तंबाखू टाळा, आरोग्य सांभाळा !

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जगभरात दरवर्षी सुमारे साठ लाख लोक मृत्युमुखी पडतात. आपल्या देशांत ही संख्या दहा लाखांच्या आसपास आहे. विकासाच्या प्रक्रियेत अडथळा आणणाऱ्या तंबाखूच्या व्यसनांपासून दूर राहावे, त्याचे दुष्परिणाम समाजाला समजावेत यासाठी दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन पाळला जातो. त्यानिमित्त...

तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या विविध आजारामुळे जगभरात दरवर्षी सुमारे साठ लाखांच्या आसपास लोक मृत्युमुखी पडतात. त्यापैकी आपल्या देशांत सुमारे दहा लाख लोकांना जीवाला मुकावे लागते. दरवर्षी 31 मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणारे दुष्परिणामांबाबात जनजागृती करण्याचा उद्देश आहे. 

दर्यावर्दी कोलंबसबरोबरच्या खलाशांनी अमेरिकेतून तंबाखूचे कलम स्पनेमध्ये आणले. तेथून ते जगभर पसरले. सुरवातीच्या काळात तंबाखू औषधी समजली जात असे. पण सोळाव्या शतकापासून तंबाखूच्या अनिष्ट परिणामांची शंका येऊ लागली. असा तंबाखूचा काहीसा मजेशीर इतिहास आहे. पण तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे अनेक विपरित परिणाम होतात हे माहिती असूनही अशा प्रकारची व्यसन करण्याचे लोकांचे समाजातील प्रमाण वाढतच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार जगात दरवर्षी साठ लाख लोक तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे जीवाला मुकतात. त्यापैकी पन्नास लाख थेट व्यसन करीत असतात. उर्वरित दहा लाखांपैकी सहा लाख लोक पॅसिव्ह स्मोकर असतात. 

तंबाखूचे व्यसन असणाऱ्या लोकांपैकी ऐंशी टक्के लोक अल्प-कमी उत्पन्न असणाऱ्या विकसनशील देशांत आहेत. साहजिकच या देशांतील रूग्णांची संख्याही जास्त आहे. याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या त्या देशांच्या विकास प्रक्रियेवरही परिणाम होतो. तंबाखूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यां व्यक्तिमुळे त्या देशांना मनुष्यबळाला मुकावे लागते. अनेक कुटुंबे उघड्यावर पडतात. त्यांच्या पुनर्वसनाचाही प्रश्न उपस्थित होतो. तंबाखूचे व्यसन विकासातील अडथळा आहे.
तंबाखूच्या व्यसनाच्या विविध पद्धती आहेत. चुन्याबरोबर मळून खाल्ली जाते. पानात सुपारी, कात यांच्यासह मिश्रण करून तंबाखूचाही समावेश करतात. गुटखा खाणे, धूम्रपान करणे, तपकिरीच्या रूपाने तंबाखू श्वसनमार्गे ओढतात. तंबाखू जाळून त्याची मिशरी करून दातांना आणि हिरड्यांना लावली जाते. यापैकी धूम्रपान, तंबाखू खाणे आणि गुटखा खाणे यातून तंबाखूचे सेवन आधिक प्रमाणात केले जाते. गुटखा खाणे ही तर सध्या तरूणांतील व्यसन आहे. महाराष्ट्र राज्य शासनाने अलिकडेच गुटखाबंदीचा निर्णय घेऊन अतिशय चांगले आणि सकारात्मक पाऊल उचलले आहे. पण त्याची प्रभावी अंमलबजावणी अपेक्षित आहेच. त्याचबरोबर इतर राज्यांनीही असा निर्णय घेणे अपेक्षित आहे.
तंबाखूचे थेट व्यसन न करणाऱ्या लोकांनाही आता तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांना सामोरे जाव लागत आहे. तंबाखूचे व्यसन करणाऱ्या लोकांच्या संपर्कात किंवा व्यसनी लोक जेथे बहुसंख्येने असतात, अशा ठिकाणी सततच्या वावरामुळेही या आजारांना सामोरे जावे लागते. अशा रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. तंबाखूच्या धुरात सुमारे चार हजार प्रकारचे रसायने असतात. त्यापैकी 250 रसायने मानवी शरीराला हानीकारक आहेत तर पन्नास रसायनांमुळे हमखास कर्करोग होतो. सिगरेट किंवा विडीच्या धुरात कार्बन मोनोऑख्साईड, टोल्युन, अमोनिया, आर्सेनिक, कॅडमिअम, हायड्रोजन सायनाईड अशी घातक रसायने असतात.

भूक न लागणे, आतड्याची कार्यक्षमता मंदावणे, श्वसन नलिका आणि पोटात व्रण होणे, फुफ्फुस आणि श्वसन संस्थेचे वारंवार आजार होणे, रक्तदाब वाढणे, ह्रद्य आणि इतर महत्वाच्या अवयवांना रक्तपुरवठा कमी होणे. प्रदीर्घ धूम्रपानामुळे फुफ्फुसाचा कर्करोग होऊ शकतो. महिलांच्या बाबतीत गर्भात विकृ्ती निर्माण होणे, कमी वजनाचे बालक जन्माला येणे, गर्भपात होणे, मृत बालकाचा जन्म होणे आदी बाबी घडू शकतात. तंबाखूबरोबर चुना मिसळून खाल्ला जात असल्याने तोंडातील नाजूक त्वचेला व्रण पडून कर्करोग होऊ शकतो. गुटख्यातील तंबाखू किंवा तंबाखूच्या अर्कामुळे तोंडातील त्वचेवर दुष्परिणाम होतात. गुटख्याचे अतिसेवन करणाऱ्यांना काही दिवसांनी तोंड उघडणेही अशक्य होते.
तंबाखूचे व्यसन लागू नये यासाठी आणि लागले असल्यास सोडविण्यासाठी व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. तंबाखूचं व्यसन सोडण्यासाठी प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते. तंबाखूमधील निकोटीनमुळे धूम्रपान करण्याचे सोडणाऱ्या व्यक्तिंना अस्वस्थ वाटू लागते. पण हे व्यसन सोडणे शक्य आहे. धूम्रपान सोडणाऱ्या व्यक्तिंनी अस्वस्थ वाटू लागल्यास पाणी पिणे, पेपरमिंटची गोळी खाणे, शतपावली करणे असे करावे. जेणेकरून धूम्रपानाची आस नष्ट होते. नवी जीवनशैली आत्मसात करणे, वैद्यकीय उपचारांचा उपयोग करणे, व्यसनासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जवळ, घरी, कार्यालयात न ठेवणे असे विविध उपाय करून व्यसनापासून दूर राहता येते. तंबाखूच्या किंवा कोणत्याही व्यसनापासून समाज मुक्त होण्यासाठी प्रभावी लोकचळवळ उभी राहण्याची आवश्यकता आहे. 

महत्वाचे मुद्दे 

• तंबाखूच्या व्यसनामुळे दरवर्षी जगभारात सुमारे साठ लाख लोक मृत्युमुखी 
• भारतात दरवर्षी सुमारे दहा लाख लोक जीवाला मुकतात
• तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन करण्यात तरूणांची वाढती संख्या चिंताजनक
• तंबाखूच्या धुरात कार्बन मोनोऑख्साईड, टोल्युन, अमोनिया, आर्सेनिक, कॅडमिअम, हायड्रोजन सायनाईड अशी घातक रसायने
• थेट व्यसन न करताही ( पॅसिव्ह स्मोकर) तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारांना बळी पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ
• तंबाखूचे व्यसन करणाऱ्या लोकांची संख्या विकसनशील देशांत जास्त. त्याचा विकासावर परिणाम.

डॉ. कांचन चांदेकर, पुणे 

बारावी परीक्षेचा निकाल 30 मे रोजी

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरूवार दि. 30 मे रोजी जाहीर करण्यात येणार आहे. सकाळी 11 पासून मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हा निकाल ऑनलाईन पाहता येईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2013 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल http://mahresult.nic.in, www.msbshse.ac.in, www.mh-hscac.in, www.rediff.com/exams या संकेतस्थळांवर पाहता येईल.

महाराष्ट्र सर्कलसाठी बीएसएनएलच्या सेवेद्वारे मोबाईल फोनवरून निकालाबाबत माहिती कळविण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यासाठी MHHSC
टाईप करून 57766 या क्रमांकावर  एसएमएस पाठवावा, असेही मंडळाने कळविले आहे.

वन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर

अहमदनगर जिल्ह्यातील तालुका अकोले येथील संगमनेर उपवन विभागातील मौजे पट्टा किल्ला (तिरडे) येथील वन क्षेत्रात वन पर्यटन स्थळ विकसित करण्यासाठी नियोजित विकास कामांकरिता 10 कोटी एक लाख 84 हजार रुपये इतक्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

वन व गृह पर्यटन, भक्त निवास (कळसूबाई शिखर), रंधा फॉल व घोरपड माता मंदिर परिसराचा विकास, कळसूबाई शिखर व हरिश्‍चंद्र गड विद्युतीकरण, बोटी व डिजिटल कॅमेरे खरेदी, मौजे पट्टा किल्ला (तिरडे) इत्यादी विकास कामे या निधी अंतर्गत करण्यात येणार आहेत.

समूह शेती योजनेसाठी 50 लाख रुपयांचा निधी

राज्यात शेतकऱ्यांच्या समूह, गट शेतीस चालना देण्यासाठी शेतकऱ्यांचा समूह तयार करुन समूह शेती योजना राबविण्यासाठी शासनाने दहा कोटी रुपये इतक्या अनुदानास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचप्रमाणे 2012-13 या वर्षामध्ये समूह, गट शेतीस चालना देण्याच्या योजनेची अंमलबजावणी राज्यातील 33 जिल्ह्यात करण्यासाठी अर्थसंकल्पित तरतुदीच्या पाच टक्के म्हणजेच 50 लाख रुपये इतक्या रक्कमेस शासनाने वित्तीय मान्यता दिली आहे.

बाजारपेठेतील स्पर्धात्मक वातावरणाचा फायदा घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्यांचे संघटन व आदर्शवत शेती पद्धतीचा वापर करुन उत्पादन व विक्री व्यवस्था निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्या अनुषंगाने शेती आधारित व शेती संलग्न उद्योगांना चालना देणे आणि त्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास अधिक भाव मिळवून देणे हे या योजनेमागील उद्दिष्ट आहे.

या योजनेअंतर्गत कृषी विस्तारामार्फत आधुनिक शेती तंत्रज्ञान शेतकऱ्यांना एकत्रित गटाच्या माध्यमातून उपलब्ध करुन देता येणार आहे. त्याचप्रमाणे सामाजिक प्रश्नांची माहिती घेऊन शेतकऱ्यांचे वैयक्तिक प्रश्नसुद्धा सोडविण्यासाठी चालना मिळणार आहे. गटातील शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीमार्फत संपर्क साधून हवामान, पीक उत्पादन, तंत्रज्ञान, कीड व रोग सर्वेक्षण इत्यादी बाबत सतत अद्ययावत माहिती देणे शक्य होणार आहे. तसेच गटाच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आल्यामुळे त्यांचे संघटन होऊन गटामार्फत प्राथमिक प्रक्रिया विक्री यामध्ये शेतकरी सहभाग घेऊन अधिकाधिक उत्पन्न मिळण्यासाठी सहकार्य करतील.

राज्यातील 451 ग्रामपंचायतींसाठी 23 जूनला मतदान

जुलै ते सप्टेंबर 2013 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 451 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी व काही रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी 23 जून रोजी मतदान होणार असून, सार्वत्रिक निवडणुकांसाठी संबंधित ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात व पोटनिवडणुकांसाठी संबंधित प्रभागांत आज मध्यरात्री पासून आचारसंहिता लागू होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

या निवडणुकीसाठी 15 एप्रिल 2013 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाईल. नामनिर्देशनपत्रे 4 ते 8 जून 2013 या कालावधीत दिली व स्वीकारली जातील. 10 जून 2013 रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. नामनिर्देशनपत्रे  12 जून 2013 पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी चिन्हांचे वाटप होईल व अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाईल. 23 जून 2013 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जून 2013 रोजी मतमोजणी होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तींकडे जातपडताळणी समितीने दिलेले जातवैधता प्रमाणपत्र नसल्यास नामनिर्देशनपत्रासोबत या समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाचा पुरावा जोडणे आवश्यक राहील. त्याचबरोबर निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे विहित नमुन्यातील हमीपत्रही उमेदवाराने देणे बंधनकारक असेल.

सर्व ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राद्वारे (EVM) मतदान घेण्यात येईल. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा दैनंदिन हिशोब सादर करणे आवश्यक राहील. तसेच निवडणुकीनंतर 30 दिवसांच्या आत एकूण खर्चाची माहिती सादर करावी लागेल. ती मुदतीत सादर न करणाऱ्या उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात येते, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

जिल्हानिहाय सार्वत्रिक निवडणूका होणाऱ्या ग्रामपंचायतींची संख्या अशी : ठाणे-9, रायगड-156, सिंधुदुर्ग-2, नाशिक-15, धुळे-6, जळगाव-7, अहमदनगर-72, पुणे-53, सोलापूर-2, सातारा-12, सांगली-30, कोल्हापूर-52, औरंगाबाद-2, नांदेड-7, परभणी-1, उस्मानाबाद-3, लातूर-5, अकोला-3, यवतमाळ-5, वर्धा-5, चंद्रपूर-1, गडचिरोली-3, एकूण-451.

शेतीला पूरक असा मधमाशा पालन उघोग

शेती व फळबागायतीला पुरक व इतर कोणत्याही उद्योगाशी स्पर्धा न करणारा मधमाशा पालन हा एकमेव उद्योग आहे.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मधमाशा पालन उद्योग राबविला जातो. योजना अंमलबजावणी मध्ये अहमदनगर जिल्हयात अकोले व संगमनेर ही दोन तालुके पश्चिमघाट विकास कार्यक्रमांतर्गत राबाविली जातात. मधमाशा पालन हा उद्योग शेतीपुरक व्यवसाय असून व्यवसाय सुरु करु इच्छिणा-या शेतक-यास जागा, इमारत, वीज, पाणी यासाठी गुंतवणूक करण्याची आवश्यकता नाही. संपूर्ण देशी तंत्रज्ञ व लहानापासून थोरापर्यन्त सर्वांना हा व्यवसाय करता येतो. त्यामुळे इतर कोणत्याही उद्योगाशी स्पर्धा न करणारा हा एकमेव उद्योग आहे.

मधमाशा मध तयार करतात. मध हे एक अत्यंत शक्तीदायक व पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशा मेण देतात हे सौदर्य प्रसाधने, औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. मधमाशा पासून मिळणारे राजान्न (रॉयल जेली, दंश, विष, व्हिनम) पराग (पोलन) रोंगणे (प्रो पॉलीस) पदार्थांना उच्चप्रतीचे औषधमुल्य आहे. परागी भवनाव्दारे शेती, पिके, फळबागायती पिकांच्या उत्पादनात भरीव वाढीस मदत होते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी व नैसर्गिक संपत्तीचे जनत करण्यासाठी त्याचा फायदा होतो. जमिनीची होणारी धुप आणि काही ठिकाणी शेतीत पाण्याचा अतिरिक्त वापर या गोष्टीमुळे जमिनीचा पोत कमी होणे आणि बी-बियाणे, खताच्या वाढत्या किंमती, रोजमजूरी, वाढते दर या सा-या खर्चामुळे शेती उत्पादन आणि होणारा खर्च याचे व्यस्त होत चाललेले प्रमाण या दृष्टीने मधमाशा पालन हा उद्योग कमी खर्चात, शेतीपुरक व्यवसाय ज्यातुन शेती उत्पादन वाढ या दृष्टीने उपयुक्त उद्योग म्हणून मधमाशा पालन उद्योगाकडे पहावे लागेल.

अहमदनगर जिल्हयात पश्चिमघाट विकास कार्यक्रमांतर्गत अकोले व संगमनेर या दोन तालुक्याचा समावेश आहे. तथापि जिल्हयातील अन्य बारा तालुक्यातील शेतकरीही या उद्योगाचे फायदे मिळावेत या दृष्टीने जिल्हा वार्षिक योजनेतून मधपाळासाठी फायदे मिळवून देण्यात येणार आहेत. या संदर्भात शेतक-यांनी त्याचे शेतीशी जोडधंदा म्हणून उद्योग करावयाचे ठरविल्यास त्यास मधपाळाचे 10 दिवसाचे प्रशिक्षण मधसंचालनालय महाबळेश्वमर येथे दिले जाते. त्यानंतर त्यास मध उद्योगासाठी आवश्यक असलेली साहित्य मधपेट्या (वसाहतीसह) मधयंत्र व अन्य साहित्य रु 42700/- पुरविण्यात येते. यात प्रशिक्षण विनामूल्य तसेच साहित्य खरेदीवर 10,000/- पर्यन्तचे अनुदान पश्चिमघाट विकास योजना/ जिल्हा वार्षिक योजना यांचे माध्यमातून दिले जाते. शिवाय शेतक-यास मधासाठी हमी भाव रु. 120/- प्रति किलो निर्धा?रीत केला असून मंडळाकडून मध खरेदी केला जातो.

