शेतकरी जनता अपघात विमा योजना

नैसर्गिक आपत्तीमुळे होणा-या अपघातात काही शेतक-यांचा मृत्यू होतो तर काहींना अपंगत्व येते. शेती व्यवसाय करतांना घरातील कर्त्या व्यक्तीवर ओढवलेल्या अशा संकटामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. अडचणीची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळी अपघातग्रस्त शेतक-यास किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक मदत करणारी राज्य शासनाची शेतकरी जनता अपघात विमा योजना कुटुंबाचा आधार बनते.

शेती व्यवसाय करीत असतांना नैसर्गिक आपत्तीमुळे अपघात होतो. काहीवेळा अपंगत्व येते. अशावेळी कुटुंबातील आधार नाहीसा होतो. कुटुंबच आर्थिक आडचणीत सापडते. अशा प्रसंगी राज्य शासनाच्या कृषी विभागातर्फे शेतकरी जनता अपघात विमा योजना आधार देणारी ठरली आहे. अहमदनगर जिल्हयात सुमारे 150 कुटुंबाना या योजनेचा लाभ मिळाला आहे. राज्यातील महसूल नोंदणीप्रमाणे सातबारामध्ये नोंदणीकृत असलेल्या 10 ते 75 वयोगटातील शेतक-यांना या विमा योजनेचा लाभ मिळतो.

शेतकरी जनता अपघात विमा योजना नाशिक विभागात राबविण्यासाठी विमा सल्लागार म्हणून कबाल इन्शूरन्स बोकीग सर्व्हिसेस प्रा. लि. यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. विमा दावा अर्ज योग्य प्रकारे व योग्य त्या कागदपत्रासह विमा कंपनीकडे वेळेत दाखल होणे महत्वाचे आहे. सल्लागार कंपनीचे प्रतिनिधी मार्गदर्शनासाठी ठराविक दिवसी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात हजर असतात. शासनातर्फे या योजनेची अंमलबजावणी तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी , जिल्हास्तरावर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तर राज्यस्तरावर कृषि आयुक्तालय, पुणे यांच्याकडून केले जाते. या योजनेच्या लाभासाठी शेतकरी म्हणून महसूल कागदपत्रे सातबारा, सहा ' क ' , सहा ' ड ' (फेरफार ) यामध्ये नोंदणीकृत असलेले 10 ते 75 वयोगटातील सर्व शेतकरी पात्र असतील.

विमा संरक्षणासाठी समाविष्ट असलेली अपघात
या विमा योजनेमध्ये रस्ता / रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू , विषबाधा, विजेचा धक्का, विजपडून मृत्यू, सर्पदंश, विंचुदंश, खून, उंचावरुन पडून मृत्यू, नक्षलवाद्यांकडून होणा-या हत्या, जनावरांच्या हल्यामुळे किंवा चावल्यामुळे होणारे अपघाती मृत्यू, दंगल इत्यादीमुळे होणारी अपघाती घटनेमुळे शेतक-यास मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास विम्याद्वारे आर्थिक लाभ मिळू शकतो. हा लाभ अपघाती मृत्यू झाल्यास एक लाख रुपये व अपंगत्व आल्यास पन्नास हजार रुपये देण्यात येतात. या विमा योजनेद्वारे देण्यात येणारा आर्थिक लाभ धनादेशाद्वारे देण्यात येतो. हा लाभ मृत शेतक-यांची पत्नी किंवा पती , अविवाहीत मुलगी, मयत शेतक-याची आई, शेतक-याचा मुलगा, शेतक-याची नातवंडे, शेतक-याची विवाहीत मुलगी यांना देण्यात येतो. अपंगत्व असल्यास स्वतःला हा लाभ देण्यात येतो.

