ऐतिहासिक स्थळे : पावित्र्य जपण्याची गरज


आपल्या महाराष्ट्रातील गड किल्ले, ऐतिहासिक स्थळे इतिहासातल्या त्या पराक्रमी, शौर्यगाथेची ओळख करून देतात. शाळेत असताना सुद्धा शिवकालीन किल्ल्याची माहिती व्हावी म्हणून शाळेची सहल अशाच ऐतिहासिक स्थळावर जात असे. या ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला मात्र अनेक जण विसरतात. ते जपणे निश्चितच गरजेचे आहे, त्याचसाठी केलेला हा प्रयत्न...

आपल्यापैकी किती जण या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या भव्य अशा किल्ल्याची व वास्तुची व्यवस्थित पाहणी करतात. आपल्या संस्कृतीचे दर्शन यातून मिळत असते. वेगवेगळ्या कला, चित्र, राजा महाराजांच्या प्रतिकृती, प्राण्यांचे चित्र, जुन्या काळातील अवशेषांचे दर्शन या ऐतिहासिक वास्तूमधून आपल्याला घडत असते. मात्र आपल्यापैकी अनेक जण ह्याच भव्य वास्तूंचे दर्शन घेण्यासाठी जातात आणि तिकडे आपल्याच नावाची प्रदर्शने मांडून येतात. काहींना ही सवय अगदी लहानपणापासून असते. शाळेत असताना बाकावर कोरीवकाम बरेच जण करत असतात. शाळेतल्या बाकावर प्रेमाची निशाणी म्हणून कोरलेला तो 'दिल' त्यावर लिहिलेली नावे, या सगळ्या गोष्टी बाकापासून ते भव्य वास्तूच्या किल्ल्यापर्यंत लिहिणारे अनेक जण आहे. चित्रपटातल्या संवादापासून ते लैला-मजनू हिर-रांझा पर्यंत सर्वांना आदर्श मानून स्वत:च्या प्रेमाची निशाणी देणारे हे अनेक लोक आहेत. जे आपल्या संस्कृतीची ओळख करून देणाऱ्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्या स्थळांचे गांभीर्य विसरताना दिसतात.

काही महिन्यांपूर्वी माझा जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर जाण्याचा योग आला होता. लहानपणी तिथे सहलही गेली होती. या किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वास्तव्य. महाराष्ट्रातील किल्ले आणि शिवराय यांचे अतूट नाते आहे. अशा अनेक गोष्टींमुळे शिवनेरीचा दर्जा महत्त्वपूर्ण आहे. ऐतिहासिक काळात बचाव आणि चढाईसाठी अत्यंत उपयुक्त असलेली ही बलवंत स्थाने आज मात्र दुर्दशेच्या गर्तेत सापडली आहेत. मी शिवनेरीला गेले असताना तिकडे पिकनिकला आलेल्या एका ग्रुपच्या मुलाने त्याचे नाव आणि मोबाईल नंबर मोठ्या दगडावर लिहिला. या सार्वजनिक ठिकाणी खाण्याच्या वस्तूचे पॅकेट, रिकाम्या बाटल्या टाकण्याची सवय तर आपल्याला आहेच. आशिक, बाबू, बेबी, बाबा, लिहिण्याची गरज काय? अशाने तुमचे प्रेम अमर होईल किवा जगजाहीर होईल अशी तर कल्पना नसेल ना या लोकांची?

केवळ शिवनेरीच नाही, तर औरंगाबादच्या अजिंठा-वेरूळ लेण्या, बीबी का मकबरा, आग्र्याचा ताजमहाल अशा पाहिलेल्या अनेक ठिकाणी हाच प्रकार घडतो. जर कोणी लहान मुले असे करत असतील तर आपण ओरडू तरी शकतो पण तरुण-तरुणी, मोठीमोठी माणसेच अशी वागू लागली तर येणाऱ्‍या पिढीला आपण या‌‍ शौर्यवीराच्या कथा सांगणार की त्यावर केलेली रंगरंगोटी दाखविणार? सहज सुट्टीच्या वेळी लोक बाहेर फिरण्यासाठी जेव्हा गड-किल्‍ल्यांवर जातात, आणि कोणी विचारलं की काय बघितलं तिकडे तर अनेक लोक काही नाही, सगळं पडलं आहे. बघण्यासारखं काहीही नाही अशी निराशाजनक उत्तरे देतात. तेव्हा त्यांना सांगावेसे वाटते की, भले ही आज आमचे किल्ले थोडे ढासळले असतील पण महाराष्ट्राची शान म्हणून ताठ मानेने उभ्या असणारा तोरणा, सिंधूदुर्ग, रायगड, सिंहगड, शिवनेरी अशा अनेक किल्यांचा आपल्याला अभिमान हवाच. शेकडो किल्यांचा हा खजिना आपला आहे, त्याला जपण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे.