तेव्हा ज्या शेतक-यांना मधमाशा पालन उद्योग सुरु करावयाचा आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे जिल्हा कार्यालय, अहमदनगर (व्दारा- जिल्हा उद्योग केंद्र, अहमदनगर) यांचेकडे अथवा तालुका विविध कार्यकारी सहकारी ग्रामोद्योग संघाच्या कार्यालयाकडे संपर्क साधावा. या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0241-2353410 असा आहे.

नळाला बसवा वॉटर मिटर अर्ध्यावर आणा पाणी वापर

गावात झाडं कुणी लावायची ?
लावली तर ती कुणी जगवायची ?
घर- गावपरिसर कुणी स्वच्छ ठेवायचा?
पाण्याचा वापर काटकसरीनं कसा करायचा?
सांडपाणी शुद्ध करून पुन्हा वापरायचं की फेकून द्यायचं?
गावातल्या पर्यावरणाचे रक्षण कुणी करायचं ?

या आणि या सारख्या अनेक प्रश्नांना चोख उत्तर दिलेय
ते सांगली जिल्ह्याच्या वाळवा/ इस्लामपूर तालुक्यातील कोरेगावनं

ते ही पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीतून.

वारणा नदीच्या काठावर 20 एकरावर वसलेल्या या गावाला महापूराचा तडाखा बसला आणि 80 टक्के गाव पाण्याखाली जाऊन गावाचे खुप नुकसान झाले. मग स्व. राजारामबापू पाटील, स्व. वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वातून गावाचा आखीव रेखीव मास्टर प्लॅन तयार झाला आणि गाव मुळ गावापासून 2.5 कि.मी अंतरावर नव्याने सुनियोजितपणे वसलं. 840 कुटुंब आणि एकूण 5026 लोकसंख्या असलेल्या गावातील मुख्य रस्ते 33 फुट तर गावांतर्गत रस्ते 12 फुट रुंदीचे आहेत. गावची भौगोलिक आणि आर्थिक परिस्थिती चांगली असून बहुतांश बागायती क्षेत्र ऊसाचे आहे. गावात निनाईदेवीच्या प्राचीन मंदिराबरोबरच हनुमान आणि विठ्ठल- रुक्मिणीचे प्रशस्त देवालय आहे. लोकनेते राजारामबापू पाटील याच्या नावे एक सुंदर उद्यान उभारण्यात आले असून 1984 पासून गावात दारूबंदी आहे.

गावात पूर्वी पिण्यासाठी दररोज 6 लाख लिटर पाणी लागायचं. पण ग्रामपंचायतीने पाण्याचे सुयोग्य नियोजन करीत प्रत्येक घरातील नळावर वॉटर मिटर बसवलं आणि आता केवळ 3 लाख लिटरमध्ये संपूर्ण गावाची तहान भागते. म्हणजेच गावाचा पाणी वापर अर्ध्यावर आला आणि गावात पाण्याची मोठी बचत झाली. पाण्याची बचत झाली तस गावकऱ्यांची पाणीपट्टीही कमी झाली. गावात 815 नळजोडण्या आहेत. यश महिला बचतगटाद्वारे गावात तिमाही पद्धतीने पाणीपट्टी वसुल केली जात असल्याने कर वसुलीचे प्रमाण 100 टक्के आहे.

गावाने 2004-05 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात तर 2005-06 मध्ये निर्मलग्राम अभियानात यश मिळवून स्वच्छ आणि सुंदर गावाचा बहुमान मिळवला. पुढे पुरस्कारांची ही मालिका चालूच राहिली आणि विकास कामे करतांना गावाने पुन्हा कधीच मागे वळून पाहिले नाही. गाव 2006-07 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात पहिलं आलं. घरात नळ आणि दारात शौचालय याप्रमाणे काम करून गावाने विकासासाठी आम्ही नेहमी परिवर्तनशील आणि आग्रही आहोत हे दाखवून दिलं.

ग्रामसभे ने घातलेल्या निर्बंधानुसार गावात प्लॉस्टिक वापर नाही. गावातील सगळा कचरा घंटागाडीतून एका ठिकाणी जमा केला जातो. त्याद्वारे कंपोस्ट खताची निर्मिती करून त्याचा वापर शेतीसाठी आणि लावलेल्या झाडांसाठी केला जातो.

प्रत्येक घरातील सांडपाणी एका नाल्याद्वारे संकलित केलं जातं. दररोज साधारणत: 2 हजार लिटर संकलित होणाऱ्या या पाण्याचे शुद्धीकरण करून ते पाणी शेतीसाठी विकले जाते. यातून काही प्रमाणात का होईना ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळतं.

सर्व पथदिवे सी.एफ.एल बल्बचे आहेत. मुख्य ठिकाणी 20 सौरदिवे लावण्यात आले आहेत तर गावात 467 बायोगॅस आहेत. गावात एक हायस्कुल, दोन प्राथमिक शाळा आणि पाच अंगणवाड्या आहेत. यातील 153 क्रमांच्या अंगणवाडीला "जिल्हास्तरीय आदर्श अंगणवाडी" पुरस्कार मिळाला आहे.

जलस्वराज्य प्रकल्प वेळेत पूर्ण केल्याबद्दल गावाला प्रोत्साहनात्मक अनुदान मिळाले असून त्यातूनही गाव विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत. गावाचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे गावतील उद्यमशील महिला. गावातील बचतगटांची संख्या 25. यातील भाग्य लक्ष्मी महिला बचतगटाने ग्रामपंचायत, युनिसेफ आणि महाराष्ट्र राज्य उद्योजकता विकास महामंडळ यांच्या सहकार्याने "निर्मल सॅनटरी पॅड" उत्पादनाचा उद्योग सुरु केला. त्याचा फायदा गावातील महिलांबरोबरच इतर स्त्रियांनाही झाला. केमिकलमुक्त आणि महिलांच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घेऊन हे उत्पादन तयार करण्यात आल्याने प्रकल्प कौतूकाचा विषय ठरला असून जिल्हा, राज्य आणि इतर देशातूनही प्रकल्पाला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावाने पेरुची आणि इतर 5030 झाडं लावली. प्रत्येक झाडाला टॅगींग करण्यात आलं, झाडाचा क्रमांक, त्याचे शास्त्रीय नाव, उपयोगातील नाव, त्याचे स्वरूप या सर्व गोष्टींची माहिती त्यावर दिल्याने झाडांच्या नावाबरोबर त्याची वैशिष्टयही लोकांना कळत आहेत.सर्व झाडांना ट्रीगार्ड आणि काटेरी कुंपणाने संरक्षण देण्यात आलं आहे. ग्रामपंचायतीला पेरुच्या झाडापासून वार्षिक 80 हजार तर रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करण्यात आलेल्या 20 हजार रोपांच्या रोपवाटिकेपासून 2 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न अपेक्षित आहे.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पूर्ण करावयाचे तीनही वर्षांचे निकष पहिल्याच वर्षी पूर्ण केल्याने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते गावाला "पर्यावरण विकासरत्न पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले आहे. माजी सरपंच व्यंकटराव पाटील आणि तत्कालीन ग्रामसेवक ए.एस. अत्तार यांनी गाव विकासाची समृद्ध पायाभरणी केली तर विद्यमान सरपंच श्रीमती सुरैय्या अमीन मुलानी आणि गटविकास अधिकारी एस.व्ही माळी यांनी ही धुरा समर्थपणे पुढे नेतांना गाव विकासाचे भविष्यकालीन नियोजन आणि दिशाही निश्चित केली आहे.

डॉ. सुरेखा मुळे

अगरबत्ती व्यवसायाने दिली दिशा

स्वर्णजयंती ग्रामस्वरोजगार योजनेने महिलांमध्ये खऱ्या अर्थाने उद्योगी भावना निर्माण करून त्यांना आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करण्यास मोलाची मदत केली आहे. केंद्र शासनाच्यावतीने आणि राज्याच्या सहकार्याने राबविण्यात येत असलेल्या या योजनेमुळे लाखो महिला उद्योग व्यवसायात आल्या आहे. योजनेच्या आधारे गावागावात आर्थिक समृध्दी निर्माण झाली आहे.

महिलांच्या हातात पैसा आला तरच घरे, गावे खऱ्या अर्थाने समृध्द होतील, असे म्हटले जाते. ती किमया या योजनेमुळे साध्य झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून अशाच प्रकारची प्रगती करत अनेक महिला बचतगटांनी जिल्ह्यात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच यवतमाळ शहरानजीक उमरसरा या गावातील संघ महिला बचतगटाचा उल्लेख करावा लागेल. अगरबत्ती व्यवसायातून गटाच्या महिलांनी इतर महिलांसाठी चांगला आदर्श निर्माण केला आहे.

उमरसरा येथील 12 महिलांनी एकत्र येऊन 2005 साली बचतगटाची स्थापन केली. सुरूवातीस महिलांनी मासिक 50 रूपये बचतीतून सुरूवात केली. या बचतीतून जमा झालेल्या निधीतून काहीतरी उद्योग व्यवसाय सुरू करण्याचा मनोदय गटातील काही महिलांनी व्यक्त केला. परंतु पारंपारीक उद्योगांना न निवडता काहीतरी वेगळा उद्योग सुरू करण्याची इच्छा महिलांनी व्यक्त केली. घराघरात अगरबत्तीचा वापर होतो. हा व्यवसाय सुरू केल्यास त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळू शकते. त्यामुळे अगरबत्ती उद्योग निवडण्यात आला. या व्यवसायाचे प्रशिक्षण घेण्यासाठी निलीमा राऊत यांच्यासह गटातील अन्य तीन महिलांनी नागपुर गाठले. नागपुर येथील एका अगरबत्ती कारखान्यात या महिलांनी प्रशिक्षण घेतल्यानंतर यवतमाळात घरीच अगरबत्ती निर्मीतीस महिलांनी सुरूवात केली. इतर महिलांनाही प्रशिक्षण देण्यात आले. महिलांचे परिश्रम आणि मेहनतीमुळे या व्यवसायाने आता उत्तुंग भरारी घेतली आहे.

गेल्या पाच वर्षांपासून महिलांचा हा अगरबत्ती व्यवसाय यशस्वीपणे सुरू आहे. या व्यवसायासाठी गटाने २०१० साली महाराष्ट्र बॅंकेकडून १० हजार रूपयाचे कर्ज घेतले होते. त्यानंतर पुन्हा एक लाख रूपयाचे कर्ज घेऊन उद्योगाला महिलांनी व्यापक स्वरूप दिले. कर्जाची परतफेड करून महिलांनी अल्पावधीतच हा व्यवसाय नफ्यात आणला. आजमितीस मासिक १० हजार रूपयाचे उत्पन्न गटाला या व्यवसायातून मिळत असल्याचे निलीमा राऊत यांनी सांगितले. साध्या अगरबत्ती निर्मीतीचे प्रशिक्षण नागपुर येथे घेतल्यानंतर सुगंधी अगरबत्ती बनविण्याचे प्रशिक्षण यवतमाळ येथे पंचायत समितीमार्फत आयोजित प्रशिक्षणात घेतले. महिला आपल्या उद्योगातून आता दहा प्रकारच्या सुगंधी अगरबत्ती तयार करतात. या अगरबत्तीला सर्वत्र चांगली मागणी आहे. या व्यवसायासाठी लागणारा कच्चा माल महिला नागपुरहुन मागवितात.

गटातील महिला आपापल्या घरीच फावल्यावेळात अगरबत्ती निर्मीती करतात. त्यामुळे प्रत्येक महिला दरदिवशी शंभर रूपये कमवितात. महिन्याला २५ हजार रूपयाच्या आसपास अगरबत्ती निर्माण करून ती विकल्या जाते. सुगंधी अगरबत्ती यवतमाळ शहरात तर कच्ची अगरबत्ती माहुर, नेर आदी ठिकाणी विकल्या जात असल्याचे श्रीमती राऊत यांनी सांगितले.

मंगेश वरकड

ग्रामीण जिवनोन्नती अभियान नवोपक्रम मंच


ग्रामीण दारिद्र्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जिवनोन्नती अभियानाची स्थापना केली आहे. या अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाची स्थापना केली आहे. ग्रामीण भागातील गरीबांच्या सक्षम संस्था उभारणे, गरीबांची व त्यांच्या संस्थांची क्षमता व कौशल्यवृद्धी करणे आणि शाश्वत उपजिविकेची साधने उपलब्ध करून देत त्यांना दारिद्र्याच्या बाहेर येण्यासाठी मदत करणे हे अभियानाचे प्रमुख उद्दीष्ट आहे.

महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यातील 36 तालुक्यात जागतिक बँक प्रणित अर्थसहाय्यातून राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाच्या माध्यमातून केंद्रीत पद्धतीने काम करण्यात येत आहे. उर्वरीत जिल्ह्यातही टप्प्याटप्प्याने अशाच पद्धतीने अभियान राबविण्यात येणार आहे.

पुरोगामी महाराष्ट्रात यापूर्वीदेखील अनेक शासकीय, अशासकीय, सामाजिक, सहकारी व न्यास संस्थांनी ग्रामीण विकासाच्या क्षेत्रात भरीव कार्य केले आहे. दारिद्र्य निर्मुलनासाठी केलेले अनेक प्रयोगही यशस्वी ठरले आहेत. अशाच प्रयोगांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती नवोप्रक्रम मंच 2013 स्थापन करण्यात आला आहे. सामाजिक उद्योजकतेसाठी वातावरण तयार करणे तसेच उपजिवीका निर्मितीसाठी नव्या, मापता येणाऱ्या, टिकाऊ आणि मोठ्या प्रमाणावर करता येण्यासारख्या उपक्रमांना उत्तेजन देणे हे या उपक्रमाचे उद्देश आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या ध्येयधोरणांनुसार नवोपक्रम म्हणजे सध्याची वस्तू अथवा सेवा, प्रक्रिया, परिस्थिती किंवा प्रतिमान यांना छेदणारा किंवा चाकोरीपेक्षा वेगळा असा महत्वाचा शोध. समाजाच्या उन्नतीसाठी आणि विविध समस्यांचे प्रभावीपणे निराकरण करण्यासाठी नवोपक्रमाच्या माध्यमातून उचित दृष्टीकोन विकसीत करता येणार आहे.

वेगवेगळ्या पातळीवर ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्था आणि प्रयोगांचा समन्वय या मंचाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आहे. जीवनोन्नतीच्या क्षेत्रातील चांगल्या प्रयोगांना वित्तीय पाठबळ देऊन त्यांचे सार्वत्रिकीकरण करणेदेखील याद्वारे शक्य होणार आहे.

महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती नवोपक्रम मंच 2013 अंतर्गत सात प्रवर्गाचा विचार केला गेलेला आहे. सामाजिक सहभागांतर्गत अपंग, वयोवृध्द, आदिवासी, दलित, निराधार, स्त्रिया इत्यादी सारख्या दुर्बल घटकांतील लोकांना सामावून घेणारे उपक्रम असतील. तर आर्थिक सहभागांतर्गत ज्या आर्थिक उपाय योजनांमुळे कार्यक्षमता वाढेल आणि आर्थिक व्यवहार करण्यासाठी लागणारा खर्चही कमी होईल अशा उपक्रमांचा समावेश करता येईल. शेती, मत्स्यव्यवसाय, वनोद्योग आणि पशुपालन या व्यवसायांबरोबरच ते करण्याची कार्यक्षमता, उत्पादन सुगीच्या काळातील नियोजन, स्थानिक पातळीवरील मूल्यवृध्दी, बाजारपेठांमध्ये प्रवेश यामधील नवोपक्रम उपजीविका प्रवर्गात समाविष्ट आहेत.

तांत्रित नवोप्रकमात माहिती आणि संपर्क (आयसीटी), इंधनाची बचत करणारी, अल्प खर्चाची, सहज वापरता येण्याजोगी आणि टिकाऊ अवजारे आणि यंत्रसामुग्री तंत्रज्ञानविषयक नवोपक्रम यांचा समावेश होतो. यात हरित तंत्रज्ञान, ग्रामीण भागातील उर्जा संसाधने आणि पर्यावरणातील बदल याबद्दलचे उपक्रम यांचाही समावेश होतो. तर माध्यमे व संपर्क यंत्रणा प्रवर्गांतर्गत पारंपरिक प्रकारची संपर्क यंत्रणा, वर्तणुकीतील बदलांबाबतचा संवाद, प्रभावी आणि सर्जनशील प्रकारे माहितीचे आदानप्रदान, सोशल नेटवर्किंग आणि इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, कम्युनिटी रेडिओ इत्यादीचा समावेश आहे. अन्नसुरक्षेतील वाढ, आरोग्य, शिक्षण, पाणी आणि स्वच्छताविषयक सुविधा यासारख्या सार्वजनिक सेवांच्या उपलब्धीचा समावेश सार्वजनिक क्षेत्रातील प्रवर्गामध्ये होतो. तर सामाजिक उद्योजकता व समावेशक व्यावसायिक प्रारुपे अंतर्गत सामाजिक सहभाग असणारे उद्योग, सुयोग्य व्यापारपध्दती साठीचे उपक्रम, आकाराने छोट्या आणि अल्पसंख्य उत्पादकांसाठी मूल्यसाखळी भागीदारीद्वारे खाजगी क्षेत्रांची सामाजिक संस्थांसोबतची भागीदारी वाढविण्यासाठी विशेष भर देणाऱ्या उपक्रमांचा समावेश होतो.

