पर्यटन महामंडळाची ‘डिस्काऊंड ऑफर’… पर्यटकांना घडवील सुखाची सफर..

महाराष्ट्राचा देशाच्या पर्यटनातील टक्केवारी दिवसेंदिवस वाढत असून पर्यटकांचा ओघ वाढत आहे. स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, स्फुर्ती देणारे ऐतिहासिक गड किल्ले, मनशांती देणारी तीर्थस्थळे, निसर्ग पर्यटनाचा आनंद देणारे अभयारण्ये, जंगले अशी कितीतरी पर्यटनस्थळे पर्यटकांना साद घालत असतात. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या प्रयत्नांतून राज्यातील महत्‍त्वाच्या पर्यटनस्थळांवर विविध सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. यात महामंडळाकडून पर्यटकांना दिलेली सर्व सुविधांनी युक्त अशी निवासाची व्यवस्था उल्लेखनीय ठरत आहे. या निवास व्यवस्थेचा समाजातील दुर्बल घटक, ज्येष्ठ नागरिक यांना फायदा घेता यावा यासाठी महामंडळाने खास सवलती जाहीर केल्या आहेत. ‘महामंडळाची डिस्काऊंड ऑफर… ही सर्वसामान्य पर्यटकांना सुखाची सफर घडविणारी ठरणार आहे.’

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या विविध योजना राबवित आहे. त्याचबरोबर स्वच्छता मोहिमेसारख्या उपक्रमामध्ये सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपण्याचे प्रयत्न महामंडळाकडून केले जात आहेत. याअंतर्गतच राज्यातील माजी सैनिकांसह, अपंग नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांनादेखील पर्यटकांचा आनंद घेता यावा यासाठी महामंडळाकडून पर्यटक निवासांच्या भाड्यामध्ये सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत, त्या पुढीलप्रमाणे –

माजी सैनिकांसाठी सवलत :-

पर्यटन महामंडळाने आपल्या पर्यटक निवासांच्या दरपत्रकामध्ये भारतीय सैन्य दलातील माजी सैनिकांसाठी सर्व हंगामात 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. ही सवलत फक्त एका कक्षाच्या आरक्षणावर लागू राहील.

अपंग व्यक्तींसाठी सवलत:-
सर्व पर्यटक निवासात राहण्यासाठी येणाऱ्या अपंग व्यक्तींसाठी एका कक्षासाठी 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. ही सवलत अपंगत्वाचे प्रमाण 40 % व त्यावरील ओळखपत्र सादर करणाऱ्यांसाठी लागू राहील.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत :-
महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांना ते राहत असलेल्या एका कक्षाच्या आरक्षणावर 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ ज्येष्ठ नागरिकांना घेता येईल. 

याचबरोबरअनिवासी भारतीय आणि शासकीय कर्मचारी या पर्यटन व्यवसायासाठी महत्‍त्वाच्या ठरणाऱ्या घटकांसाठीदेखील सवलती देण्यात आल्या आहेत.

अनिवासी भारतीयांसाठी सवलत :-
देशात येणाऱ्या अनिवासी भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी आपल्या पर्यटक निवासामध्ये अनिवासी भारतीयांसाठी एका कक्षासाठी 10 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी उपभोक्त्यांना त्यांच्या पासपोर्टची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक आहे. 

शासकीय कर्मचा-यांना सवलत :-
महामंडळाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्र दर्शन सवलत योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्‍या महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांसाठी एका कक्षाच्या आरक्षणावर पर्यटक हंगामामध्ये 10 टक्के व बिगर हंगाम कालावधीमध्ये 20 टक्के सवलत देण्याचे जाहीर केले आहे. याचा लाभ शासकीय कर्मचारी घेऊ शकतात.

राज्यातील पर्यटन विकासासाठी भरीव प्रयत्न करणाऱ्या पर्यटन विकास महामंडळाने सामाजिक बांधिलकीचा विचार करुन या योजना जाहीर केल्या आहेत. समाजातील दुर्बल घटकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना या योजनांमुळे देशाटन करतांना नक्कीच फायदा होणार आहे. तर मग चला निघुया महाराष्ट्र फिरायला…! 

