज, या दोन बुरुजांमध्ये असलेले महाद्वार व काहीसा आयताकार तलविन्यास असलेला बाह्यकोट असे या किल्ल्याचे स्वरुप आहे.

आतील भागात चौकोनी तलविन्यासाचे एक पीठ असून त्यावर देवीचे मंदिर आहे. हे देवीचे मंदिर आग्नेयाभिमुख आहे. (आजच्या अत्याधुनिक चुंबकीय सुईने जरी आग्नेय दिशा सूचित केली असली तरी किल्ला व मंदिर बांधले गेले त्यावेळी दिशासाधन सूर्याच्या दिशेवरुन केले जात असे. त्यामुळेच उत्तरायण व दक्षिणायनाच्या काळात सूर्योदयाची दिशा सतत बदलती असल्यामुळे चुंबकीय सुईने दाखवलेली आग्नेय दिशा किल्ला व मंदिर बांधले गेले त्या काळात पूर्व मानली गेली असण्याची दाट शक्यता आहे.) या मंदिराच्यामागे मंदिराच्या पीठाच्या साधारणपणे निम्म्या उंचीचे आणखी एक लंबआयताकार पीठ असून त्यावर इदगाह आहे.

किल्ल्याची तटबंदी बऱ्यापैकी जाड असून बांधकाम मजबूत होते असे दिसते. तथापि बुरुजावरील व तटांवरील मूळ कठडे आज शिल्लक नाहीत. त्यामुळे तोफांच्या खाचा व गोळीबार गवाक्षे होती की नव्हती, अथवा असल्यास कोणत्या ठिकाणी होती ते कळण्यास मार्ग नाही. किल्ल्याच्या अंतर्भागातील जमिनीची पातळी तटाइतकीच उंच आहे. किल्ल्याच्या अंतर्भागाच्या जमिनीची पातळी वायव्येकडून आग्नेयेकडे कललेली, म्हणजेच उताराची आहे.

किल्ल्याचे बुरुज सर्वसाधारणपणे वर्तुळाकृती तलविन्यासाचे आहेत. यातील एका बुरुजाचे काही प्रमाणात नुतनीकरण झाले असून त्यावर रंगरंगोटी व कमळाच्या पाकळ्यांच्या आकाराचे कठडे उभारण्यात आले आहेत. एका बाजूचा बुरुज मधूनच ढासळला आहे. बाकीचे दोन बुरुज कठडे नसलेल्या स्थितीत पण बऱ्यापैकी टिकून आहेत.

किल्ल्याच्या आग्नेय तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते कळण्यास मार्ग नाही. याच तटबंदीत दोन बुरुजांच्यामधील भागात महाद्वार आहे. या प्रवेशमार्गातून सध्या दोन बाजूंनी वर जाण्यासाठी जिने आहेत. मूळ किल्ल्यातही अशाच पायऱ्या होत्या की ही आधुनिक काळातील सुधारणा आहे ते कळण्यास मार्ग नाही.

किल्ल्याच्या अंतर्भागात मंदिराचे एक व इदगाहाचे एक अशी दोन पीठे असली तरी या पीठांनी बालेकिल्ला बनला नव्हता; म्हणजेच निराळ्या शब्दात या किल्ल्याला आत बालेकिल्ला नव्हता हे निश्चित. किल्ल्यामध्ये एक इदगाह व एक देवीचे मंदिर एवढ्या दोनच जुन्या वास्तू आहेत. मंदिराचे अलिकडेच नुतनीकरण झाले आहे. हे नुतनीकरण मूळ मंदिरानुसारच करण्यात आले (म्हणजे निदान त्याचा तलविन्यास तरी मूळ मंदिरानुसारच ठेवण्यात आला) असे सांगण्यात येते. या मंदिरात आजही पूजाअर्चा होते. दर नवरात्रीत येथे मोठा उत्सव होतो व देवीच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात.

दुर्गाडी किल्ला जलदुर्ग असला तरी वसईच्या किल्ल्याप्रमाणे खाडीतून थेट किल्ल्यात प्रवेश करण्यासाठी मार्ग नाही. निराळ्या शब्दात नौदलाच्या सहाय्याने या किल्ल्याची कुमक करता येईल अशी परिस्थिती नव्हती. हा किल्ला मराठ्यांनी बांधला असल्यामुळे आणि किल्ल्याच्या निर्मितीच्यावेळी लगतचा प्रांत मराठ्यांच्याच ताब्यात असल्यामुळे तशी सोय असण्याची फारशी गरजही नव्हती.

छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याचे नौदल स्थापन करायचे होते. आपले नौदल कसे असावे याबाबतचे शिवछत्रपतीचे विचार अगदी स्पष्ट होते. स्वराज्याचे शेजारी म्हणून पोर्तुगीज, इंग्रज यांच्यासारखे दर्यावर्दी लोक होते. त्यांचा दर्यावर्दी अनुभव व तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे याची महाराजांना कल्पना होती. म्हणून आपले आरमार त्यांच्या बरोबरीचे किंवा तोडीचे नसले तरी अधिक वेगवान असावे, शत्रूचे मोठे आरमार चालून आले तर त्यांची जहाजे आत शिरु शकणार नाहीत अशा खाड्यांमध्ये आपल्या जहाजांना लपता आले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्या दृष्टीकोनातून दुर्गाडीचा किल्ला लष्करीदृष्ट्या मोक्याच्या ठिकाणी होता असेच म्हणावे लागेल.

किल्ल्याची नैऋत्यकडील तटबंदी पडून गेली असून तिचा पायाच फक्त शिल्लक आहे. तटबंदीचे व बुरुजांचे कठडे आणि महाद्वार पडून गेले आहे. तथापि सर्वसाधारणपणे किल्ल्याची कल्पना येईल इतपत अवशेष आजही टिकून आहेत. हा किल्ला तसा छोटेखानी असला तरी स्वराज्याचा पहिला आरमारी तळ म्हणून या किल्ल्याचे महत्व अपरंपार आहे.

संकलन - विलास सागवेकर,
उपसंपादक

ऐतिहासिक स्थळे : पावित्र्य जपण्याची गरज


आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले, ऐतिहासिक स्थळे इतिहासातल्या त्या पराक्रमी, शौर्यगाथेची ओळख करून देतात. शाळेत असताना सुद्धा शिवकालीन किल्ल्याची माहिती व्हावी म्हणून शाळेची सहल अशाच ऐतिहासिक स्थळावर जात असे. या ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला मात्र अनेक जण विसरतात. ते जपणे निश्चितच गरजेचे आहे, त्याचसाठी केलेला हा प्रयत्न...

आपल्यापैकी किती जण या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या भव्य अशा किल्ल्याची व वास्तुची व्यवस्थित पाहणी करतात. आपल्या संस्कृतीचे दर्शन यातून मिळत असते. वेगवेगळ्या कला, चित्र, राजा महाराजांच्या प्रतिकृती, प्राण्यांचे चित्र, जुन्या काळातील अवशेषांचे दर्शन या ऐतिहासिक वास्तूमधून आपल्याला घडत असते. मात्र आपल्यापैकी अनेक जण ह्याच भव्य वास्तूंचे दर्शन घेण्यासाठी जातात आणि तिकडे आपल्याच नावाची प्रदर्शने मांडून येतात. काहींना ही सवय अगदी लहानपणापासून असते. शाळेत असताना बाकावर कोरीवकाम बरेच जण करत असतात. शाळेतल्या बाकावर प्रेमाची निशाणी म्हणून कोरलेला तो 'दिल' त्यावर लिहिलेली नावे, या सगळ्या गोष्टी बाकापासून ते भव्य वास्तूच्या किल्ल्यापर्यंत लिहिणारे अनेक जण आहे. चित्रपटातल्या संवादापासून ते लैला-मजनू हिर-रांझा पर्यंत सर्वांना आदर्श मानून स्वत:च्या प्रेमाची निशाणी देणारे हे अनेक लोक आहेत. जे आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या स्थळांचे गांभीर्य विसरताना दिसतात.

काही महिन्यांपूर्वी माझा जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा योग आला होता. लहानपणी तिथे सहलही गेली होती. या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य. महाराष्ट्रातील किल्ले आणि शिवराय यांचे अतूट नाते आहे. अशा अनेक गोष्टींमुळे शिवनेरीचा दर्जा महत्त्वपूर्ण आहे. ऐतिहासिक काळात बचाव आणि चढाईसाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही बलवंत स्थाने आज मात्र दुर्दशेच्या गर्तेत सापडली आहेत. मी शिवनेरीला गेले असताना तिकडे पिकनिकला आलेल्या एका ग्रुपच्या मुलाने त्याचे नाव आणि मोबाईल नंबर मोठ्या दगडावर लिहिला. या सार्वजनिक ठिकाणी खाण्याच्या वस्तूचे पॅकेट, रिकाम्या बाटल्या टाकण्याची सवय तर आपल्याला आहेच. आशिक, बाबू, बेबी, बाबा, लिहिण्याची गरज काय? अशाने तुमचे प्रेम अमर होईल किवा जगजाहीर होईल अशी तर कल्पना नसेल ना या लोकांची?