या नवोपक्रम मंचात महाराष्ट्रात कार्य करणाऱ्या शासकीय (शासनाचे विभाग आणि शिक्षणसंस्था) अशासकीय वा खाजगी (विशेषत: सामाजिक सहभाग असणारे उद्योग) आणि नागरी संघटना (सिव्हील सोसायटी) यांना भाग घेता येईल.

पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकास अनुक्रमे पाच लाख, तीन लाख, दोन लाख रुपये, प्रमाणपत्र व मानचिन्ह देण्यात येईल. तसेच प्रत्यक प्रवर्गातील एका उत्तम नवोपक्रमाला 1 लाख रुपये, प्रमाणपत्र व मानचिन्ह दिले जाईल. याशिवाय परीक्षकांनी निवडलेल्या तीन नवोपक्रमांना एक लाख रुपये, प्रमाणपत्र व मानचिन्ह दिले जाईल. अंतिम फेरीत पोचणाऱ्या इतर सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळेल.

स्पर्धेसाठीचा अर्ज www.mrlif@msrlm.org आणि www.tiss.edu या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 15 मे 2013 पर्यंत हे अर्ज सादर करावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी 022-27562552 या दूरध्वनी क्रमांकावर किंवा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांचेशी संपर्क साधता येईल. केवळ स्पर्धा म्हणून नव्हे तर ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्याच्या प्रयत्नात येागदान म्हणून उपक्रमात सहभाग घ्यायलाच हवा.

-जिल्हा माहिती कार्यालय, रत्नागिरी

झाडे लावा प्रगती साधा

आज पर्यावरणाची हानी होत असल्याने दुष्काळासारखी संकटे उभी राहात असल्याचे चित्र दिसत आहे. वृक्षारोपण ही काळाची गरज आहे. केवळ वृक्षलागवड न करता वृक्षांचे संगोपनही तितकेच महत्वाचे आहे. हातनूरमध्ये ग्रामस्थांच्या सहभागातून हे शक्य झाले आहे. हातनूरने राज्यात स्वत:चा असा एक पॅटर्न तयार केला आहे. ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम यासह दोन वेळा वनश्री पुरस्कारही मिळविला आहे. मात्र, कोणतेही अभियान केवळ पुरस्कारापुरते न राबविता त्यामध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न या गावाने केला आहे.

सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुका भीषण दुष्काळात होरपळतो आहे. गावोगावी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरु आहेत. वाड्या-वस्त्यांवर लोक पाणी पाणी करत असताना याच तालुक्यातील हातनूर (ता. तासगाव) गावाने दुष्काळा विरुध्दची लढाई नेटाने लढली आहे. गावातील सांडपाणी गोळा करुन त्यावर तब्बल 12 ते 15 हजार झाडे जगविण्याचा प्रयत्न केला आहे.

गेल्या तीन चार वर्षात हातनूर येथे अत्यंत नियोजनबध्द रीतीने 30 हजारांवर झाडे लावली आहेत. गावात आणि परिसरातील होनाई देवीच्या मंदिर परिसरातही मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले आहे. मात्र, सलग दोन वर्षे हातनूर आणि परिसर दुष्काळाला तोंड देत असल्याने जेथे माणसाला पाणी प्यायला मिळत नाही, तेथे झाडे कशी जगवायची ?असा प्रश्न निर्माण झाला. माणसांच्या पाण्याच्या प्रश्न सुटला आणि माणसाने झाडांच्या पाण्याचाही प्रश्न सोडविला. गेली दोन वर्षे उन्हाळ्यामध्ये हातनूर ग्रामपंचायत छोट्या टँकरने प्रत्येक झाडाला पाणी घालून जगविण्याचा प्रयत्न करते आहे. हा प्रयत्न कमालीचा यशस्वी झाल्याचे चित्र आज ऐन उन्हाळ्यात हातनूरमध्ये पाहावयास मिळत आहे.

ग्रामपंचायतीने सांडपाण्याचा पुनर्वापर करुन झाडे जगविण्याचा प्रयोग केला आहे. गावातील दोन मोठ्या गटारातील पाणी एका ठिकाणी एकत्र केले आहे, त्यातून त्या पाण्याचे तीन वेगवेगळ्या टाक्यांमध्ये शुध्दीकरण करुन दहा हजार लिटरच्या एका टाकीत एकत्र केले आहे तेथून मोटारीने पाणी उपसून छोट्या टेंपोतील पाच हजार लिटरच्या टाकीमध्ये हे पाणी टाकून ते पाणी पाईपव्दारे आवश्यक त्या झाडांना दिले जाते. दिवसभरात 15 ते 20 हजार लिटर पाणी झाडांना घातले जाते. छोट्या टेंपोचा देखभाल आणि डिझेल खर्च ग्रामपंचायतीच्या खर्चातून केला जातो आहे. काही ठिकाणी हेच पाणी उंचावर एका टाकीतून ठिबकव्दारे झाडांना दिले जाते. गावापासून जवळच असलेल्या होनाईच्या डोंगरावरही मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. उंचावर नेवून एका टाकीतून पाईपलाइनव्दारे तेथील झाडांना पाणी दिले जात आहे.गेल्या तीन वर्षात गावात रस्त्याकडेला, होनाई देवी मंदिर परिसर, गावातील रस्त्यांकडेला, दलितवस्तीमध्ये अशी तब्बल 30 हजार झाडे लावण्यात आली आहेत. त्यापैकी 12 ते 15 हजार झाडे मोठी झाल्याने पाणी द्यावे लागत नाही. मात्र छोट्या झाडांना पाणी देण्याचे काम केले जाते. या सर्व झाडांचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवण्यात आले आहे. परिणामी आज ऐन दुष्काळात बहरलेली झाडे पाहून मन मोहरुन जाते.

दिलीप घाटगे, माहिती अधिकारी,सांगली

मुनादी झाली इको व्हिलेजची स्किम गावात आली


ऐका हो ऐकाSSSSSSS
शाळकरी. . . गावकरी. . .
मानाचे मानकरी. . .
लहानग्यानो ऐका. . . मोठ्यांनो ऐका. . .

गावाच्या भल्याची एक चांगली गोष्ट ऐका. . .

झाडाचा उपयोग काय ?

1.आपल्या जगण्याला ऑक्सीजन देतं
2. आपल्याला शुद्ध हवा देतं
3. जमीनीत पाणी जिरवायला मदत करतं
4. उन्हा-तान्हात सावली देतं
5. आपल्याला, मुला-बाळांना फळ-फुल देतं

मग झाडं लावायची का तोडायची ?

लावायची SSSSS. .. लावायची . . .SSSSS

तर मग मित्रानो, आता आपल्या गावातल्या लोकांएवढी झाडं लावायची. . नुसतीच लावायची नाही तर ती जगवायची. . .
गावातील लोकांएवढी झाडं ?
अरे म्हणजे गावात जेवढे लोक तेवढी झाडं. . .
अस्स. . . अस्स. . . मग हे कवा सांगणार. . . .

तु पुर्ण ऐकशील तर नं. . . यामुळं काय होईल गावकऱ्यांनो, आपला गाव हिरवगार होऊन सुंदर दिस्सल अन् योजनेत भाग घेऊन , चांगलं काम केलं तर

तर काय?

अरे हो हो. . . किती घाई करशील?
बरं . . . . बरं. . .
तर आपल्या गावाला ईकासासाठी पैसा देखील मिळलं. . .

तर मग राबवायची ही योजना आपल्या गावात ?
व्हय. . . पण योजनेचं नाव तरी काय
पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजना. . .

म्हणजी " इको व्हिलेज" म्हण की. . .
अरे वा. . . तुला तर योजनेचं इंग्रजी नाव बी माहितीय. .

मग, ती योजना हायच तशी झक्कास SSSSS गाव ईकासाची इतकी चांगली योजना दुसरी कुठलीच नसल बघ. . .
मग ठरलं तर. . . गावात ही योजना राबवायची, कर गोळा करायचा, प्लॅस्टिक बंदी करायची, गावातला कचरा साफ करून गाव स्वच्छ करायचे अन् गावातील सांडपाण्याचा पुनर्वापर करीत गाव हिरवगार करायचं. . . करणार नं. . . .
व्हय . . . व्हय करणार म्हणजे करणारच . . .

तर मग बायानों, बाबानो, शाळेतल्या मुलांनो,
इको व्हिलेज योजना गावात राबविण्याचा इचार करूया पक्का. . .अन् गावाच्या ईकासावर मारू या शिक्का. . . ऐका हो ऐका.SSSSSS

नशिरपूर गावात अशी मुनादी (दवंडी) झाली अन् सगळा गाव एक होऊन कामाला लागला. अमरावती जिल्ह्याच्या मोर्शी तालुक्यातील नशिरपूर हे 110 उंबऱ्यांचं 382 लोकसंख्या असलेलं गाव. केंद्र शासनाची असो की राज्य शासनाची. गाव विकासाची कुठलीही योजना आली की, अशी मुनादी देऊन गावकऱ्यांना तिची सविस्तर माहिती दिली जाते. मग योजनेचा लाभ घेण्यासाठी, अभियानात आणि स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी ग्रामसभेत चर्चा होते. अख्खा गाव एकत्र बसून गाव विकासाची दिशा ठरवतो.

अपर वर्धा धरणाच्या डाव्या- उजव्या कालव्याच्या मध्यभागी वसलेलं, स्वच्छ, समृद्ध आणि हिरवाईने नटलेलं गाव नशिरपूर.
उघड्यावर वाहणारी गटारे, अस्वच्छता आणि जागोजाग दिसून येणारा कचरा हे गावाचं चित्र पालटलं ते संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानाने. गावानं श्रमदानातून, विविध योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीतून सुधारणा घडवून आणली आणि गावाचं रुपच बदललं. आज गावात चांगली आरोग्य सेवा उपलब्ध असून पक्के रस्ते, पथदिवे आणि पाण्याची उत्तम सोय आहे. गावात स्वच्छता आहे म्हणून आरोग्य आहे. मागच्या 10 ते 12 वर्षात गावात एकाही साथीच्या रोगाची लागण झालेली नाही असं सांगतांना गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून येणारा आनंद काही वेगळाच आहे.

गावात चौथीपर्यंत जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. एक अंगणवाडी आणि एक ग्रंथालयही आहे. स्वच्छता अभियानाने गावाला वैयक्तिक स्वच्छतेबरोबर परिसर आणि गाव स्वच्छतेचे संस्कार दिल्याने गाव एकदम स्वच्छ असून हिरवाईने नटलेला आहे.

पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावाने 600 झाडं लावली. त्यातली 450 झाडं जगली. सगळ्या झाडांना क्रमांक देण्यात आले असून 80 टक्के झाडांना ट्रीगार्ड आहे तर 20 टक्के झाडांना काटेरी कुंपण लावून त्यांचे रक्षण करण्यात आले आहे. गावात उत्तम कोंडवाडा आहे. गावच्या सभोवती, ग्रामपंचायतीच्या जागेत ही वृक्ष लागवड करण्यात आली आहे. शेतीविकासासाठी शाश्वत पाणी गरजेचे आहे हे लक्षात घेऊन सहकारी सोसायटीमार्फत कालव्यातून शेतीला पाणी पुरवठा केला जातो.

गावातील गाळ, कचरा गावाबाहेर एका खड्डयात जमा करण्यात येतो. त्याद्वारे गावातील शेतीसाठी कंपोस्ट खताची निर्मिती करण्यात येते. गावातील कर वसुली योजनेतील निकषानुसार असून ती 80 टक्के एवढी आहे. नशिरपूर गावाला कुपनलिकेद्वारे पाण्याचा पुरवठा केला जातो. त्यासाठी हे पाणी एका टाकीत टाकून तेथून पाईपलाईन द्वारे पाणी घरापर्यंत पोहोचवले जाते. गावात एक दिवसाआड साधारणत: तीन हजार लिटरपर्यंत सांडपाण्याची निर्मिती होते. हे पाणी भूमीगत गटारातून गावाबाहेरील एका शेतात सोडण्यात आलं असून एका शेतकऱ्याची जमीन त्याद्वारे ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चांगलं काम करायचं, योजनेत सहभागी व्हायचं आणि बक्षीस मिळवायचं ही आता गावची परंपरा झाली असून त्यासाठी प्रत्येक गावकरी प्रयत्नशील असतो. आतापर्यंत गावाला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान, निर्मल ग्राम अभियान आणि तंटामुक्त ग्राम अभियानात, पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत पुरस्कार मिळाले आहेत. कुटुंब कल्याण कार्यक्रमात चांगले काम केल्याबद्दल गावाला आबासाहेब खेडकर पुरस्कार देखील मिळाला आहे. गावात नावाला तंटा नाही. उदबत्ती, मेणबत्ती आणि शेळी उद्योगातून गावातील बचतगटांना स्वावलंबनाचा आर्थिक सुंगध लाभला आहे.

" एक गाव एक गणपती" परंपरेचा पुजक असलेल्या या गावात व्यसनाला प्रवेश नाही. गावकऱ्यांच्या मदतीने ग्रामपंचायत आवारात परसबाग तयार करण्यात आली असून आमच्या ग्रामपंचायतीचा संपूर्ण कारभार संगणकावर केला जात असल्याचा अभिमान ग्रामसेवक श्री. वानखेडे आणि सरपंच श्रीमती संगीता ठाकरे यांच्या शब्दा शब्दांमधून डोकावत राहतो.

संगणकीकृत ग्रामपंचायतीचे फायदे आज गावातील लोकांना होत असून गावकऱ्यांना गावातच 3 ते 4 प्रकारचे दाखले उपलब्ध आहेत. त्यामुळे त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम याची बचत होत आहे. ही संख्या आम्ही लवकरच वाढवणार असल्याचा विश्वास ग्रामसेवक श्री. वानखेडे यांनी व्यक्त केला आहे. गावात 10 सौरउर्जा प्रकल्प आणि 3 बायोगॅस आहेत. पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेत गावाने सर्व निकषांची पुर्तता करून विकास कामांसाठी अनुदान मिळवले आहे. गावातील शेती चांगली आणि ओलिताखाली असल्याने मजुरांना गावातच बारमाही रोजगार मिळतो त्यामुळे गावातून कामासाठी इतरत्र स्थालांतर होत नाही.

खेडंगाव स्वंयपूर्ण होण्यासाठी गावांचा विकास कसा व्हायला हवा हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत खुप चांगल्या पद्धतीने सांगितले आहे. गाव सुशिक्षित व्हावं, सुसंस्कृत व्हावं, ग्रामोद्योगांनी संपन्न व्हावं, गावानं देशाच्या गरजा भागवाव्यात आणि एक आदर्श गाव म्हणून प्रचारकाच्या रुपानं गावानं देशाच्या विकासाचे नेतृत्व करावी ही त्यामागची धारणा होती. महाराष्ट्रातील काही गाव राष्ट्रसंतांची हीच शिकवण समोर ठेऊन पुढे जात आहेत. म्हणूनच राज्य गेल्या दोन वर्षांपासून ग्रामविकासात देशात पहिल्या स्थानावर येत आहे, प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळवत आहे. नशिरपूर ही अस्सच महाराष्ट्रातील एक सुंदर, समृद्ध आणि हिरवं गाव. . .

डॉ. सुरेखा मुळे

महिला बचतगट उद्योग निर्माण अभियान

घरातील स्वयंपाक करणे, मुलांचे डबे, घरातील साफ-सफाई ही गृहीणींची काही केली तरी न टाळता येणारी निकडीची कामेच म्हणता येतील ज्यातून काही केल्या सुटका नाही. मात्र ही कामे करूनही आपल्यातील कौशल्य दाखविण्याची संधी महिला बचतगटांच्या माध्यमातून सिध्द करत आहेत. नोकरी न करताही कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यात आज महिला बचत गटातील सदस्यांचा वाटा खूपच महत्वाचा आहे असे आपल्याला सांगता येईल.बचतगटांच्या माध्यमातून महिला आपल्या क्षमता सिध्द करत आहेत यासाठी त्यांना मिळालं आहे ते हक्काचं व्यासपीठ म्हणजे बचतगट. अशाच प्रकारे दुग्धोत्पादनातून प्रगती साधलेल्या महिला बचतगटांपैकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काळसे येथील महालक्ष्मी स्वयंसहाय्यता महिला बचतगटाचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. २००२ मध्ये स्थापन झालेल्या या दारिद्रयरेषेखालील बचतगटाने आपल्या बचतीनंतर इतर उद्योगातून उत्तरोत्तर प्रगती साधत दोन लाखांच्या दुग्धोत्पादन व्यवसाय व पोषण आहारापर्यंत झेप घेतली आहे.