विजय अ.कोळी, 
प्र.जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी

औरंगाबाद : पर्यटन विकासाला चालना

औरंगाबाद जिल्हा जागतिक नकाशावर पर्यटन जिल्हा म्हणून ओळखला जात आहे. नुकताच शासनाने देखील अधिकृतरित्या शासन निर्णय घेऊन औरंगाबाद जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. 

जिल्ह्यात महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत विविध उपक्रम राबवून पर्यटनाला भरघोस चालना देण्यात येत आहे. महामंडळामार्फत महाभ्रमण आणि निवास व न्याहरी योजना सन 2014-15 मध्ये यशस्वीपणे राबविण्यात आली. पर्यटकांना पारंपरिक पर्यटनापेक्षा वेगळी अनुभती देणारे, महाराष्ट्राच्या संस्कृती व सांस्कृतिक परंपरांची ओळख करून देणारी महाभ्रमण योजना आहे. पर्यटकांना माफक दरात राहण्याची सोय या योजनेत आहे. स्थानिक सांस्कृतिक चालीरिती आणि खाद्य पदार्थ याची चांगल्या प्रकारे ओळख यातून होते. निवास व न्याहरी योजनेकरिता महामंडळाने संकेतस्थळावर पर्यटकांना माहिती व्हावी म्हणून योजनाधारकांच्या माहितीसोबतच छायाचित्रे देखील प्रसिद्ध केली आहेत. या योजनेला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महाभ्रमण योजनेत शेती, निसर्ग, ऐतिहासिक वारसा, वन्य व पर्यावरण, साहसी क्रीडा, परंपरा व लोककला, उद्योग सहल, अभ्यास सहल, यांचा प्रत्यक्ष अनुभव देणाऱ्या प्रकल्पास नोंदणी करण्यात येते. निवास व न्याहरी योजनेमध्ये पर्यटकांना किफायतशीर पद्धतीवर स्वच्छ निवासाची घरगुती सोय उपलब्ध करून देण्यात येते. या निवासात घरमालक व अधिकृत व्यक्ती या स्वत: राहून पर्यटकांना सेवा देतात. यासाठी महामंडळाच्या सर्व प्रादेशिक कार्यालयात व संकेतस्थळावर माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय अंतर्गत निवास व न्याहरी योजनेसाठी एकूण 7 नोंदणी धारक घरमालक आहेत. 

महामंडळ स्वत: चालवित असलेल्या पर्यटक निवासाच्या आरक्षणावर व्यक्ती अथवा संस्थांना सवलत देण्यात येते. शासकीय व निमशासकीय कर्मचाऱ्यांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार 10 % व बिगर हंगामी 20 % सवलत देण्यात येते. शालेय विद्यार्थ्यांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार 10 % सवलत 6 ते 16 वर्ष वयापर्यंत देण्यात येते. जेष्ठ नागरिकांना महामंडळाच्या दरपत्रकानुसार 20 % सवलत देण्यात येते. ज्या अपंग व्यक्तीकडे 40% अपंगत्वाचे प्रमाणपत्र आहे, अशा व्यक्तींसाठी 20% सवलत देण्यात येते. भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त अथवा कार्यरत सैनिकांना प्रमाणपत्र व ओळखपत्राच्या आधारे 20 % सवलत देण्यात येते. 

पर्यटन उद्योग वाढीस लागावा म्हणून खाजगी कंपन्याकरीता चर्चासत्र, कल्याण कार्यक्रम, स्नेह संमेलन याकरीता महामंडळाचे पर्यटक निवास आरक्षण 10 % सवलत उपलब्ध आहे. 