विमा दावा करण्याची कार्यपध्दती

या योजनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे झालेल्या अपघातामध्ये अपंगत्व अथवा मृत्यू झाल्यास वारसदार लाभार्थी यांनी दुर्घटना घडल्यापासून लवकरात लवकर तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. या दाव्यासाठी कागदपत्राची आवश्यकता असते. यामध्ये तालुका कृषि अधिकारी यांचे पत्र शिक्का सही व दिनांकासह असणे आवश्यक आहे. दावा अर्ज, संपूर्ण भरलेला बॅकेच्या तपशीलासहीत व दिनांक असलेला असावा ही दोन्ही कागदपत्राच्या मूळ प्रती असाव्यात, वारसदारांच्या बॅकेच्या पासबुकची झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. तालुका दंडाधिकारी यांच्या समोर केलेले वारसदार अर्जदाराचे शपथपत्र वीस रुपये स्टम्प पेपरवर अर्जदाराच्या छायाचित्रासह असावे. त्यावर तालुका दंडाधिकारी यांची सही , शिक्का दिनांकासह असणे आवश्यक आहे.

मयत शेतक-याच्या नावाचा सातबारा व सहा क तलाठयांनी सक्षांकित केलेला शिक्का सही दिनांक असलेले मूळ प्रत आवश्यक , मयत शेतक-याच्या नावावर ज्या फेरफारने जमीन आली अशा फेरफाराची नक्कल (सहा ड ) तलाठयानी साक्षांकित केलेला शिक्का व सही दिनांकसह मूळ प्रत असणे आवश्यक, मृत्यू प्रमाणपत्र शासन नियमानुसार नमुना क्रमांक सहा प्रमाणे शिक्का व सही दिनांकासह मूळ प्रत असणे आवश्यक , तलाठी, प्रमाणपत्र मयताच्या नावाचे तलाठयांनी साक्षाकिंत केलेल्या तलाठी कार्यालयाचा शिक्का सही व दिनांक असणे आवश्यक , वयाचा दाखला, मतदान कार्ड / रेशन कार्ड/ शाळेचा दाखला सक्षम अधिका-याने साक्षांकित केलेली झेरॉक्स प्रत जोडणे आवश्यक आहे. तसेच अपघाताच्या अनुषंगाने संबधीत पोलीस अधिका-याने साक्षांकित केलेल्या शिक्का सही असलेले मूळ कागदपत्राची आवश्यकता असते. त्यामध्ये प्रथम माहिती अहवाल (एफ आय आर ) , आकस्मात मृत्यूची खबर, घटनास्थळ पंचनामा, इन्कवेस्ट पंचनामा (मरणोत्तर पंचनामा ), पोस्ट मॉर्टम रिपोर्ट या कागदपत्रांचा समावेश आहे.

इतर कागदपत्रे 

विषबाधा/ सर्पदंश झाल्यास वैद्यकीय अधिका-याने साक्षांकित केलेला रासायनिक अहवाल , अपघातग्रस्त स्वतः वाहन चालक असल्यास वैध ड्रायव्हींग लायसन्स व आर सी बुकची झेरॉक्स प्रत, पोलीस अधिका-याने साक्षांकित केलेली असावी. पोस्ट मॉर्टममध्ये व्हिसेरा, प्रिझर्व्ह असे नमूद असल्यास व्हिसेरा रिपोर्ट वैद्यकीय अधिका-याने साक्षांकित केलेला असावा. अवयव निकामी झाल्याबाबतचा डॉक्टरांचे अंतिम प्रमाणपत्र फोटो, टक्केवारी , डॉक्टरांच्या सही शिक्क्यासह असणे आवश्यक आहे, दवाखान्यात ॲडमिट असल्यास दवाखान्याचे सर्व कागदपत्रे डॉक्टरांच्या सही शिक्क्यासह तसेच रोड अपघातात जखमी होवून दवाखान्यात दाखल होऊन मयत झाला असल्यास एमएलसी रिपोर्ट डॉक्टरांच्या सही शिक्क्यासह आवश्यक आहे. अपघातग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात देणारी ही योजना दिलासा देणारी आहे. 

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India