काळसे येथील शिवाजी विद्यामंदिर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक व्ही.डी. प्रभूंनी बचतगट योजनेची कल्पना येथील महिलांना करून दिली. २००२ साली गटाची स्थापना झाली. गटप्रमुख मनाली काळसेकर त्यांच्या नेतृत्वाखाली गटाने सुरुवातीला छोटे-छोटे व्यवसाय करण्याचे धोरण आखले. गावातील जत्रौत्सवात नारळ, लाडू विक्रीचे स्टॉल लावणे, चतुर्थीला याच वस्तूंची गावात विक्री करणे असे व्यवसाय केले. २००३ साली गटाचे पहिले ग्रेडेशन झाले त्यानंतर बचत गटांने व्यवसायास हातभार लागावा म्हणून २५ हजारांची उचत करण्यात आली. त्या रकमेचा वापर मोठ्या व्यवसायासाठीं करण्यात आला. गटातील सर्व सदस्य महिला शेतकरी असल्याने शेती पूरक व्यवसायात उतरण्याचे ठरवून २००४ साली दोन लाख रूपयांचे बचतगटाचे ग्रेडेशन झाल्यानंतर दुभत्या म्हैशी खरेदी केल्या. हे कर्जही पूर्ण फेडण्यात आले. सध्या दुग्धोत्पादन उद्योगाच्या जोडीला गटाने दोन अंगणवाड्यांचे पोषण आहार शिजवण्याचेही काम घेतले आहे.

या गटाने ग्रामीण विकास यंत्रणेचे दोन वेळा मालवण तालुका प्रथम तर एकदा जिल्हा प्रथम राजमाता जिजाऊ आदर्श गट पुरस्कार पटकावले आहेत. तसेच गटाच्या विद्यमान सदस्या व पूर्वीच्या सचिव चारुशीला काळसेकर या गटाच्या माध्यमातून २००३ मध्ये दिल्ली वारी करून आल्या आहेत. तिथे वर्ल्ड फेअर मध्ये गटाचा स्टॉल होता. तसेच मुंबईलाही गटाच्या स्टॉलने आपल्या नाविन्यपूर्ण कामगिरीमुळे गटाची एक वेगळीच छाप पाडली होती.आज बचत गटातील कार्यशील सदस्यांमुळे बचतगटाने आपले नाव गावाबरोबरच सिंधुदुर्ग जिल्हयातही आपली वेगळी ओळख राखली आहे.

नम्रता माळगावकर गटप्रमुख असून उपगटप्रमुख म्हणून राजश्री घाडी व सचीव म्हणून नम्रता घाडी काम पाहतात. व्यवसायाच्या वेगवेगळया वाटा चोखाळत आज बचत गट ५० रूपयांच्या बचतीपासून स्वत:चा व्यवसाय करण्यापर्यंत आपली एक वेगळी ओळख करून देण्यासाठी धडपडत आहेत. आणि या धडपडीतून आज दुग्धव्यवसायाच्या माध्यमातून महिलांच्या हाती पैसा येवू लागला आहे.महिलांचं आर्थिक परावलंबन कमी होत असल्याने कुटुंबाचे किंबहुना गावांचे एक एक वेगळेच चित्र डोळयासमोर येत आहे.ज्यातून गावांतील महिलांनाही आपला प्रगतीचा मार्ग गवसला आहे असे म्हणता येईल.

  सांगलीत साडे चार हजार महिलांना स्वयंरोजगार
 

बचतगट ही संज्ञा आता राज्यात सर्वतोमुखी झाली आहे. हा शब्द उच्चारताच शहराबरोबर ग्रामीण भागात हजारो महिला एकवटत असतात. या शब्दांनी महिलांना एवढे प्रभावित केले आहे. याचाच अर्थ आता ही एक चळवळ झाली असून त्याची पाळेमुळे खोलवर रुजली आहेत. मग सांगली कशी बरे याला अपवाद राहील.
                      सांगली जिल्ह्यात या महिला बचत गटाच्या माध्यमामधून अनेक महिलांचे संसार उभे राहिले आहेत. लोणची पापडासारख्या पारंपारिक व्यवसायाबरोबच सॅनिटरी नॅपकीन, बंटेक्स ज्वलरी, गारमेंटच्या व्यवसायात हे गट सहभागी झाले असून लाखो रुपयांचा व्यवहार या महिला करीत आहेत. बचतगट ग्रामीण भागातील महिलांना वरदानच ठरले आहे. त्याचबरोबर सांगली शहरातील महिलाही सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत या मोहिमेत सहभागी झाल्या आहेत. आतापर्यंत जवळ जवळ साडेचार हजार महिलांना स्वयंरोजगार सांगली महापालिकेने मिळवून दिला आहे.
                      नागरी भागात, नागरी सुविधा देण्याचे कार्य महापालिका करत असली तरी नागरी भागातील दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या कुटुंबाचे जीवनमान सुधारावे यासाठी कल्याणकारी राज्यात महापालिका प्रयत्नशील असतात. राज्य शासनाच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजने अंतर्गत महापालिकेने महिला बचत गट स्थापन करुन या महिलांना आत्मनिर्भर केले आहे.
                    या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम तर केले आहे. शिवाय सुमारे 500 तरुणींना स्व-संरक्षणासाठी कराटेचे प्रशिक्षण दिले असून या महिला आता आपल्या गटामधील सहकारी भगिनींनाही हे प्रशिक्षण देत आहेत.
महापालिकेमार्फत महिलांना ब्युटी पार्लर, कॅटरिंग, फॅशन डिझायनींग तसेच संगणकाचेही प्रशिक्षण देत आली आहे. यापैकी 2,500 महिलांनी फॅशन डिझायनींग, 1500 महिलानी कॅटरिंग तर 500 महिलांनी ब्युटी पार्लर आणि संगणकाचेही प्रशिक्षण घेतले आहे. गेली 10 वर्षे महापालिका हे प्रशिक्षणाचं कार्य करीत आली आहे. याचा लाभ या साडेचार हजार महिलांनी घेतला आहे.

कॅटरिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी खानावळीचा व्यवसाय सुरु केला आहे. छोट्या मोठ्या समारंभाचे कंत्राट या महिला स्वीकारत असतात. महापालिकाही आपल्या येथे होणाऱ्या कार्यक्रमाच्यावेळी उपहाराचे कंत्राट प्राधान्याने या महिला बचत गटानाच देत असते.

ब्युटीपार्लर तसेच फॅशन डिझायनींगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांनी आपले व्यवसाय घरबसल्या सुरु केले आहेत. या सर्व महिलांचे व्यवसाय आता स्थिर झाले आहेत. या प्रशिक्षणामुळेच आज आम्ही स्वत:चे संसार सावरु शकलो असे या महिला सांगत असून या महिलांचा सुधारलेला आर्थिकस्तर पाहून त्यांच्या परिसरातील इतर भगिनीही आता या प्रशिक्षणासाठी स्वत:हून पुढे येत आहेत.
              महापालिका क्षेत्रातील सांगली, मिरज आणि कुपवाड क्षेत्रात आतापर्यत 597 महिला बचत गट स्थापन करण्यात येऊन या गटांना राज्य शासनामार्फत एकूण 45 लाख 91 हजाराचे अनुदान खेळते भांडवल म्हणून देण्यात आले आहे. या प्रत्येक गटात 10 महिलांचा समावेश असतो. बचतगटातील या महिलांनी या खेळत्या भांडवलावर आपले उद्योग सुरु केले आहेत.
               लोणची/पापडासह कोल्हापूरी चप्पल, फिनेल तयार करणे, स्टेशनरी, साडी विक्री, हळदपुड, मसाले, गारमेंट, दुग्धव्यवसाय आदी उद्योगही या महिला करीत आहेत. यामुळे या झोपडपट्टीत रहाणाऱ्या भगिनी आता स्वयंसिध्दा झाल्या असून आपले बँक व्यवहारही त्या स्वत:च करत आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे या महिला आपली कर्ज फेडीची तारीख जवळ आली की, स्वत:हून बँकेत येऊन आपले हप्ते भरत असतात. शुभांगी पवार या तरुणीचे उद्गार या संदर्भात बोलके आहेत. साहेब, या गटाने आम्हाला झोपडीच्या अंधारातून बाहेर काढून जग दाखवलं. आमची मुलं शिकू लागली या परीस आणखी काय पाहिजे आम्हाला !
                          बचत गटामुळेच या महिला एकत्र येऊन सुसंवाद साधू लागल्या. परस्परामध्ये विचार विनिमय करु लागल्या. त्यांचा आर्थिक सामाजिक स्तर सुधारला याची जाणीव त्यांना आहे. आज या महिलांची स्वावलंबनाकडे वाटचाल सुरु झाली आहे आणि हे या चळवळीचे यश आहे.

  बचतगट करीत आहे शेतीमध्ये नवीन प्रयोग

  अमरावती जिल्हयातील बोरगाव ता. मालेगाव येथे वसंता अश्रुजी लांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेला वैभव शेतकरी बचत गट आपल्या गट शेतीत विविध प्रयोग करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे आठ एकर शेत जमिनीला केवळ एका तासात एकाच वेळी खत आणि पाणी देण्याचा प्रयोग या शेतकऱ्यांनी यशस्वी केला आहे. परिणामी त्यांचे कष्ट, पैसा आणि वेळ यांची बचत होवून उत्पन्नात सातत्याने भर पडत आहे.

विदर्भात सिंचनाचा अनुशेष आहे. शेतकरी पावसावर आधारित कोरडवाहू शेतीत अत्यंत परिश्रम करावे लागतात. परंतु यावर कल्पकतेने मात करता येते, याची प्रचिती बोरगाव येथील शेतकऱ्यांनी आपल्या कृतीतून दिली आहे. शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग केल्यास कमी श्रमात आणि कमी खर्चात उत्तम शेती करता यते, 

हा आदर्श बोरगाव पॅटर्नने निर्माण केला आहे. शेतीला पाणी देणे हे कष्टाचे काम आहे. यापेक्षाही कष्टाचे काम म्हणजे पिकांना खत देणे आहे. त्यासाठी मजूर मिळत नाहीत, ही मोठीच अडचण पारंपरिक पध्दतीने कपाशी पिकाला खत देण्यासाठी शेतकऱ्याला खाद्यांवर फावडे आणि कमरेला ओटी बांधावी लागते, तर सोयाबीन पिकाला मोघ्याव्दारे प्रत्येक ओळीत फिरुन प्रत्येक झाडाच्या मुळापाशी खत द्यावे लागते. ही बाब खूप कष्टाची आहे. यासाठी वेळ आणि प्रचंड मेहनत लागते. पण लांडकर यांनी आपल्या सर्जनशीलतेतून यावर मात केली आहे. कपाशी पिकाला खत देण्यासाठी त्यांनी पोटाला ओटी बांधण्याची गरज ठेवली नाही. त्यासाठी प्रथम खताचे पाणी करायचे व त्या पाण्यावर टिल्लू मोटारपंप बसवून तो ठिबक सिंचनाच्या नळीला जोडायचा. यामुळे थेट झाडाच्या मुळांना, बुंध्यांना एकाचवेळी पाण्यासह खताची आवश्यकते नुसार मात्रा मिळते. यामध्ये खताचा अपव्यय सुध्दा होत नाही. 

गतवर्षी पाणीटंचाई असताना त्यांनी तुषार व ठिबक सिंचनाचा वापर करुन अत्यंत कमी पाण्यावर गहू, हरभरा यांचे भरघोस उत्पन्न घेतले. तसेच त्यांनी मान्सूनपूर्व बीटी कापसाची लागवड केली होती. एक बाय चार फुटावर टोकन पध्दतीने कापूस लागवड करुन ठिबक सिंचनाव्दारे पाणी व खत दिले. परिणामी, २४ तासात एक च लांब आकाराचा अंकुर येऊन पाचव्या दिवशी पूर्ण कापूस उगवला. केवळ दोन ते तीन वेळा पाणी देऊन उत्पन्न घेतले. मात्र, कपाशीच्या मशागतीसाठी जास्त खर्च येतो म्हणून या पिकात सोयाबीनचे आंतरपीक घेतले. परिणामी, कपाशीच्या पिकांवर झालेला पुर्ण खर्च निघून कपाशीचे पीक निव्वळ नफयात राहिले. दरम्यान, त्यांनी आपल्या गटशेतीत उन्हाळी मूग पेरुन समाधानकारक उत्पन्न घेतले. लांडकर यांच्या मतानुसार, अभ्यासपूर्ण सिंचनातून समृध्दी आणणे शक्य आहे. सर्वच व्यवसायांमध्ये मोजमापाचा वापर केला जातो. शेती व्यवसायातसुध्दा अशाच अचूक मोजमापाचीची गरज आहे. पाणी मोजून देणे गरजेचे आहे. पिकाच्या मुळया जर पाच से.मी. खोल असतील, तर अडीच से.मी. खोलीपर्यंत पाणी पिकालाद्यावे. असे पाणी दिल्यास ओलावा पाच से.मी. पर्यंत हमखास जाते. त्यासाठी पर्जन्यमापकाचा वापर बोरगावच्या गट शेतीत केला जात आहे. हा पर्जन्यमापक तुषार सिंचनाखाली ठेवला जातो. त्याचवेळी एखादे रोपटे उपटून मुळे किती खोल आहेत, हे बघायचे, मुळयांच्या लांबीच्या निम्मे पाणी पर्जन्यमापकात जमा झाले की तुषार सिंचन संच बंद करायचा. पिकाला दिलेल्या पाण्यापैकी ९० टक्के पाणी जमिनीत मुरते किंवा बाष्पीभवनाव्दारे वाया जाते.

उर्वरित केवळ दहाच टक्के पाणी पिकाच्या उपयोगाकरिता येते, त्यामुळे अभ्यासपूर्ण सिंचन करणे गरजेचे आहे. तसेच केल्यास निश्चितच कुठलाच शेतकरी गरीब राहणार नाही, हे लांडकर यांनी कृतीतून दाखवून दिले आहे. 


कांदा बीज निर्मितीतून रोजगार व स्वावलंबन

  ग्रामीण भागातही महिला सक्षमीकरणांतर्गत महिला बचतगटांची चळवळ खोलवर रुजण्यास मोठया प्रमाणात सुरुवात झाली याचेच उदाहरण नाशिक जिल्हयात रेणुका माता महिला बचतगटांने कांदा बीज निर्मिती प्रकल्प सुरु करुन पहिल्याच हंगामात भरघोस बीज निर्मिर्ती करुन चांगल्या प्रकारे लाभ मिळविला आहे. 
उदयोग सुरु करुन तो यशस्वी करण्यासाठी नियोजन हे महत्वाचे असते. हा यशाचा मूलमंत्र लक्षात घेवून नाशिक जिल्हयातील नायकवाडी या आदिवासी भागातील महिलांनी बचतगटाच्या माध्यमातून कांदा बीजची शेती करायला घेतली. या हंगामातील पाहिले पीक बचत गटाच्या हाती आले असून त्याव्दारे साधारणत: दोन ते अडीच लाखाचा निव्वळ नफा अपेक्षित आहे. शासनाच्या बचतगटाच्या स्वर्णजयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेच्या अंतर्गत २००६ मध्य १२ जानेवारी ला रेणुकामाता महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली आहे. मिराबाई डगळे आणि सावित्रीबाई गुबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गटातील महिला दरमहा प्रत्येंक महिन्यात शंभर रुपयांची बचत करतात. 

सदर बचतगटास काही तरी उदयोग करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. याच कालावधीत राज्य सरकारने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या नाशिक जिल्हा कार्यालयाकडून बचतगटाच्या विविध उपक्रमाविषयी प्रस्ताव मागविले होते. या महामंडळाने कांदा बीज उत्पादनास प्राधान्य देण्याचें ठरवले. कारण नाशिक जिल्हयात कांदयाची मोठी बाजारपेठ असली तरी दरवर्षी कांदा बीज मिळविण्यासाठी शेतक-यांना नेहमीच अडचण येते. त्यामुळे कांदा बीज हा मुख्य प्रकल्प हाती घेतला. त्यादृष्टीने शहर परिसराचा अभ्यास केला. हा प्रकल्प राबविण्यासाठी जमिनीची आवश्यकता होती. परंतु जमीनीची किंमत लोक अव्वाच्या सव्वा सांगत होते. यावेळी बचतगटाच्या महिलांनी माविमच्या कार्यालयातील जिल्हा समन्वयक अधिकारी ज्योती निंभोणकर यांची भेट घेतली . त्यांना कांदा बीज शेती करावयाचे सांगितल्यावर ज्योती निभोणकर यांनी नायकवाडी परिसरास भेट दिली. चर्चेच्या अंती या बचतगटाच्या महिला सभासदाची एक एकर ३० गुंठे शेत जमीन कांदा बीज उत्पादनासाठी १० वर्षासाठी भाडे तत्त्वार घेतली. तसेच भाडयापोटी विहिर दुरुस्त करण्याचे देण्याचे ठरले.हा संपूर्ण खर्च एकंदरीत ४० ते ५० हजार रुपयापर्यंत होता. यासाठी माविमने २८ हजार ५०० रुपयांचे कर्ज दिले तर महिलांनी तेरा हजार रुपये जमा करुन एकुण ४५ हजार रुपयांचा निधी जमा केला. या निधीचा उपयोग कांदा बीज उत्पादनाची सामूहिक शेती करण्याच्या दृष्टीकोनातून करण्यात येवुन शेतीचा उत्पादन काढण्यासाठी प्रगतीचे पाऊले पडू लागले. 