जागतिक वारसा स्थळ असलेले वेरुळ व अंजिठा लेणी येथे विदेशी पर्यटक गर्दी करतात. अंजिठा येथे दर्जेदार सोयी, सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी महामंडळाने अंजिठा पर्यटक निवास फर्दापूर हे तारांकित श्रेणी वाढवावी म्हणून विकासकामे करण्यात आलेली आहे. पर्यटक निवासात असलेले विहारा उपहार गृहात विदेशी पर्यटकांसाठी कॉन्टीनेन्टल फूडची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या पर्यटन निवासात 16 वातानुकूलित कक्ष, पर्यटक स्वागत कक्ष, वाय-फाय इंटरनेट सुविधा उपलबध करून देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दोन स्वतंत्र व्हॉल्वो बसेस वेरूळ व अंजिठासाठी नुकत्याच सुरू केल्या आहेत. पोलीस विभागाने पर्यटन सुरक्षा फिरती पोलीस वाहने कार्यरत केली आहेत. वेरुळ येथे महादेव वन उद्यान साकारणार आहे. पर्यटन विकासासाठी विविध प्रकल्प राबविण्याचे नियोजन आहे. एकूणच पर्यटनाला भरघोस चालना दिली जात आहे.

-रामचंद्र देठे
जिल्हा माहिती अधिकारी, औरंगाबाद

विविधांगी पक्षी, प्राणी व वनराईने नटलेले नवेगावबांध

हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेल्या कुशीत विसावलेला विस्तीर्ण जलाशय. दृष्टी जाईल तेथपर्यंत फक्त जलाशयाचे पाणी व हिरवळच दिसावी. हिरवळीचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडून जणू हे पाणी हिरवेगार दिसावे. अशा कातरवेळी निरव शांततेचा व त्या शांततेत आपलेच साम्राज्य भासवणाऱ्या असंख्य पक्षांचे अस्तित्व अनुभवायचे असेल तर नवेगावबांधला यायलाच हवे.

गोंदिया जिल्हा महाराष्ट्राच्या पूर्वेस असलेला. वनराईने नटलेला. धानाचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोंदिया जिल्ह्यात निसर्गाने मुक्त हस्ताने विविध रंगाची उधळणी केली आहे. नवेगावबांधमधील मुख्य आकर्षणाचे केंद्र म्हणजे पक्षी होय. नवेगावबांधचा परिसर विशेषत्वाने डोंगराळ असून तेथील वनाचा एकूण विस्तार 133 चौरस किमी आहे. 1975 साली नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान म्हणून शासनाने घोषित केले. थोर साहित्यिक व्यंकटेश माडगुळकरांपासून ‘अरण्यऋषी’ नावाने प्रख्यात लेखक मारुती चितमपल्ली यांच्या लेखनीतून नवेगावचा निसर्ग श्रावणातील सरींप्रमाणे अक्षरश: रिमझीमला आहे. 

नवेगावचा परिसर वनस्पतीसृष्टी, वन्यजीवसृष्टी आणि पक्षीसृष्टी यांनी समृद्ध व नटलेला आहे. हिवाळ्यात हजारोंच्या संख्येने स्थलांतरीत पक्ष्यांचे आगमन येथे होते. तेव्हा मात्र पक्षीप्रेमींना नवेगावची वाट खुणावल्याशिवाय राहत नाही.

सारसक्रेन, उघडचोच करकोचा, मध्यम व मोठा बगळा अशा पाणपक्ष्यांसोबत छोटा निळा खंड्या, पाणमोर, पाणकावळा, जांभळी पाणकोंबडी, टिटवा, पाणपिपुली ह्या छोट्या परंतू सुरेख पक्ष्यांची मालिका येथे आढळते. नवेगाव राष्ट्रीय उद्यानात बुलबुल, सुतारपक्षी, हुदहुद, शिकरा, दयाळ, कोतवाल, सातबहिणी, ससाणा, गरुड, घुबड, घार असे अनेकानेक पक्षी दिसून येतात. एकाकी व मनुष्यांची ये-जा नसल्यामुळे पक्ष्यांसाठी हे ठिकाण खरेच निवांत ठरते. येथे उभारलेल्या पक्षीदर्शक मनोऱ्यामुळे पक्षी प्रेमींना विविध पक्ष्यांना मनसोक्त न्याहाळता येते. पक्षी अभ्यासकांच्या मते महाराष्ट्रात केवळ नवेगाव येथेच सारस क्रोंच पक्ष्यांची वीण होते. येथील वनस्पतीतही विविधता आहे. त्यात साग, बिजा, धावडा, पळस, कवट, बेल, बोर, मोह, बेहडा, हिरडा, उंबर, जांभूळ यामुळे वनस्पतींची हिरवी झालरच असल्याचा भास होतो. 