आपण फक्त किल्ल्यावर मंदिरावर मोठमोठ्या वास्तूवर लावलेल्या त्या नोटिसा वाचण्याचा कंटाळा येऊन त्यांचे फोटो काढतो. मात्र आपणच आपल्या ऐतिहासिक स्थळावर जाऊन त्याचा अपमान करतो आणि स्वत:च्या देशाची प्रतिमा मलीन करतो. त्याचा कधी विचार केला आहे ? आपण या स्थळावर भेट देण्यासाठी जातो. इतिहासातील या वास्तू उत्तम शिल्पकाराची, चित्रकाराची ओळख करून देतात. वर्षानुवर्षे ऊन-पाऊस सोसणाऱ्या या किल्ल्यांना काही होत नसून उत्कृष्ट बांधकामाची पोच पावती आपल्याला या वास्तू देतात. पण या ठिकाणी जाऊन लोक त्यांच्या प्रेमाची आठवण प्रियकर प्रेयसीची नावे मोबाईल क्रमांक देऊन काय साध्य करण्याच्या विचारात असतात हे मला काही समजत नाही?

सध्या सगळीकडे स्वच्छता अभियानाचे वारे सुरु आहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत लहान मोठे कार्यकर्ते, अधिकारी, कर्मचारी स्वच्छता अभियान राबवून आपआपला परिसर स्वच्छ करण्याच्या मागे आहेत. माझ्या या लेखातून मला हेच पोहचवायचे आहे की, आपण वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथी साजऱ्या करतो. मराठ्यांच्या पराक्रमाची शौर्याची गाथा ऐकताच मराठी माणूस मान उंचावतो. मग ऐतिहासिक वास्तूचा खजिना आपल्याजवळ असताना यावर फालतू विनोद, मजकूर लिहून का आपण आपली शोभा करून घेतो? यानंतर तरी असे काही होणार नाही याची शपथ घेऊन येणाऱ्या पिढीला आपल्या खऱ्या संस्कृतीची ओळख करून देण्याची जबाबदारी आपणच घेऊ या.

आपला सांस्कृतिक वारसा आपणच जपायला हवा आणि या करता तरुणांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. शहाजहान ने मुमताजसाठी ताजमहाल सारखी भव्य वास्तू बांधून त्यांचे प्रेम व्यक्त केले. आपण याचे कौतुक करू, हवा तर फोटोही काढू मात्र इतिहासातील खरेखुरे साक्षीदार बनून त्यावर स्वत:च्या प्रेमाची कबुली देण्याची गरज अजिबात नाही. या कोरीव कामाने आपण स्वत:ला बदनाम करून घेतोय याचा विचार जरूर करा. आपले किल्ले ऐतिहासिक वास्तू ही आपली शान आहे. विदेशी पर्यटक या वास्तुचे कौतुक करतात. स्थापत्य कलांचे उत्तम उदाहरण देणाऱ्या या वास्तुची देखभाल आपल्यालाच करायला हवी ना ! आपणच आपल्या अभिमानास्पद ऐतिहासिक स्थळांचे पावित्र्य जपायला हवे ना ! तर चला. आपली ऐतिहासिक पर्यटनस्थळे स्वच्छ, सुंदर आणि पवित्र राहतील, अशी शपथ घेऊया.

-अमृता आनप
(७२०८७३९७०५)
(लेखिका या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात आंतरवासिता करीत आहेत.)

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India