महत्वाचे म्हणजे कांदा बीज लागवडीचे शास्त्रशुध्द शिक्षण घेण्यासाठी पिंपळगाव येथील द्राक्ष कृषी संशोधन केंद्रास महिलांनी तीन दिवस प्रशिक्षण घेतले. यास राष्ट्रीय फलोत्पादन विकास व संशोधन प्रतिष्ठानचे सहकार्य मिळाले. या प्रतिष्‍ठानकडून परतीच्या बोलीवर बियाणे घेण्यात आले. गतवर्षी नोव्हेंबर मध्ये कांदा लागवडीस सुरुवात झाली. बचतगटाच्या महिला सदस्यांना या कामासाठी पाठींबा मिळावा यासाठी त्यांच्या पतीची समज काढण्यात आली की यातून मिळणारा पैसा हा घरची आर्थ्रिक परिस्थिती सुधारण्यास मदत करणार आहे. त्यानंतर महिलांना घरचा सदर उदयोग करण्यास उत्तम प्रकारे सहकार्य लाभत आहे. 

कांदयाला जेव्हा पालवी फुटली तेव्हा आलेली पालवी काढून टाका म्हणजे नवीन पाने आल्यावर चांगले उत्पादन येते असे मत गावातील मंडळीनी व्यक्त केले. असा गैरसमज पसरवणारा सल्ला समन्वयक ज्योती निभोणकर यांना समजल्यावर त्यांनी महिलांची बैठक घेऊन कृषी तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार कांदयाची पाने कापणे चुकीचे व अत्यंत धोकादायक असल्याचे स्पषट केले. कोणाचे ऐकण्यापेक्षा बचतगटाच्या सदस्यांनी माविम अथवा कृषी अधिकारी यांचेशी संपर्क साधून असलेल्या अडचणी शंकाचे निरसन करावे असाही निभोणकर यांनी मोलाचा सल्ला दिला. या बचतगटाने इंटरनेट , वेगवेगळी पुस्तके, कृषी प्रदर्शने अशा माध्यमतून कांदा उत्पादना विषयी माहिती घेत या प्रकल्पाकडे काळजीपूर्वक लक्ष दयायला सुरु केले. महिलांनी वेळोवळी कांदा बीज व्यवस्थेत यावे या दृष्टीकोनातून प्रयत्न केले. एनएचएफाआरडीच्या वतीने दर महिन्यास कांदयाच्या पिकाचे अवलोकन केले जाते. त्यांच्या या अथक प्रयत्नांना आज फळ आले कांदा बीज उत्पादनाची शेती या महिलांनी यशस्वीपणे करुन दाखविली . या हंगामात बचतगटास या शेतीव्दारे अडीचशे क्विंटल बीज हाती आले आहे. हे बीज त्यांनी कराराप्रमाणे एनएचएफआरडीकडे सूपूर्द केले असून त्यांची गुणवत्ता तपासून त्यांची रक्कम लवकरच त्यांची हाती पडेल. 
ग्रामीण भागातील महिलाही सर्वच क्षेत्रात पुढे येत असून उत्तम प्रकारे उदयोग करुन रोजगार उपलब्धतेबरोबर स्वावलंबी होण्याचा हा स्तुत्य उपक्रम आहे. यांचा आदर्श इतरांनी घेतला तर रोजगार मिळून स्वावलंबी होऊ शकतो. हे खरोखरच महिला सक्षमीकरणाचे हे उत्तम उदाहरण आहे. 

हिम्मत हरली नाही म्हणून जिंकली !

 बचतगट म्हणजे नुसता आर्थिक कणा सक्षम करणारी चळवळ नव्हे तर तो आहे प्रगतीच्या दिशेने झेपावणारा आत्मविश्वास !अशाच एका आत्मविश्वासाची कथा सांगत आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाची सहयोगीनी कल्पना गजभिये.

महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत रमाई स्वयंसहाय्य महिला बचत गट मु.वडेगाव, पो. मांढळ, ता. कुही येथे २९ मार्च २००४ रोजी गटाची स्थापना सहयोगीनी ताईच्या मदतीने झाली. गट स्थापन करतांना खूप अडचणी आल्या. अनंत अडचणीतून आमचा गट निर्माण झाला. महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत आयोजित अनेक कार्यक्रम (बैठका) मध्ये सर्व गावातील महिला एकत्रित आल्या. त्यामुळे आमची एकमेकींची ओळख दाट झाली. आणि संबंध जवळचे झाले.

गटामुळे बँकेचे व्यवहार कळले. बचत झाली आणि माझ्याप्रमाणेच गरजू महिलांची अडचण दूर झाली. नंतर मी एलआयसी एजन्ट झाले सुरवातीला खूप अडचणी आल्या. लोकांशी बोलायचे कसे ? बाहेरगावी जाऊन लोकांच्या पॉलीसी काढायच्या कशा ? तसेच गावातील लोक वाईट शब्दात बोलायचे पण मी हिम्मत हारले नाही. जिद्दीने प्रयत्न करीतच राहीले.

बचतगटामुळे माझा व्यवसाय वाढू लागला. गटामुळे संबंध जवळ आले. याची मदत एलआयसी व्यवसायाच्या कामात आली. गटामुळे हिम्मत वाढली आणि आज मी मोठ-मोठ्या ऑफीसमध्ये जाऊन पॉलिसीधारक करु लागले. माविमने मला बोलायला शिकविले माविमची भेट यापूर्वी झाली असती तर माझी जास्त प्रगती झाली असती.आज दोन हजार रुपये कमावून मी माझ्या कुटुंबाचे पालन करते

जीवनात वादळं खूप आली. पण बचतगटामुळे सावरले. वेळोवेळी गटातून आर्थिक मदत झाली. म्हणून तर म्हणते माविमने मला पोटाशी धरलं आणि माझ्या संसाराचे संकट टळलं. माझ्या माविमने मला दूर लोटल नाही. मी माविमची सदैव ऋणी राहीन आता तर मी गावातील अन्य भगिनींना एलआयसी एजन्ट म्हणून काम करण्याबद्दल मार्गदर्शन करते. माझ्याप्रमाणेच माझ्या अन्य भगिनी जर एलआय सी एजन्ट झाल्या तर त्यांना भांडवल न गुंतवता या व्यवसायाच्या माध्यमातून कमिशन मिळेल. व आपला चरितार्थ अतिशय चांगल्या प्रकारे करून समाजात ताठ मानेने जगता येईल.

याकरिता गरज आहे, ती जिद्दीची, संघर्षाची, फिरण्याची आणि वाट पाहण्याची. संधी आपल्या जवळच आहे तिचं सोनं करा माविम आपल्या पाठीशी आहे. माविमच्या आधारावर पुढचे पाऊल टाका म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सापडेल.

तेव्हा माविमच्या लेकींनो पुढे हरू नका आपल्याला जिंकायचे आहे. जिंकायचे आहे माझ्यात जिद्द होती म्हणून मी हरली नाही. म्हणून जिंकले !


  दिवाळीचा गोडवा


 देशात महिला सक्षमीकरण चळवळीने वेग घेतला आहे. पुरुषांच्या बरोबरीने विविध क्षेत्रात यश मिळवितानाच आपल्या पारंपरिक पाककलेच्या माध्यमातूनही महिलांनी स्वावलंबनाकडे वाटचाल केल्याची अनेक उदाहरणे आहेत. रत्नागिरी शहरातील सुरुची महिला उद्योग यापैकीच एक आहे. सुशिलाबाई दाते यांच्या महिला मंडळाकडून प्रेरणा घेत त्यांच्या कार्यकुशलतेला आदरांजली वाहण्यासाठी त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी त्यांच्याच नावाचे आद्याक्षर 'सु' आणि त्यांची पाककलेतील 'रुची' असे मिळून 'सुरुची' हे नाव संस्थेला देण्यात आले आहे.

उद्योगाच्या संस्थापिका सरोज गोगटे यांनी प्रारंभी तीन महिलांच्या मदतीने उद्योगाला सुरुवात केली. त्यानंतर आणखी चार महिला या उपक्रमात सहभागी झाल्या. पुरणपोळी, चकली, कडबोळे आदी वस्तू तयार करून त्या शासकीय कार्यालये, बाजारपेठ, रेल्वे स्टेशन आणि घरोघरी जाऊन विकले जात असे. मात्र मालाला उचल कमी असल्याने तेवढेसे यश आले नाही. अशा परिस्थितही स्मिता गावडे, विद्या पटवर्धन, गीता जोशी आदींच्या सहकार्याने उद्योगाला पुढे नेण्याचे प्रयत्न सातत्याने सुरुच राहिले.

महिलांनी एकत्रितपणे जोड व्यवसाय म्हणून १९९२ मध्ये जिल्हा परिषदेच्या कॅन्टीनसाठी निविदा भरली. ती स्विकारण्यात आल्याने कँन्टीनचा व्यवसाय सुरू झाला. उत्पन्नाची शाश्वती झाल्याने उद्योगाला थोडा आधार मिळाला. मात्र पाच वर्षानंतर महिलांनी फारसा लाभ नसल्याने कँन्टीन चालविणे बंद करून घरगुती गरजांच्या वस्तूंवर लक्ष केंद्रीत केले. मात्र कँन्टीन बंद झाल्याने उद्योगाच्या मालकीचे साहित्य ठेवण्याची समस्या महिलांसमोर उभी राहिली. काही दिवस सदस्यांच्या घरी साहित्य ठेवण्यात आले. महिलांची धडपड पाहून आजगावकरवाडीतील प्रेमजी आरस ट्रस्टने उद्योगासाठी आपल्या मालकीची जागा उपलब्ध करून दिली. त्यानंतर या महिलांनी मागे वळून पाहिलेच नाही.

कामकाजातील व्यस्ततेमुळे महिलांना घरातील कामासाठी वेळ कमी मिळत असल्याने 'फास्ट आणि रेडीमेड फूड' ला मोठी मागणी असते. विशेषत: सणाच्यावेळी ही मागणी आणखी वाढते. हेच डोळ्यासमोर ठेऊन 'सुरुची'च्या माध्यमातून या महिलांनी मागणीप्रमाणे फराळ करून देण्यास सुरुवात केली. काही दिवसातच हा प्रयोग यशस्वी ठरला. पदार्थांचा दर्जा आणि चव चांगली असल्याने मागणी वाढू लागली. घरोघरी जाऊन पदार्थ विक्री बंद झाली. उलटपक्षी ग्राहकच आजगावकरवाडीत येऊन ऑर्डर नोंदवू लागले.

पदार्थ तयार करताना गुणवत्तेच्या बाबतीत तडजोड न करण्याचे धोरण स्विकारतानाच उद्योगातील महिलांसाठी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे उद्योगाच्या ठिकाणीच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. आज १० ते १५ महिलांना या उद्योगात रोजगार मिळाला आहे. वस्तूंची खरेदी, हिशेब ठेवणे, विक्री, ऑर्डर स्विकारणे अशी कामे महिलांना वाटून देण्यात आली आहेत. हिशेब चोख असल्याने लेखापरिक्षणात या महिला उद्योगाला 'ब' वर्ग देण्यात आला आहे.

दिवाळीच्या फराळाची तयारी २० दिवस पूर्वीपासून सुरू करण्यात आली आहे. घरातील कामे सांभाळून सोईप्रमाणे संस्थेच्या सदस्या कामासाठी वेळ देतात. दिवाळीच्या काळात चिवडा, शंकरपाळे, चकली, करंज्या,अनारसे, लाडू आदी पदार्थांना चांगली मागणी असल्याचे अध्यक्षा विद्याताईंनी सांगितले. एरवी पुरणपोळी, उकडीचे मोदक, कडबोळी आणि चकल्या मागणीप्रमाणे तयार करून देण्यात येतात. पदार्थंाच्या विक्रीतून होणाऱ्या लाभातून महिलांच्या नावे पोस्टात रक्कम ठेवली जाते. गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्काराचे कार्यक्रमही त्यातून आयोजित करण्यात येतात. महिलांना रोजगार देताना सामाजिकतेचा जपलेला पैलू या संस्थेचे मुख्य उद्दीष्ट आहे.

वयाची साधारण साठी ओलांडलेल्या महिला सामाजिक भावनेतून एकत्रितपणे काम करताना बघून इतर महिलांचा उत्साहदेखील वाढतो. कामाच्या ठिकाणी असणारी तन्मयता आणि उत्साह बरेच काही सांगून जातो. इतरांची दिवाळी गोड करण्यासाठी परस्परातील गोडवा जपत या महिलांनी पुढे नेलेला हा उद्योग इतरही महिलांना प्रेरक आहे. त्यांनी तयार केलेल्या लाडूचा गोडवा कदाचीत कमी-जास्त असू शकेल किंवा चकलीतला कुरकुरीतपणा कमी होईल मात्र त्या उद्योगासाठीचे प्रयत्न आणि त्यामागची भावना लक्षात घेतल्यास हे पदार्थ आणखी चविष्ट लागतील. इतरांसोबत आपलीही दिवाळी गोड करावी ती अशी...!


  मिळूनी सार्‍याजणी...

  एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला महिलांचा सहभाग सर्वच क्षेत्रात दिसू लागला आहे. मर्यादित क्षेत्रापुरते स्वत:ला मर्यादित न ठेवता महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करताना दिसतात. आज पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना महिला बचतगटासारख्या चळवळीच्या माध्यमातून समाजात सन्मानाने जगण्याचा मार्गदेखील महिलांनी स्विकारलेला पहायला मिळत आहे. रत्नागिरीतील परटवणे येथील पार्वती महिला बचतगटाच्या सदस्यांची कामगिरी अशाच प्रकारचे महिलांचे यश अधोरेखित करणारी आहे.

या बचत गटाची स्थापना २००५ मध्ये करण्यात आली. सुरुवातीला फक्त ५ ते ६ महिलांनी एकत्र येवून गट स्थापन करण्याचे ठरविले. गटाच्या अध्यक्षा राजश्री देसाई यांच्या प्रोत्साहनाने व प्रयत्नाने कॅनरा बँकेकडून ७० हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळाल्यांनतर गटाच्या कार्याचा श्रीगणेशा करण्यात आला. कालांतराने वाडीतील महिलांना गटाचे महत्व कळू लागल्यावर आता या गटातील महिलांची संख्या १० पर्यंत वाढली.

दररोज ४ ते ५ तास 'मिळूनी सार्‍याजणी' एकत्रितपणे काम करतात. पापड, मसाले यासाठी लागणारे कच्चे सामान बाजारातून घाऊक स्वरुपात खरेदी केले जाते. मसाल्यासाठी लागणारे पदार्थ उत्तमरितीने वाळविणे, साठवणे आणि त्याची प्रक्रिया झाल्यानंतर विक्री अशा सर्व स्वरुपाची कामे या महिलाच करतात. हळूहळू पॅकींगचे कौशल्यही त्यांनी आत्मसात केले आहे. घरगुती स्वरुपात तयार होणार्‍या पापड, फेण्या, कुरडया, कुळीथ पीठ आदी पदार्थांना देखील त्यांनी आपल्या व्यवसायासाठी उपयोगात आणले आहे. परिसरातील गावात आणि शहराच्या ठिकाणी या पदार्थांना चांगली मागणी आहे. कुठल्याच प्रकारचा कमीपणा न वाटू देता प्रसंगी घरोघरी जाऊन उत्पादनांची विक्री केली जाते. म्हणूनच अधिकाधीक ग्राहकांपर्यंत पोहोचण या महिलांना शक्य झाले आहे.

पावसाळ्यामध्ये पापड, मसाले हा उद्योग करता येत नाही. या कालावधीत रिकामे न राहता अर्थार्जनाची प्रक्रीया सुरुच रहावी यासाठी महिलांनी भांडी विकण्याचा व्यवसाय सुरू केला. मुंबई येथून एकत्रितपणे भांडय़ांची खरेदी करून ती स्थानिक बाजारात विकली जातात. खरेदी करण्याच्या प्रक्रियेत प्रत्येकाचा सहभाग असावा म्हणून रोटेशन पद्धतीने सदस्यांना खरेदीसाठी पाठविले जाते. त्यामुळे सदस्यांना व्यवहार कौशल्याचे चांगले प्रशिक्षण मिळते. गेली सहा वर्षे हा गट अखंडपणे आपले काम करीत असून यामध्ये मिळणार्‍या नफ्यामध्ये गटातील महिला समाधानी आहेत, असे सांगताना श्रीमती देसाई यांच्या चेहर्‍यावरचा आनंद बरेच काही सांगून जात होता. बचत गटाच्या कामातून मिळणारं समाधानही त्यात असावं.