पर्यटकांची येथे राहण्याची सुविधा व्हावी. याकरीता युथ होस्टेलमध्ये बेडची सुविधा असून लॉगहट, रेस्टहाऊस, हॉलीडेहोम रेस्टहाऊस असून यांचे सार्वजनिक बांधकाम विभाग, उपवनसंरक्षक (वन्यजीव विभाग) यांच्या कार्यालयातून आरक्षण करता येते.

पक्षी मित्रांच्या दृष्टीने स्थलांतरीत पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नोव्हेंबर ते फेब्रुवारी व वन्यप्राण्यांना बघण्यासाठी मार्च मे महिन्याचा कालावधी योग्य आहे. नवेगावबांध येथील हिरवे डोंगर, आरस्पानी व आरशासारखे सुरेख जलाशय, काळोख्या रात्रीत चांदण्याचे चमचमते पाणी सर्वकाही मन मोहून टाकणारे व मनातला कोलाहल जागे करणारी अनाहूत शांतता. चला तर नवेगावला.

- जिल्हा माहिती कार्यालय, गोंदिया

हत्तीबेट : पर्यटनाचे नवे आकर्षण

लातूर जिल्हा म्हटले की, शिक्षण, व्यापार, साखर कारखानदारी, पाणी टंचाई याची चर्चा अधिक होते. परंतू लातूर जिल्ह्यातील पर्यटन विकासाची, पर्यटन स्थळाची, तीर्थक्षेत्राची चर्चा होत नाही. हे वास्तव स्वीकारले पाहिजे. लातूर जिल्ह्यात अवघे एक ते दिड टक्के वन आहे. ही चिंतेची बाब आहे असं सारेच म्हणतात परंतू आहे त्या वनाचा विकास करणे, संवर्धन करणे, पडीक जागेवर वन निर्मिती करणे हे होतच नाही असं नाही त्याची चर्चा मात्र होतच नाही हे खरं आहे. 

लातूर जिल्ह्यात किल्ले, लेण्या आहेत. पुरातन शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली मंदिरे आहेत. वनराई आहे. गरज आहे त्याचा पर्यटनाच्या दृष्टीकोनातून विकास करण्याची विकेन्ड कुठे साजरा करावा, कुठे भटकंती करावी अशी ठिकाण शोधावी लागतात, शोधली की ती सापडतात हे मात्र नक्की. 

उदगीर तालुक्यातील देवर्जन जवळील हत्तीबेट हे असं एक ठिकाण आहे, ज्याची तुलना माथेरानशी केली तर ती अतिशयोक्ती होणार नाही. म्हटलं तर ते मानव निर्मित आहे, म्हटलं तर ते पुरातन वारसा लाभलेलं तीर्थक्षेत्रही आहे. या बेटाचा विकास हा गेल्या दहा वर्षा पेक्षा अधिक काळापासून पत्रकार व्ही. एस. कुलकर्णी या व्यक्तीच्या ध्यासामुळे होत आहे. ज्या बेटावर पूर्वी घनदाट जंगल होतं असं म्हटल जातं परंतू ते जंगल कालांतराने नष्ट झालं. त्या ठिकाणी उरला तो खडक, गुहा आणि धार्मिक इतिहासाच्या काही पाऊल खुणा ! धार्मिकता जोपासतच या परिसरात वन पर्यटनाच्या दर्जाला शोभेसं, काम आता तिथं झालेलं आहे. या डोंगरावर सगळा जांभा प्रकारात मोडणारा खडक आहे. शब्दशः खडक फोडून वनराई निर्माण करण्यात आली आहे. या बेटावर सध्या वीस हजार झाडांची लागवड झाली आहे. सुमारे 25 हेक्टर क्षेत्रावर पडणारे पाणी वन विभागाने सी.सी.टी. बंधारे बांधून 50 लाख लिटर पाणी अडवून झाडांची जोपासना केली आहे. या डोंगरावर लिंब, करंज, आंबा, चिंच, कांचन, आवळा, गुलमोहर, काशीद अशी काही उपयुक्त, काही शोभेची झाडे चांगली वाढली आहेत. ही आपोआप वाढली नाहीत. त्यासाठी मुलांसारखं या परिसरातील नागरिकांनी त्यांना जपलं आहे. त्यांचं संगोपन केलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी देण्यासाठी उदगीरच्या पशु वैद्यकीय महाविद्यालयातील वापरल्या गेलेल्या सलाईनच्या बाटल्यांचा वापर ठिबक सिंचनासाठी करण्यात आला आहे. त्यामुळे परिसर बहरला.