केवळ शिवनेरीच नाही, तर औरंगाबादच्या अजिंठा-वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा, आग्र्याचा ताजमहाल अशा पाहिलेल्या अनेक ठिकाणी हाच प्रकार घडतो. जर कोणी लहान मुले असे करत असतील तर आपण ओरडू तरी शकतो पण तरुण-तरुणी, मोठीमोठी माणसेच अशी वागू लागली तर येणाऱ्‍या पिढीला आपण या‌‍ शौर्यवीराच्या कथा सांगणार की त्यावर केलेली रंगरंगोटी दाखविणार? सहज सुट्टीच्या वेळी लोक बाहेर फिरण्यासाठी जेव्हा गड-किल्‍ल्यांवर जातात, आणि कोणी विचारलं की काय बघितलं तिकडे तर अनेक लोक काही नाही, सगळं पडलं आहे. बघण्यासारखं काहीही नाही अशी निराशाजनक उत्तरे देतात. तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते की, भले ही आज आमचे किल्ले थोडे ढासळले असतील पण महाराष्ट्राची शान म्हणून ताठ मानेने उभ्या असणारा तोरणा, सिंधूदुर्ग, रायगड, सिंहगड, शिवनेरी अशा अनेक किल्यांचा आपल्याला अभिमान हवाच. शेकडो किल्यांचा हा खजिना आपला आहे, त्याला जपण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे.

आपण फक्त किल्ल्यावर मंदिरावर मोठमोठ्या वास्तूवर लावलेल्या त्या नोटिसा वाचण्याचा कंटाळा येऊन त्यांचे फोटो काढतो. मात्र आपणच आपल्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्याचा अपमान करतो आणि स्वत:च्या देशाची प्रतिमा मलीन करतो. त्याचा कधी विचार केला आहे ? आपण या स्थळावर भेट देण्यासाठी जातो. इतिहासातील या वास्तू उत्तम शिल्पकाराची, चित्रकाराची ओळख करून देतात. वर्षानुवर्षे ऊन-पाऊस सोसणाऱ्या या किल्ल्यांना काही होत नसून उत्कृष्ट बांधकामाची पोच पावती आपल्याला या वास्तू देतात. पण या ठिकाणी जाऊन लोक त्यांच्या प्रेमाची आठवण प्रियकर प्रेयसीची नावे मोबाईल क्रमांक देऊन काय साध्य करण्याच्या विचारात असतात हे मला काही समजत नाही?

सध्या सगळीकडे स्वच्छता अभियानाचे वारे सुरु आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लहान मोठे कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता अभियान राबवून आपआपला परिसर स्वच्छ करण्याच्या मागे आहेत. माझ्या या लेखातून मला हेच पोहचवायचे आहे की, आपण वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतो. मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकताच मराठी माणूस मान उंचावतो. मग ऐतिहासिक वास्तूचा खजिना आपल्याजवळ असताना यावर फालतू विनोद, मजकूर लिहून का आपण आपली शोभा करून घेतो? यानंतर तरी असे काही होणार नाही याची शपथ घेऊन येणाऱ्या पिढीला आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख करून देण्याची जबाबदारी आपणच घेऊ या.

आपला सांस्कृतिक वारसा आपणच जपायला हवा आणि या करता तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहाजहान ने मुमताजसाठी ताजमहाल सारखी भव्य वास्तू बांधून त्यांचे प्रेम व्यक्त केले. आपण याचे कौतुक करू, हवा तर फोटोही काढू मात्र इतिहासातील खरेखुरे साक्षीदार बनून त्यावर स्वत:च्या प्रेमाची कबुली देण्याची गरज अजिबात नाही. या कोरीव कामाने आपण स्वत:ला बदनाम करून घेतोय याचा विचार जरूर करा. आपले किल्ले ऐतिहासिक वास्तू ही आपली शान आहे. विदेशी पर्यटक या वास्तुचे कौतुक करतात. स्थापत्य कलांचे उत्तम उदाहरण देणाऱ्या या वास्तुची देखभाल आपल्यालाच करायला हवी ना ! आपणच आपल्या अभिमानास्पद ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला हवे ना ! तर चला. आपली ऐतिहासिक पर्यटनस्थळे स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राहतील, अशी शपथ घेऊया.

-अमृता आनप
(७२०८७३९७०५)
(लेखिका या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतरवासिता करीत आहेत.)

आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........


आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........



आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा.......

आपला हक्काचा नारा...... जाणुन घेऊ सात/बारा........

प्रचार प्रसार प्रसिद्धी व माहिती संस्थान महा. राज्य संचालित वतन बचाओ आंदोलनच्या वतीने ७/१२ परीषद घेण्यासाठी सातबारा यात्रेचे लवकरच आयोजन करण्यात येणार आहे. आम्ही आपल्या प्रत्यक्ष भेटीसाठी येणार आहोत. आपल्या समस्यां आपले प्रश्न जाणून घेणार आहोत.आणि ते सोडविण्यासाठी आम्ही सामाजिक पटलावर ते मांडणार आहोत. सदरच्या उपक्रमात आपला सहभाग दर्शवावा.
धन्यवाद
वतन बचाओ आंदोलन


 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India