जास्त शिक्षण नसले तरी स्वत:च्या पायावर उभे राहून आपल्या संसारासाठी काहीतरी हातभार लावण्याची धडपड या बचतगटाच्या सदस्यांमध्ये दिसून येते. व्यवसायात मिळणारा नफा-तोटा याचा हिशोब ठेवणे, खरेदी, विक्री, उत्पादन ही सर्व कामे या महिला चोखपणे पार पाडतात. दरमहा १५ तारखेला गटाची बैठक होते. या बैठकीत गटाच्या कामाविषयीच्या समस्या, जमाखर्चाचे हिशोब याविषयी चर्चा केली जाते. दरवषी न चुकता गटातील सर्व महिला एकत्र येवून सण-समारंभ सादर करीत असल्याने त्यांच्यातील एकोपा ‍िटकून आहे.

बचत गटाची ही यशस्वी वाटचाल पुढे सुरूच ठेवण्याचा महिलांचा निर्धार आहे. एकजूट, जिद्द, मेहनत याद्वारे या महिलांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्या आता खर्‍या अर्थाने सक्षम झाल्या आहेत. बचत गटांच्या माध्यमातून स्त्रियांना समाजात मानाचे स्थान मिळत आहे. ते त्यांनी मेहनतीच्या जोरावर प्राप्त केले आहे, हेही तितकेच खरे!


  हिरकणी बचत गटाचा अनोखा उपक्रम

  आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग असले तरी काही बाबींस अवास्तव महत्व आले आहे. आज घरोघरी टी. व्ही. आहेतच, टीव्ही कार्यक्रमांमुळे ज्ञान मिळते हे जरी सत्य असले तरी दूरदर्शनवर दिवसभर कार्यक्रम दाखविले जातात. त्यामुळे मुले, लहान मोठे हे बहुसंख्य वेळ हे दूरदशन कार्यक्रम पाहण्यात घालवितात, हे चित्र चांगले नाही. वाचनाशिवाय ज्ञान नाही. संस्कार नाहीत. अशा परिस्थतीत नाशिक येथील हिरकणी बचतगटाने वाचन वृध्दीची पताका हाती घेतली आहे. याबाबत एक दृष्टीक्षेप ..

मराठी पुस्तकांच्या वाचनाची गोडी सर्वसामान्यांमध्ये वाढावी व त्याव्दारे जीवनाकडे अधिकाधिक डोळसपणे बघून लहानांपासून मोठयांचे व्यक्तिमत्व समृध्द व्हावे या एका तळमळीने नाशिक येथील हिरकणी महिला बचतगटाने तीन वर्षापूर्वी पुस्तक विभाग सुरु करुन पुस्तकांची विक्री सुरु केली आहे.

केवळ स्वत:च्या आर्थिक सक्षमीकरणाचा विचार न करता वाचनवृध्दीची पताका हाती घेणारा हा राज्यातील पहिला महिला बचतगट ठरला आहे. नाशकातील रोहिणी मालेगांवकर व राजश्री दंडगव्हाळ यांच्या पुढाकारातून सन २००७ मध्ये हिरकणी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाची स्थापना झाली. या गटात एकूण दहा महिलांचा सहभाग आहे. काहीतरी वेगळं करण्याची उर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. चविष्ठ खाद्यपदार्थ बनवून स्वत: आर्थिकदृष्टया सक्षम होणे त्यांना सहज शक्य होते. मात्र समाजाला ज्ञानाची शिदोरी पुरवावी , जेणेकरुन चांगल्या पुस्तकांच्या वाचनातून प्रत्येकाला एक चांगला सोबती व मार्गदर्शक लाभेल.

प्रेरणादायी पुस्तक महान व्यक्तींची चरित्र, विज्ञान व पर्यावरण विषयक माहितीचे भांडार सर्वांना खुले व्हावे, यातून व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते. या स्वानुभवाच्या जोरावर त्यांनी पुस्तक विक्री विभाग सुरु केला आहे. यात त्यांनी सर्वप्रथम सेवापूर्ती सोहळे, लग्न समारंभ वाढदिवस अशा कार्यक्रमासाठी भेट देण्यासाठी अक्षर भेट योजना सुरु केली. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. नंतर अक्षर दान योजना पुढे आली.

या अंतर्गत मुलींच्या लग्नात तिला माता पित्याकडून ज्ञानाचा अक्षय ठेवा मिळावा हा हेतू होता व लहानग्यांसाठी वाढदिवसाला पुस्तके भेट द्यावी म्हणून अंकुर योजना सुरु केली.

या गटाकडे सध्या पाच हजाराहून अधिक मराठीतील विविध पुस्तकांचा साठा आहे. ग्राहकांच्या मागणीप्रमाणे नव्या को-या पुस्तकांचा संच हे उपलब्ध करुन देतात. पुस्तक विक्री करणारा हा राज्यातील पहिलाच बचतगट आहे.

मुळातच आपल्याकडे पुस्तक खरेदीसाठी खास बाजारात जाणारा वर्ग नाही म्हणून ही संकल्पना प्रत्यक्षात आणल्याचे रोहिणी मालेगाव यांनी सांगितले. आजही आपल्याकडे दहा पैकी सहा सात सात लोकांच्या मनात पुस्तके खरेदीला स्थानच नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले आहे. हे चित्र उदासीन असले तरी तीन वर्षात अनेकांमध्ये वाचन गोडी वाढविण्यात हा बचतगट यशस्वी झाला आहे.


  चांदवडी माळरानावर फुलविली आमराई

  तीन गावांच्या सरहद्दीवर वसलेले वेलंग (चांदवडी)(पु.) हे वाई तालुक्यातील गाव. येथील सुनंदा पाटणे या प्रगतीशील शेतकरी महिलेने आपल्या स्वत:च्या खडकाळ जमिनीत खडक फोडून आमराईचे स्वप्न साकार केले आहे. श्रीमती पाटणे यांचा आंबा लागवडीचा यशस्वी प्रयोग पाहण्यास परिसरातील शेतकऱ्यांचा ओढा वाढला असून हा एक आदर्श प्रयोग म्हणून पंचक्रोशीत ओळखला जावू लागला आहे.

सौ. पाटणे यांचे पती हिंदूराव पाटणे राज्य परिवहन महामंडळाकडे वाहक पदावर कार्यरत असल्यामुळे त्यांना शेतीकडे पुरेसा वेळ देता येत नाही. पूर्वीचे हे गाव धोम धरणात गेल्यामुळे जांब, खडकी, मर्ढे या गावांच्या माळावर या प्रकल्पग्रस्तांना वसविण्यात आले आहे. पुनर्वसित मंडळींना थोड्या प्रमाणात वेगवेगळ्या गावात शेतजमिनी मिळाल्यामुळे प्रयोगशील शेती करता येत नव्हती. हीच अवस्था सुनंदा पाटणे यांची होती.

वेगवेगळ्या ठिकाणी जमीन मिळाल्यामुळे एकटीने पाहायचे कुठे व शेतीची आवड पूर्ण कशी करायची हा प्रश्न सौ. पाटणे यांना सतावत होता. पण या समस्येवर मात करण्याचा निर्णय त्यांच्या मनाने घेतला आणि घरालगत असणाऱ्या दोन एकर क्षेत्राची शास्त्रोक्त पध्दतीने आंबा लागवडीसाठी त्यांनी निवड केली. शेतात मजुरांच्या सहाय्याने २ एकर क्षेत्रावर १०० खड्डे २०X२० च्या अंतरावर ४ फूट खोल खोदले, खडकाळ क्षेत्र असल्यामुळे माती, झाडांचा पालापाचोळा, बी.एच.सी, थायमेट बुरशीनाशकांनी व शेणखताने खड्डे भरण्यात आले. रत्नागिरी येथून तोतापुरी, राजापुरी हापूस या जातीची रोपे आणून शास्त्रशुध्द पध्दतीने आंबा रोपांची लागवड केली. सौ. पाटणे यांनी आंब्याच्या लागवडीकामी स्वत: व्यक्तीश: लक्ष केंद्रीत केल्याने त्यांना यशही लाभले.

शेतजमीन खडकाळ आणि माळरान असल्याने योग्य मशागतीव्दारे त्यांनी आंब्याची लागवड केली. याकामी त्यांनी स्वत:ला वाहून घेतले होते. जमिनीची प्रत हलकी असल्यामुळे ८ दिवसांच्या अंतराने पाणी दिले. आंतरपीक म्हणून ज्वारी व भूईमूग, आदी पिके घेतली. अनेकवेळा गावाजवळील नळावरुन मुलांच्या सहाय्याने डोक्यावरुन पाणी आणून झाडाला घातले.

आषाढ महिन्यात झाडांची खोदणी करुन कुजलेले शेणखत देऊन भर देण्यात येते. याचबरोबर रासायनिक तसेच सेंद्रिय खतांचाही वापर करण्यात आला. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात तसेच नोव्हेंबरच्या पहिला पंधरवड्यात झाडांना मोहोर येण्यास सुरुवात झाली. मोहोर टिकवून ठेवण्यासाठी एम ४५, एंडोसल्फान, बाबीस्टिन आदी औषधांची फवारणी करण्यात आली. यानंतर वातावरणातील बदलांमुळे मोहोर टिकवून ठेवण्यासाठी औषधांच्या धुराळ्ण्या कराव्या लागल्या. सुनंदा पाटणे यांनी बांधावरील नारळांचा आणि टिश्यू कल्चर केळीचा प्रयोगही आंब्याच्या लागवडीबरेाबरच यशस्वी केला.

आज परिसरातील शेतकरी आंब्याची बाग तसेच अन्य आंतरपीकांची पाहणी करण्यासाठी येत असून वाई तालुक्यातील आदर्श महिला शेतकरी बनण्याचा मान त्यांनी मिळविला आहे.


  'धवल' यशाचा मार्ग

  कोकणातील भातशेती सामान्य शेतकरी आणि शेतमजूरांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन आहे. भातकापणीनंतर त्याच जमिनीवर पाण्याच्या उपलब्धतेनुसार भाजीपाल्याचे उत्पादन घेऊन त्यांची विक्री करायची हाच पर्याय या शेतकऱ्यांसमोर असतो. ग्रामीण भागातील महिला शेतावर मोलमजूरी करून कुटुंबासाठी अर्थार्जन करतात. शेतीच्या हंगामानंतर मात्र घरातील अर्थशास्त्राचे नियोजन करणे त्यांना जड जाते. अशा महिलांसाठी बचत गट चळवळ आधार ठरली आहे. खेड तालुक्यातील दयाळ गावातील महिलादेखील याच चळवळीच्या माध्यमातून स्वावलंबी झाल्या आहेत.

गावात महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहयोगिनीने बचत गटाविषयी माहिती दिल्यावर नेहमीच्या कष्टापेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या निश्चयाने रतीया रुके यांच्या नेतृत्त्वाखाली गावातील महिला एकत्र आल्या. त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर बचत गटाची स्थापना केली. रोजच्या मजूरीतून बचत करणे कठीण असतानादेखील दररोज दहा रुपयाप्रमाणे त्यांनी बचत सुरू केली. डोंगराळ भागात भातशेतीची कामे करतांना सायंकाळी बचत गटाविषयी चर्चा होत असे. स्टेट बँकेने दिलेल्या १२ हजाराच्या कर्जातून अंतर्गत गरजा भागवितांना भाजीपाला विक्री, पापड तयार करणे अशा व्यवसायाने गटाच्या कामाला सुरुवात केली. या व्यवसायातून दोन पैसे हातात पडल्यावर या महिलांचा उत्साह वाढला. घरातून सुरुवातील थोडा विरोध झाला मात्र गटाचे महत्व लक्षात आल्यावर पुरुषमंडळीदेखील गटाला प्रोत्साहन देऊ लागली. 'माणसं नाय म्हणायची, पर पैसा कोणाला नकोय' एका महिलेने आपली प्रतिक्रीया व्यक्त केली. विशेष म्हणजे आता झालेल्या बदलामुळे या महिलांशी संवाद साधतांना पुरुषमंडळी गटाच्या कामाविषयी भरभरून आमच्याशी बोलत होती.

पहिल्या कर्जाची परतफेड झाल्यावर दुसरे १.३४ लाखाचे कर्ज दुग्ध व्यवसायासाठी मंजूर झाले. त्यातून प्रत्येक महिलेच्या घरी दोन गायी आल्या. म्हशींना पाणी जास्त लागत असल्याने गायी घेणे पसंत केल्याचे रुके सांगतात. बँकेमार्फत आणखी १.७५ लक्षचे कर्ज मंजूर झाले. पशुखाद्यासाठी ३० हजार वेगळे मिळाले. पाण्याची सोय व्हावी म्हणून ग्रामस्थांच्या मदतीने टाकी बांधून घेतली. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून १२ हजाराची मदत मिळाली.

गायींना चारापाण्याची व्यवस्था लक्षपूर्वक करण्यात आल्याने चांगले दुध मिळू लागले. शेतीची कामे करतांना जोडीने हे काम करणे महिलांना सहज शक्य होते. प्रत्येक घरात ५ ते ६ लिटर दुध आता मिळते आहे. शेजारील फुरुस येथील डेअरीत दररोज ४० ते ५० लिटर जाते. प्रत्येक महिलेला घरासाठी दुध आणि दररोजच्या घरखर्चाची रक्कम हाती पडते. कर्जाची नियमीत परतफेड करण्यात येत असून गोठा बांधण्याचा निश्चय या महिलांनी केला आहे. डोंगराळ भागातील तीन एकर शेतावर पुरुषांच्या मदतीने हळदीची शेतीदेखील प्रथमच करण्यात येत आहे. घरातील पुरुषांना दोन पैसे मिळत असतील असे म्हटल्यावर 'आमचे पैसे पुरुषांना नाही देत, आमच्या उपयोगासाठीच असतात' एका महिलेची उत्स्फुर्त प्रतिक्रीया..

गटात काम केल्यामुळे या महिलांना प्रथमच बँकेचे व्यवहार कळू लागले आहेत. त्यासाठी कांचन मोरे या सहयोगिनीला त्या मनापासून धन्यवाद देतात. त्यांच्यातला विश्वास वाढला असून या महिला गटाच्या प्रगतीविषयी गांभिर्याने बोलतात. एका महिलेने भ्रमणध्वनी क्रमांक सांगतांना चक्क 'नाईन, एट, डबल टू...' असे सांगितल्यावर आम्ही चकीतच झालो. चाळीस वर्षाची ही महिला मुंबईत काही काळ राहिल्यानंतर गावात गटाच्या उत्कर्षासाठी प्रयत्न करते आहे. अशा प्रयत्नातूनच ग्रामीण भागात ही चळवळ मजबूत होऊन महिलांना स्वावलंबनाकडे नेत आहे
  • डॉ.किरण मोघे
  •  
  •   बचत गटांना व्यवसाय मार्गदर्शन
  •  राज्यात बचत गट चळवळीचा विकास वेगाने झाला आहे. बचत गटांच्या संख्येत वाढ होत असताना त्यांच्या कामातील गुणवत्ताही वाढावी यासाठी विविध पातळींवर प्रयत्न केले जात आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाने यासाठी विशेष पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी येथील महामंडळाचे 'बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिस सेंटर' सुरू करण्यात आले आहे. या सेंटरच्या माध्यमातून बचत गटांना व्यवसायासंबंधी मार्गदर्शनाचे विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.

    कोकणातील बचत गटांना व्यावसायिक स्वरुपाचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता वाढवावी या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने एप्रिल २०१० मध्ये रत्नागिरी येथे 'बिझनेस डेव्हलपमेंट सर्व्हिस सेंटर' ची सुरुवात केली. सेंटरमध्ये एका व्यवस्थापकाच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि ठाणे जिल्ह्यासाठी स्वतंत्र प्रमोटर्स नियुक्त करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बचत गटाच्या महिलांना आपला व्यवसाय विकसीत करण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच उत्पादनात नाविन्य आणण्यासाठी प्रेरित करण्याचे काम हे प्रमोटर्स करतात.

    सेंटरद्वारे कोकणातील बचत गटांना त्यांच्या व्यवसायाबाबत मार्गदर्शन करण्यात येते. त्याचबरोबर त्यांना पॅकेजिंग आणि लेबलींगचे तंत्र शिकवून उत्पादनाचे मुल्य वाढविण्यासाठी प्रवृत्त करण्यात येते. कोकणात प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून विविध उत्पादने तयार केली जातात. यात ज्युस, जॅम, मिठाई, तळलेले पदार्थ आदींचा समावेश आहे. या उत्पादनांना आकर्षकपणे ग्राहकासमोर सादर केल्यास दर जास्त मिळतो. हे तंत्र आतापर्यंत झालेल्या प्रशिक्षणाच्या दहा सत्रातून तीन हजारपेक्षा जास्त महिलांपर्यंत पोहचले आहे.