या हत्तीबेटाला राज्य शासनाच्या संत तुकाराम वनग्राम योजनेचा राज्यस्तरीय पहिला 10 लाखाचा पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराच्या रक्कमेतून स्थानिक वन संरक्षक समितीने त्या ठिकाणी छोटी नर्सरी केली आहे. मुलांसाठी खेळण्याचे साहित्य घेतले आहे. निसर्ग सौंदर्याच्या आनंद घेण्यासाठी आणि परिसराची टेहळणी करण्यासाठी दोन बाजूला टॉवरची उभारणी करण्यात आलेली आहे. तसेच पाणवठे निर्माण केल्यामुळे अनेक प्रकारचे पशुपक्षी त्या परिसरात आता अधिवास करीत आहेत. अनेक पक्षांचे आवाज ऐकण्याचा आनंद मिळतो. 

हत्तीबेटाचा विकास झाला पाहिजे यासाठी शासनस्तरावरही प्रयत्न होत आहेत. वनविभागाचे अधिकारी आणि विशेष म्हणजे हे बेट तीन गावाच्या सीमेवर आहे ती गावे धर्मापूरी, करवंदी आणि देवर्जन आहेत. या तीनही गावातील लोकांच्या तो अभिमानाचा विषय आहे. झाडाचा वाढदिवस साजरा करणे, झाडाला राखी बांधण्याचे पर्यावरण पूरक नाहीतर संवर्धक असे उपक्रम इथं होतात. 

गेल्या वर्षभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारच्या कार्यकाळात हत्तीबेटाच्या ‘क’ दर्जात वाढ होऊन त्याला आता ‘ब’ दर्जा मिळाला आहे. सरकारने गेल्या वर्षभरात या बेटासाठी 25 लाख रुपयाचा निधी मंजूर केला होता. या निधीतून डोंगरकड्याला पर्यटकासाठी संरक्षक कठडे निर्माण केले गेले जेणेकरुन उंचावरुन शुद्ध हवेचा आनंद घेण्यासाठी पर्यटक सुरक्षितपणे उभे राहू शकतात. त्याचप्रमाणे काही भागात वन संरक्षणासाठी तारेचं कुंपण आवश्यक होतं, ते कुंपण आता पूर्ण झालं आहे. 

हत्तीबेटावर सध्या दररोज मराठवाड्यातील अगदी जालन्यापासून ते हिंगोलीपर्यंतच्या शाळा महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या वनसहली येत आहेत. रविवारी, सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत. वनभोजनाचा आनंद लुटण्यासाठी तरुणांच्या सहली वाढल्या आहेत. बेटावर येण्यासाठीचा पक्का रस्ता, स्वच्छतागृह, पाणी, निवाऱ्याची व्यवस्था होण्यासाठी राज्य सरकारकडे 4 कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर झालेला आहे. एक चांगलं निसर्ग वनपर्यटन केंद्र विकसित करण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात अधिक लक्ष घातलं तर लातूर जिल्ह्याचं भूषण म्हणून ते विकसित होऊ शकतं.

हत्तीबेटाच्या विकासाला एका अर्थाने आणखी चालना देण्यासाठी गरज आहे असे प्रत्यक्ष तेथे भेट दिल्यानंतर प्रकर्षाने जाणवते. असे घडले तर लातूर जिल्ह्याच्या वैभवात एक नवी, कायमस्वरुपी, प्रेरणादायी भर पडेल, हे नक्की ! 

अरुण समुद्रे,ज्येष्ठ पत्रकार, लातूर
मो. 9075671169

वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’

वन संवर्धनाचा अमूल्य ठेवा ‘पेंच’

विदर्भातील वाघांच्या सर्वाधिक अधिवासामुळे नागपूर हे टायगर कॅपिटल म्हणून प्रकाशझोतात आले आहे. नागपूरच्या पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्पामुळे जैवविविधता आणि निसर्ग सौंदर्याबरोबरच वन्यप्राण्यांचे दर्शन याठिकाणी आपणाला घडते. पट्टेदार वाघ, हरिण, साळिंदर, नीलगाय, अस्वल, मोर आदी प्रकारचे वन्यप्राणी पर्यटकांना वारंवार येण्यासाठी खुणावतात. त्यांचे व वनाचे उत्तम संवर्धन म्हणजे आपल्यासाठी पेंच प्रकल्प अमूल्य असा ठेवाच म्हणावे लागेल. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी या ठिकाणी भेट द्यावीच, असाच हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प होय. 

येथील डिसेंबर महिन्यातली गुलाबी थंडी आणि आजूबाजूचे पर्यटन पर्यटकांना भूरळ घालतातच. राज्यातील सहापैकी पाच व्याघ्र प्रकल्प एकट्या नागपूर-अमरावती विभागात आहेत. महाराष्ट्र शासनाचे प्रयत्न, पर्यावरणप्रेमी संघटनांची साथ आणि सेलिब्रिटींचा सहभाग यामुळे वन्यजीवांचे संवर्धन होत आहे. राज्यातील सर्वाधिक वाघांचा अधिवास नागपूर-अमरावती विभागात आहे. त्यातही सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यात. पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील वाघांइतकीच संख्या पेंच-सिल्लारी व्याघ्र प्रकल्पात आहे. नागपूरपासून अवघ्या 80 किमी असलेल्या या प्रकल्पात 257 चौ. किमी असलेले राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या डोळ्यांचे पारणे फेडतो. जैवविविधतेने नटलेले विलोभनीय हिरवेगार डोंगर, तळे, दऱ्या-खोऱ्यातून वाहणारे पाणी, 33 प्रकारच्या सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, 164 प्रजातींचे विविध पक्षी, 50 हून अधिक प्रकारचे मासे, 10 प्रकारचे भू जलचर, 30 प्रजातींचे सरपटणारे प्राणी या राष्ट्रीय उद्यानात आहेत. विशेष म्हणजे निसर्ग सौंदर्य लाभलेले 24 पट्टेदार वाघही याच भागात अधिवास करतात. 

वाघांचे वैशिष्ट्य सांगायचे झाले तर वाघ ज्या भागात राहतात तेथील पर्यावरण उत्कृष्ट दर्जाचे मानले जाते. वाघ जैविक अन्नसाखळीतील प्रमुख घटक आहे. तृणभक्षी प्राण्यांची शिकार व त्यावर नियंत्रण ठेवण्याचे कार्य वाघच करतात. त्यामुळे पेंच-सिल्लारी पर्यटकांचे सर्वात मोठे आकर्षण आहे. येथील वाघांचे दर्शन व्हावे. त्यांची प्रतिमा, छबी आपल्या कॅमेऱ्यात टिपता यावी यासाठी राज्यासह देश-विदेशातून पर्यटक या ठिकाणी येतात. मुक्काम करतात. काहींना पहिल्याच भेटीत येथील ‘वीरप्पन’, ‘प्रिन्स’ यांची छबी टिपता येते. तर काहींना थोडासा वेळ लागतो. परंतू इथे येऊन वाघांचे दर्शन झाल्यास अधिक आनंद पर्यटकांच्या चेहऱ्यावर पाहावयास मिळतो. तरीही इथला निसर्ग पर्यटकांना निराश न करता आपल्यातील विविध प्रजातींच्या वृक्ष, प्राण्यांनी पर्यटकांना या ठिकाणी येण्यासाठी पुन्हा-पुन्हा खुणावतो.