    प्रशिक्षणांतर्गत महिलांना पॅकेजिंगची प्रात्यक्षिके करून दाखविली जातात. शिवाय व्यवसायासाठी वापरल्या जाणाऱ्या नव्या तंत्राची माहिती देण्यात येते. उत्पादनाची नोंदणी कशी करावी, बाजारपेठेचा अभ्यास कसा करावा, व्यवसाय वृद्धीचे तंत्र आदी माहितीदेखील देण्यात येते. सोबतच कलाकुसरीच्या वस्तू तयार करण्याचे तंत्र शिकविले जाते. प्रशिक्षण घेणाऱ्या महिला उत्पादनाच्या दर्जाबाबत अधिक जागरूक असतात, अशी माहिती या केंद्राच्या वैभवी घाटवीलकर यांनी दिली.

    केंद्रातर्फे महिलांना विविध मॉल्समध्ये अभ्यास भेटीसाठी नेले जाते. उत्पादक, विक्रेते, अधिकारी आणि महिला यांची एकत्र बैठक घेऊन गरजानुरूप उत्पादन करण्यासाठी महिलांना मार्गदर्शन करण्यात येते. प्रत्येक बॅचमध्ये ३० महिलांचे प्रशिक्षण होते. या महिलांना प्रदर्शनात उत्पादन विक्रीसाठी कॅनोपी (टेन्ट) उपलब्ध करून दिला जातो. केंद्रातर्फे लवकरच विभागीय स्तराचे मोठे प्रदर्शन भरवून बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे.

    माविमच्या विकास केंद्रातर्फे दिले जाणारे प्रशिक्षण घेतल्याने बचत गटातील महिलांच्या उत्पादनाला मॉल्समधूनही मागणी येत आहे. लांजा, पाली, सिंधुदूर्ग येथील सुपर मार्केटमध्ये बचत गटाची उत्पादने विक्रीसाठी ठेवण्यात आली आहेत. शिवाय विविध ठिकाणी होणाऱ्या प्रदर्शनातही अशा बचत गटाच्या उत्पादनाला चांगली मागणी येत आहे. केंद्राद्वारे दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाचा लाभ घेऊन ५० पेक्षा अधिक बचत गटांनी बाजारपेठेत आपल्या उत्पादनाची ओळख प्रस्थापित करण्यात यश मिळविले आहे. हे यश इतरही बचत गटांना उत्पादन आणि विपणनाचे तंत्र शिकण्यास प्रवृत्त करणारे आहे आणि हेच या केंद्राचेही यश आहे.


      घर बसल्या एका फोनवर कपडे अल्टर
     महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे बचतगटाच्या सदस्यांनी स्वत:च्या आर्थिक विकासासोबतच आत्मसन्मानाने जगण्याचं तंत्र ही सहज साध्य केलं अशाच एका सदस्य अल्का वाळके यांच्या शब्दातच ऐका त्यांची कहाणी .
    मी अल्का शैलेश वाळके, ता. रामटेक खैरी विजेवाडा ( शितलवाडी) येथील रहिवाशी आहे. याआधी मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहत होते. माझे पती दवाखान्यामध्ये काम करीत होते. दवाखान्यात कायम स्वरुपी होईल या आशेने २ लाख रुपये भरले. परंतु हातात अपयश आले कारण काही दिवसांनी ती संस्थाच बंद पडली. त्यानंतर माझे पती बेरोजगार झाले. कुठलेही काम मिळत नव्हते. अशा वेळेला पोट भरायचे कसे हा मोठा गहन प्रश्न उभा राहीला. मी याआधी घराबाहेर कधीही गेलेली नव्हती. बाहेरचे जग काय आहे हे मला माहिती नव्हते. त्यामुळे जीवन कसे जगावे हा मोठा प्रश्न निर्माण झाला.
    मी आपल्या मनाशी निर्णय घेतला की आपण शेतातल्या कामाला जायचे, शेतातील काम कधीही केलेले नव्हते. परंतु आता करण्याशिवाय पर्याय नव्हता. मी बाजूच्या ताईबरोबर शेतात जाऊ लागली. पण मला काम येत नसल्यामुळे शेतमालक मला रागवला व बाजूच्या बाईला म्हणयला लागले की उद्या या बाईला कामाला आणू नका. पोट भरण्याचा प्रश्न समोर उभा राहिला तेव्हा कसेतरी हळूहळू शेतीतील काम मी शिकले.
    एक दिवस मी बॅकेत गेले तेव्हा मला सहयोगीनी निशाताई भेटल्या. मी त्यांच्याकडून गटाविषयी माहिती घेतली. आम्हाला त्यांनी गटाविषयी माहिती सांगितली. गटाची संकल्पना प्रशिक्षण दिले. आम्हाला गटाचे महत्व समजले आणि आम्ही ५० रुपये प्रमाणे पैसे भरुन रमाई महिला सक्षमीकरण या योजेनअंतर्गत लुंम्बीनी महिला बचत गट स्थापन केला.

    सहा महिन्यानंतर बँकेतून कर्ज घेण्याचे ठरविले. आम्हाला माविमने बरेच प्रशिक्षण दिले. त्यांनतर ग्रेडेशन केले व बॅकेतून ५०,०००/- रु. पहिले कर्ज मिळाले. या पैशाचा वापर
    चांगल्या प्रकारे व्हावा म्हणून मी काही तरी उद्योग करण्याचा निर्णय घेतला. गटाला कर्जाची मागणी केली. आज गावामध्ये गरीब व्यक्तिंचे कपडे फाटले, कपडे मापाचे नसले किंवा नविन कपड्यांना शिलाई बरोबर नसल्यास घरबसल्या एका फोनवर कपडे अल्टर करण्यासाठी माझ्याकडे येतात.
    गावामधून माझ्याकडे बरेच कपडे अल्टर करण्याकरिता येत असतात. आणि मी १५,००० रु कर्ज घेऊन शिलाई मशीन घेतली आणि शिलाई कामाचा व्यवसाय सुरु केला या व्यवसायामुळे मी घरी बसून शिलाई काम करीत असते, त्याचप्रमाणे पिको फॉल सेंटर चालविते त्यातून २००० रु महिना नफा मिळाते व याच व्यवसायाने मी माझं घर चालविते.
    आम्ही दोघेही पती पत्नी आता खूप सुखी आहोत . आज बचत गटामुळे मी माझा परिवार स्वत:च्या पायावर उभा आहे याचा मला अभिमान आहे. मी जर बचत गटामध्ये सहभागी होऊन पुढाकार घेतला नसता , किंवा शेताचे काम येत नाही असे म्हणून घरी रडत बसले असते तर आज माझा व्यवसाय उभा झाला नसता आणि मी स्वत:च्या पायावर उभी झाली नसते म्हणून माझे इतरांना हेच सांगणे आहे की, बचत गटाला खूप महत्व आहे, त्याचे खूप फायदे आहे. फक्त आपण त्यासाठी प्रयत्न व गटात एकजुटीने काम करायला पाहीजे.

    प्रयत्न केल्याशिवाय फळ मिळणार नाही किंवा यश मिळणार नाही हेच खरे अशा प्रकारे बचत गटामुळे माझा विकास झालेला आहे. त्यामुळे मी माविमची खूप आभारी आहे. कारण माविमने बचत गटाची सुरुवात केली नसती तर आम्हाला बचतगटाचे महत्व कळले नसते. आणि माझी जीवनात प्रगती झाली नसती. मी माविमची शतश: आभारी आहे.


  • शैलजा वाघ- दांदळे
  •   बिछायत व्यवसायाच्या माध्यमातून शिवाणी महिला बचत गटाची भरारी


    0




     ग्रामीण व शहरी लोकांकडे होणा-या समारंभात किंवा किरकोळ स्वरुपाच्या कार्यक्रमांचे आकर्षण बिछायतीच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे. गरीब असो की श्रीमंत असो प्रत्येकाच्या कार्यक्रमात बिछायतीचे साहित्य महत्वाची भूमिका पार पडत असते. शिवाणी महिला बचत गटाने चालविलेले बिछायत केंद्र परिसरात उत्तम सेवा देणारी ठरत असून त्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

    देवळी तालुक्यातील पुलगाव शहरालगत गुंजखेडा येथील वल्लभनगर येथे शिवाणी महिला बचत गट १ फेब्रुवारी २००८ रोजी स्थापन झाला. या बचतगटाने परिश्रमपूर्वक उत्तम कामगिरी केल्यामुळे पंचायत समिती अंतर्गत असलेल्या ग्रामीण विकास यंत्रणेने दखल घेवून बिछायतीचे साहित्य खरेदी करण्याचा मार्ग मोकळा झाला.त्यासाठी या महिला बचत गटाला १ लाख २० रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी प्रदान केली.

    या बचत गटाविषयी माहिती जाणून घेतांना शिवाणी महिला बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती सुशिला कडू म्हणाल्या की, गावातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये बचतगटाविषयी मार्गदर्शन तत्कालीन ग्रामसेवक यांनी दिली. या बैठकीला मी आणि गटातील महिला आग्रहपूर्वक उपस्थित होतो. शंका कुशंका दूर झाल्यानंतर आम्ही महिला ३० जानेवारी २००८ रोजी माझ्याच घरी बैठकीचे आयोजन केले. त्या बैठकीमध्ये बचतगटाचे नाव बचतीसाठी रकमेचे निर्धारण आणि भविष्यात करावयाचा व्यवसाय याविषयी चर्चा करुन बचत गटाला शिवाणी असे नाव देण्याचे ठरविण्यात आले. मासिक ३० रुपये बचत करुन बिछायतीचा व्यवसाय सर्वानुमते निवडण्यात आला.

    बचत गटातील प्रत्येक महिलेने ३० रुपये बचत करुन १२ महिलेची एकत्रीत रक्कम गोळा केल्यानंतर लगेच तिस-या महिन्यात बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचत गटाचे खाते उघडण्यात आले. प्रत्येक महिन्याला ३६० रुपये प्रामाणिकपणे भरण्यात येत होते. वर्षाला ४ हजार ३२० रुपये बँकेत जमा झाले. दुस-या वर्षाला मागील रकमेची जमा मिळून बचत गटाच्या खात्यावर ८ हजार ६४० रुपये जमा झाले. बचत गटातील महिला गरीब असल्यामुळे पदोपदी त्यांचे कुटूंबामध्ये पैशाची गरज भासत असते. ही गरज गटात जमा झालेल्या रकमेतून करण्यात येत असते. या बचतीच्या रकमेतून काही महिलांना आपला स्वत:चा वेगळा व्यवसाय उभारला तर काही महिलांनी कुटुंबातील सदस्याच्या पाठ्य पुस्तकासाठी तसेच औषधोपचारासाठी खर्च केला आहे.

    बचत गटातील सदस्य अनुसया गवळी यांनी फेब्रुवारी २०१० रोजी ६ हजार रुपये अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजाने जुन्या ऑटोच्या रिपेअरींगसाठी घेतले. सदर्हू ऑटो त्याचे पती चालवित असून ऑटो पासून सर्व खर्च वजा जाता २०० रुपये प्रत्येक दिवसाला कमाई होते. आता पर्यंत ४ हजाराची परतफेड केली असून व्याज सुध्दा त्यांनी भरले आहे.

    वनिता चुबलवार या सदस्या महिलेने गटातून ८ हजाराचे अंतर्गत कर्ज डिसेंबर २००९ रोजी धान्य व्यवसायासाठी घेतले होते. बचत गटातील प्रत्येक महिला त्यांच्या धान्य दुकानातून धान्य व इतर वस्तू खरेदी करतात तसेच हा व्यवसाय सुध्दा चांगल्या प्रकारे चालत असल्यामुळे त्यांचे कुटूंब या व्यवसायावर उपजिवीका चालवित आहे. उचल रकमेची सर्व रक्कम परतफेड केली असून अजून दुकानामध्ये ५१ हजाराचा धान्य साठा उपलब्ध आहे.

    सुशिला कडू या गटातील महिला सदस्यांनी ५ हजाराचे अंतर्गत कर्ज घेतले होते. त्यांनी महिला व पुरुषासाठी ब्युटीपार्लरचे दुकान उघडले. हे दुकान चांगले चालत असून त्यांचा मुलगा व मुलगी हे दुकान सांभाळतात. खर्च वजा जाता त्यांना ४ हजार रुपये सरासरी रक्कम प्राप्त होते. त्यांनी बचत गटाकडून घेतलेली कर्जाऊ संपूर्ण रक्कम दोन टक्के व्याजासह परत केली आहे.

    वर्षा सालंकार यांनी जून ११ मध्ये शेतीसाठी व साधना धांगडे यांनी दोन मुलांच्या शिक्षणासाठी ३ हजार रुपये कर्ज घेतले आहे. व्याजासह अद्यापही परतफेड सुरु आहे. बचतगटाच्या सदस्यांची अंतर्गत उलाढाल अद्यापही सुरु आहे.

    शिवाणी महिला बचत गटाने आगस्ट २०१० मध्ये बिछायत केंद्र उघडण्याचा प्रस्ताव बँक ऑफ महाराष्ट्र पुलगांव येथे सादर केला. बँकेनी जानेवारी २०११ ला १ लाख १० हजाराचे कर्ज दिले. लग्न समारंभ, वाढदिवस किंवा अन्य समारंभासाठी बिछायात केंद्रातील साहित्याचा उपयोग होत असल्यामुळे या व्यवसायाला परीसरात झळाळी प्राप्त झाली त्यामुळे आतापर्यंत ३३ हजार ६०० रुपयाची परतफेड बँकेला केलेली आहे. तसेच बँकेच्या खात्यामध्ये महिला बचतगटाचे १६ हजार रुपये शिल्लक असून परतफेडीमुळे बँकेत बचत गटाचा लौकीक वाढलेला आहे. अद्याप १ लाखाचे कर्ज बँकेकडून मिळावयाचे असून सदर्हू व्यवसाय मोठ्या प्रमाणात करण्याचा मानस अध्यक्ष सुशिला कडू व सचिव अनुसया गवळी यांनी बोलून दाखविला.

    या बचत गटाला प्रगतीचा मार्ग प्रशस्त करण्यासाठी ग्रामीण विकास यंत्रणेच्या सहयोगीका शेख बहिदा यांचा मोलाचा वाटा असून उन्नतीच्या पथावर चालून शिवाणी महिला बचत गटाने उंच भरारी मारली आहे एवढे मात्र निश्चितच.



  • मिलींद आवळे
  •  
  •   परसबागा फुलल्य
  •  
  •  

  •  रत्नागिरी तालुक्यातील जयगड ते निवळी या भागातून प्रवास करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला कातळाने व्यापलेला पृष्ठभाग दिसतो. काही ठिकाणी खुरटे गवत आणि पावसाळा असल्याने आकर्षक रानफुले दिसत असली तरी शेती मात्र अभावानेच आढळते. मधूनच डोकवणारी भातशेती या भागातील शेतकऱ्यांची धडपड दाखविण्याइतपतच मर्यादीत आहे. कातळामुळे शेतकऱ्यांच्या प्रयत्नांनाही मर्यादा येतात. मात्र अशा परिस्थितीवर मात करून कलझोंडी गावातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून शेतात भाजीपाला पिकवितांनाच घरासमोरील परसबागादेखील फुलविल्या आहेत.

    मुंबई-गोवा महामार्गावरील निवळीमार्गे जयगडला जाताना कलझोंडी गाव साधारण २५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावातील काही महिला आनंदी निंबरे आणि वंदना निंबरे यांच्या प्रयत्नामुळे एकत्र आल्या. त्यांनी श्री चंडीकादेवी बचत गटाची स्थापना २००३ मध्ये केली. दोन्ही गटांचे नाव श्री चंडीकादेवी याच नावाने मात्र अ आणि ब अशा स्वरुपात ठेवण्यात आले. अंतर्गत कर्जाच्या माध्यमातून गटाचे कार्य करतांना या महिलांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. लाभही फारसा मिळत नव्हता. त्यामुळे शेवटी बचत गट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र वासुदेव निंबरे यांनी या निर्णयापासून गटाच्या सदस्यांना परावृत्त करीत काहीतरी व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गटाने पुढील वाटचाल सुरू केली.

    गटाने प्रथम पतवारीत मिळालेल्या कर्जाची वेळेवर परतफेड केली. त्यामुळे दोन्ही गटांना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रत्येकी तीन लाखाचे कर्ज मंजूर झाले. गटाने भाजीपाल्याचा व्यवसाय सुरू केला. त्याचबरोबर विविध प्रदर्शनात घरी तयार केलेल्या वस्तूंची विक्रीदेखील केली. कर्जाचा विनियोग योग्य प्रकारे करताना गटाच्या सदस्यांनी व्यापक दृष्टिकोन ठेवला. गावातील ग्रामपंचायतीच्या विहीरीला पाणी होते. मात्र वस्ती उंचावर असल्याने शेतीची कामे करण्यात पाण्याची समस्या होती. मिळालेल्या कर्जातून ४५ हजार लिटरची टाकी उभारण्यात आली आणि विहीरीवर ५ अश्वशक्तीचा पंप बसविण्यात आला.

    गटाच्या सदस्यांनी केवळ शेतीसाठी ही सोय मर्यादीत न ठेवता परिसरातील ५० कुटुंबाना नळ कनेक्शन दिले. नळाद्वारे पावसाळ्यात २४ तास आणि उन्हाळ्यात कुटुंबाला १५०० लिटर पाणी दिले जाते. नळ योजनेचे काम १० लाखाचे असतांना स्वत: महिलांनी पुरुषांसोबत काम करून केवळ साडेचार लाखात काम पुर्ण केले. गटाचे काम पाहून श्री गजानन आणि भगवतीदेवी हे दोन बचत गटही या महिलांसोबत काम करायला तयार झाले. या दोन्ही गटांनी शेतीसाठी ५ लाखाचा प्रस्ताव सादर केला आहे. गटातील महिलांनी शेतात भाजीपाला फुलविताना घरासमोर परसबागेत केळी, टमाटा, भेंडी असे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

    बचत गटाकडील एक एकर शेतात पालक, मुळा, फरसबी, दोडकी, भेंडी, मिरची पिकविली जाते. या भाज्यांची जागेवरच विक्री होते. एका सदस्याला महिन्यातून दोन दिवस शेतात काम करावे लागते. घरचे काम सांभाळतांना घरासाठी भाजी मिळण्याबरोबरच कर्जाचा हप्ता जावून २० हजारापर्यंत फायदा होतो. वर्षातून एका मोठ्या प्रदर्शनात सहभाग घेतल्यास ४० ते ५० हजार रुपये फायदा होत असल्याचे सविता निंबरे सांगतात. या प्रदर्शनात गटाच्या नाचणा भागरी आणि मेथी भाजी, खरडी चटणी आणि तुळशी भजीला खुप मागणी असते. बांद्रा येथे भरलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनातही बचत गटाने चांगला व्यवसाय केला होता.

    बचत गटातील महिला आता रोहयो अंतर्गत गाळ उपसणे, पाखाडी तयार करणे अशा कामातही सहभागी होत आहेत. शेतीचे क्षेत्र वाढविण्याचे स्वप्न मनात बाळगून त्यांची वाटचाल सुरू आहे. नवे प्रयोग करण्याची त्यांची तयारी आहे. त्यांच्या याच धडपड्यावृत्तीमुळे आणि त्यांनी केलेल्या प्रगतीमुळे त्यांना द्वितीय क्रमांकाचा राजमात जिजाऊ पुरस्कारदेखील मिळाला आहे. कष्टाने पाषाणालाही बहर येतो हे या महिलांनी दाखवून दिले आहे.


     

      मार्ग स्वावलंबनाचा


      रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात बचत गट चळवळीने चांगला वेग घेतला आहे. महिला तसेच पुरुषांनीदेखील बचत गटाच्या माध्यामातून अनेकविध व्यवसाय सुरू केले आहेत. देवरुख येथील मातृमंदिर संस्थेच्या मार्गदर्शनातून या चळवळीत सहभागी महिलांची संख्या वाढत असल्याने त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची प्रक्रीयादेखील तेवढ्याच वेगाने पुढे जात आहे. साडवली गावातील तुळजाभवानी बचत गटाने केलेली प्रगती त्याचेच उदाहरण आहे.

    देवरुखपासून दोन किलोमीटर अंतरावर साडवली गावात रस्त्याच्या कडेला तुळजाभवानी बचत गटाचा मोठा फलक दिसतो. या भागात कुणीही या बचत गटाचा पत्ता सहज सांगू शकतो. परिसरात असलेल्या प्रत्येक घरात बचत गटातील सदस्य आहेत. मुख्य रस्त्याच्या डावीकडे आत शिरताच समोरच शेळ्यांचा वाडा दिसतो. एखादी महिला वाड्यातील स्वच्छतेचे काम करीत असते. बचत गटाविषयी बोलताच एका मुलाने पलिकडे जाऊन तरुण महिलेला सोबत आणले. बचत गटाची माहिती घेण्यासाठी कुणीतरी आले आहे हे कळल्यावर या महिलेने उत्साहाने चर्चा सुरू केली.

    बचत गटाची स्थापना २००६ मध्ये झाली. तत्पूर्वी गटाच्या सदस्य असलेल्या महिला चिरेखाणीवर मजूरी करण्यास दूरवर जायच्या. बऱ्याचदा काम मिळतही नव्हते. दिवसभर कष्ट केल्यावर ४० रूपये मजूरी मिळत असे. अशातच जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका संगीता त्रिभुवने यांनी या महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटीत होण्याचा सल्ला दिला. महिलांनादेखील रोजच्या विवंचनेतून सुटका करण्यासाठी नवा मार्ग हवा होता. या महिलांनी ग्रामपंचायतीतून माहिती घेतली. अशातच मातृमंदीर संस्थेने मदतीचा हात दिला. बचत गट सुरू करताना २५ हजार रुपये बिनव्याजी दिले. त्यावर या महिलांनी गटाचा व्यवहार सुरू केला. परिसरातील माळरानावर मुबलक चारा मिळत असल्याने शेळीपालनाच्या व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली.

    बचतगटाची पहिली पतवारी झाल्यावर गटाला ३५ हजाराचे कर्ज मिळाले. त्यातून महिलांनी मातृमंदीर संस्थेची काही रक्कम परत केली आणि प्रत्येकी एक शेळी खरेदी केली. गटाचा व्यवहार चांगला असल्याने आणि कर्जाची नियमित परतफेड होत असल्याने दुसरी पतवारी होवून गटाला २.५ लाख रुपये कर्ज मिळाले. त्यातून महिलांनी प्रत्येकी दोन शेळ्या खरेदी केल्या. शेळ्यांची चांगली देखभाल केल्यामुळे शेळ्यांची संख्या वाढत गेली. दरवर्षी प्रत्येक महिलेला घराचे काम संाभाळून १५ ते २० हजार रुपये मिळू लागले. त्यांच्या राहणीमानात बदल झाला.

    बचत गटामुळे मिळालेल्या अनुभवातून या महिला ग्रामसभेला उपस्थित राहून विकासविषयक चर्चेत सहभागी होऊ लागल्या आहेत. गटाच्या सदस्या जयश्री साठे यांच्या तोंडून 'गटामुळे स्टेज डेअरींग वाढले आहे' असं ऐकल्यावर खरोखर कौतुक वाटलं. निरक्षर असल्या तरी या महिला समाजातील विविध विषयांवर आता बोलू लागल्या आहेत. शासनाच्या शेळीपालन योजने अंतर्गतदेखील या गटाने प्रस्ताव दाखल केला आहे. त्यातून काहींनी आशा सेविका पदासाठी प्रशिक्षण घेऊन आरोग्यविषयक कामांना सुरुवात केली आहे. मिळालेल्या आत्मविश्वासाबरोबरच 'स्वावलंबनाच्या मार्गावरून' असेच पुढे जात मोठा व्यवसाय करण्याचे स्वप्न त्यांच्या डोळ्यासमोर उभे आहे. ते स्वप्न पूर्ण होणे हे पुढच्या प्रयत्नावर अवलंबून असले तरी त्यांनी चार वर्षात केलेली प्रगती पाहता पुढील काळात बचत गटाच्या माध्यमातून या महिला अधिक सक्षम होतील हे मात्र नक्की. 





    बचतगटातील पाच महिलांचे सक्षमीकरण

      र्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील गुंजरखेडा येथील रमाबाई महिला बचत गटांनी आपला आत्मविश्वास दृढ करुन श्रम शक्तीला सर्वोत्तम प्राधान्य दिले. त्यामुळे या बचत गटातील पाच महिलांनी अंतर्गत कर्ज घेवून जीवनमान उंचाविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असून सक्षमिकरणाकडे वाटचाल करीत आहे.

    गुंजरखेडा हे गाव पुलगाव ते आर्वी या रस्त्यावर असून, या गावाची लोकसंख्या दोन हजाराचया वर आहे. येथील दारिद्र्य रेषेखालील १५ महिला एकत येऊन त्यांनी २२ जानेवारी २००३ रोजी रमाबाई महिला बचत गटाची स्थापना केली. तत्पूर्वी या गटाची पहिली बैठक २५ डिसेंबर २००२ रोजी संपन्न झाली होती त्या बैठकीत बचत गटाच्या नावा सोबतच अनेक ठराव घेण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष म्हणून प्रतिभा अनिल इंगळे व सचिव म्हणून वनिता गौतम सिंगनापूरे यांच्या नावाची निवड करण्यात आली.

    बचत गटाची प्रत्यक्ष भेट घेतल्यानंतर अध्यक्ष श्रीमती इंगळे म्हणाल्या की रमाबाई बचत गटातील सर्वाधिक महिला ह्या दारिद्र रेषेखालील आहेत. पुरेसे शिक्षण नसलेल्या बचत गटाच्या महिलांमध्ये जबरदस्त असा आत्मविश्वास आहे. बैठकीत ठरल्याप्रमाणे रु. ३० मासीक वर्गणी गोळा करण्यास सुरुवात केली. रमाबाई महिला बचत गटाच्या नावाने बँक ऑफ महाराष्ट्र पुलगाव येथे बचतीचे खाते उघडण्यात आले. दोन वर्षात १० हजार ८०० रुपये जमा झाली. या रकमेतून सदस्यांना अंतर्गत कर्ज २ टक्के व्याजावर देण्यात आले. तसेच कर्जाऊ रकमेचे नियमित परतफेड बचत खात्यात जमा होत असल्याने बचत गटाची प्रामाणिकता पाहून १२ जानेवारी २००५ मध्ये महाराष्ट्र बँकेने १५ हजाराचे कर्ज गटाच्या अंतर्गत उलाढाली साठी मंजूर केले.

    या बचत गटातील पाच महिलांनी स्वत:चा व्यवसाय उभारला त्यामध्ये नंदा ठाकरे या महिलेनी दोन हजार रुपये कर्ज घेवून बांगड्या व स्टेशनरीचा फिरते व्यवसाय प्रारंभ केला. या व्यवसायातून त्यांना महिन्याला किमान ३ हजार रुपये नफा होत आहे.

    मंजू शेंडे या महिलेनी ५ हजार रुपये कर्ज घेतले होते. त्यांनी टेलरींगचा व्यवसाय स्व:ताच्या घरी सुरु केले. या व्यवसायाला परिसरात प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याने त्यांना सुध्दा महिण्याला ४ हजार रुपये शुध्द लाभ मिळत आहे.

    शालू वडकर या महिलेचा गावातच हॉटेलच्या व्यवसायासाठी ५ हजार रुपये कर्ज दिले. गावातील मुख्य रस्त्यालगत एकच हॉटेल असल्यामुळे व्यवसायात प्रगती सुरुच असून सर्व खर्च वजा जाता किमान ६ हजार रुपये निव्वळ नफा कमवित आहे.

    मेंढे या महिलेनी लेडीज गारमेंटचा व्यवसाय स्विकारुन प्रगती साधली आहे. त्यांना सुध्दा महिन्याला ३ हजार ५०० रुपये खर्च वजा जाता शुध्द लाभ मिळत आहे.

    या बचत गटाला आंगणवाडीचा आहार पुरविण्याची निविदा मंजूर झाली. त्यांचे संचलन वर्षा खडसे यांना बचत गटाच्या सदस्याला देण्यात आल्यामुळे त्यांना सुध्दा महिन्याकाठी ९०० रुपये मिळत आहे.

    छाया खोब्रागडे या महिलेने एक हजार रुपये कर्ज घेतले त्या रकमेतून एक म्हैस घेवून दुग्ध व्यवसाय करीत आहेत.त्यांचा व्यवसाय प्रगती पथावर असल्यामुळे आता त्यांच्याकडे ४ म्हशी झाल्या आहेत. त्यांना सुध्दा सर्व खर्च वजा जाता किमान ७ हजार रुपये नफा मिळत आहे.

    बचत गटाचा मूळ व्यवसाय साड्या विक्रीचा होता. प्रत्येक महिलेला कर्जाउ रक्कम दिल्यामुळे त्यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरु केला. कर्जाऊ घेतलेली रक्कम टप्प्याटप्प्याने व्याजासह बचत गटाला परतफेड केली आहे..

    साडयाच्या व्यवसायात वंदना बोरकर, मंगला इंगळे, अंजिता कळमकर, वनिता सिंगणापुर, प्रतिमा इंगळे व मंजू शेंडे कार्य करत आहेत. गटातील महिला त्यांच्या परिसरातील गावोगावी जाऊन घर भेटीतून साड्यांची विक्री करीत असतात. त्यांचे परिश्रम वाया जात नाही. उलट त्यांच्या साड्याच्या विक्रीतवाढ सुध्दा होत असते. महिन्याला साड्याच्या विक्रीपासून ६० हजार मिळतात. विक्रीवर २० टक्के कमीशन मिळत असल्याने बचतगटातील ६ महिलांना किमान २ हजार रुपये मिळत आहे असे अध्यक्ष श्रीमती इंगळे यांनी सांगितले.

    बचत गटातील महिला त्यांच्या व्यवसाला पारंगत होत असून, त्यांनी त्यांच्या कुटूंबाचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या व्यवसायाला त्यांनी वाहून घेतले आहे.

    अंतर्गत कर्जासाठी बचत गटाने घेतलेली १५ हजार रकमेचा बँकेला परतफेड केल्यानंतर ८ जानेवारी २००७ रोजी पहिला हप्ता ८३,६६२ रुपयाचा, दुसरा हप्ता १६ एप्रिल २००७ रोजी ८४८५ रुपयाचा व तिसरा हप्ता २६ डिसेंबर २०१० रोजी ४८ हजार रुपये असे एकूण २ लाख २० हजार रुपये बँकेने व्यवसायासाठी दिले असून, ४ हजार रुपयाचा विमा सुध्दा बँकेने काढला आहे.

    कापड व्यवसायासाठी मिळालेल्या रकमेतून महिलांसाठी साड्या, लुगडी, ड्रेस मटेरीयल, धोतर, लुंग्या इत्यादी बाजारातून घेण्यात आल्या असून ह्या वस्तू घरोघरी जाऊन बचत गटाच्या महिला विक्री करीत आहेत. विक्री झालेल्या माला नंतर नविन माल खरेदी केल्या जात असून, व्यवसाय उत्तम सुरु असल्याची ग्वाही श्रीमती इंगळे यांनी दिली.

    खामगाववाडी महिलांचा प्रक्रिया उद्योग

      म्हसळा तालुक्यातील खामगाववाडी येथील वैभव बचत गटातील महिलांनी शेअर स्वयंसेवी संस्था गोरेगाव –रायगडच्या मदतीने सौर शुष्क यंत्राच्या (सोलर ड्रायर)सहाय्याने वाळवणी प्रक्रिया व्यवसाय सुरु केला आहे.

    वैभव महिला बचतगट एक वर्षापासून आवळा कँडी प्रक्रीया उद्योग करीत आहे. आवळयापासून कॅन्डी तयार होण्यासाठी ५-६ दिवस कालावधी लागतो. गेल्या एक वर्षामध्ये त्यांनी १००० किलो पेक्षा जास्त आवळा कॅन्डी तयार करुन दोन लाखापेक्षा अधिक उलाढाल केली आहे. त्यातून निव्वल नफा एक लाखापेक्षा जास्त मिळवला आहे. बचतगटाची ही चिकाटी पाहून शेअर संस्थेने त्यांना (सोलर ड्रायर) सौर शुष्क यंत्राची उपलब्धता करुन दिली. नुकतेच त्यांनी त्या सौर शुष्क यंत्राच्या सहाय्याने कोकणामधील दुर्लक्षीत फळ करवंदे या पासून कोकणचा मेवा, हिरवी मिरची पावडर, गवती चहा पावडर तसेच कडीपत्ता पावडर उद्योग सुरु केला आहे.

    सदर सौर शुष्क उपलब्ध करुन देण्यासाठी संस्थेच्या संचालिका निकोला मॉन्टेरो प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार यांनी विशेष प्रयत्न केले. सदर सौरशुष्क यंत्र १५ किलो क्षमतेचे असून ब्रिटो एनर्जी इंजिनिअर्स विरार यांनी खास शेअर संस्थेसाठी बनविले आहे.

    या सौरशुष्क यंत्रामुळे महिलांचा पदार्थ साळवणेसाठी लागणारा ५० टक्के वेळ वाचला आहे. तसेच पदार्थाच्या गुणवत्तेमध्येही वाढ झाली. वैभव बचत गटातील नेत्रा नवघरे, रंजना गोसावी चंद्रकला मुंडेकर, विजया मेस्त्री, रेश्मा मिस्त्री, जानवी नवघरे,पार्वती शिगवण,गंगा नवघरे, सविता नवघरे, शेवंती गोसावी, वासंती गोसावी या सर्व महिलांना एकत्रित येवून शेअर संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील, गणेश मुरगुडे व कृषी कार्यकर्ते नाथाजी कटरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्तेचे अनेक पदार्थ बनवून आर्थिक उन्नती केली आहे.

    शेअरच्या संचालिका निकोला मॉन्टेरो प्रकल्प अधिकारी तुषार इनामदार व कृषी अधिकारी बाबासाहेब चव्हाण यांनी सौर शुष्क यंत्र महिलांना वापरण्याविषयी प्रोत्साहीत करुन सौरशुष्क यंत्र उपलब्ध करुन दिले.



     

    © Copyright PPPMS . All Rights Reserved.

    Designed by Avim and sponsored by PPPMS India