पर्यटकांना याठिकाणी विशेषत: सांबर, हरिण, चितळ, नीलगाय, माकडे, कोल्हा, जंगली कुत्रे-डुकरे, अस्वल, बिबट्या, साळिंदर पाहावयास मिळतात. त्याचबरोबर स्थलांतरित पक्षी, त्यामध्येही विविध प्रजाती याठिकाणी आढळतात. वृक्षांमध्ये बांबू गवत, साग, विविध बहुउपयोगी औषधी वनस्पती या ठिकाणी दिसतात. तर यामध्ये विशेष करुन उल्लेख करावा लागेल तो कऊच्या झाडांचा. दिसायला अतिशय सुंदर असणारे हे वृक्ष प्रत्येक पर्यटकाला आकर्षित करतेच. या सुंदर अशा वृक्षाला ‘घोस्ट ट्री’ असे इंग्रजीत संबोधतात. तर काहीजण त्याला ‘नेकेड ट्री’ असेही म्हणतात. या वृक्षामुळे जंगलातील सौंदर्यात मोलाची भर पडलेली आपणाला जाणवते. जणू हे वृक्ष प्रत्येकाचे आकर्षण आहेच, हे पर्यटकांच्या आकर्षणावरून लक्षात येते. 

बखारी, सलामा, भूकंप रोड आदी ठिकाणांमध्ये ते पाहावयास मिळते. त्यानंतर बांबू वनातून सिल्लारी गेटकडे गेल्यानंतर शेवटच्या भागाला राज्यातील महत्त्वाचा असा जलसंपदा विभागाचा पेंच जलविद्युत प्रकल्प, तोतलाडोह पाहायलाच हवा. हे धरण 74.5 मीटर उंचीचे आहे. त्याची लांबी 680 मीटर आहे. 4273 चौ. किमी पाणलोट क्षेत्र असलेल्या या प्रकल्पातून 1532 द.ल.घ.मी. पाण्याची वार्षिक 40.5 कोटी युनिट निर्मिती होते. तर जलसंचयाच्या 1241 द.ल.घ.मी. पाणी वापरण्या योग्य असते, हे या प्रकल्पाला भेट दिल्यास समजते.

जंगलात सफारी करण्यासाठी स्थानिक जिप्सी वाहन, योग्य व अचूक माहिती देण्यासाठी नाममात्र मानधनावर गाईडही याठिकाणी उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी प्रती मानसी 90 रुपये प्रवेशशुल्क सिल्लारी येथे आगमन झाल्यास वन विभागाच्या तिकीट खिडकीवर भरावे लागते. राहण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळामार्फत खोल्यांची व्यवस्था आहे. सिल्लारी विश्रामगृहासाठी नागपूर विभागाच्या उपवनसंरक्षक कार्यालयाशी (0712-2524624) संपर्क साधता येतो.

पर्यटकांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा हा पेंच व्याघ्र संवर्धन प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान जैवविविधता, निसर्गसौंदर्याचा अतिशय सुंदर मिलाप असलेल्या वन आणि वन्यजीव संवर्धनाचा अमूल्य असा ठेवाच आहे. निसर्गावर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने एकदा तरी याठिकाणी भेट द्यायलाच हवी.

श्याम टरके, 
विभागीय माहिती कार्यालय, नागपूर

एक अब्ज पर्यटक, एक अब्ज संधी.... जागतिक पर्यटनदिनानिमित्त विशेष लेख...

पर्यटन... पर्यटन म्हटले की आजपर्यंत जनता धार्मिक स्थळे बघण्यास प्राधान्य देत असत. परंतु आज विविध माध्यमातून पर्यटनाची माहिती मिळत असल्याने पर्यटन कसे, का करावे ? याबाबत पर्यटनाची इच्छा बाळगणाऱ्या लोकांमध्ये जागृती झाली आहे. 27 सप्टेंबर रोजी जागतिक पर्यटनदिन आहे… यानिमित्ताने विशेष लेख.

आपण सर्वजण विविध कारणाने प्रवास करीत असतो. प्रवास करण्याची ही वृत्तीच यातील रोजगाराची संधी निर्माण करते. या कामातून आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक शाश्वत विकास साधू शकतो. मानवाची प्रवास करण्याच्या वृत्तीतून रोजगार प्राप्त होण्याची संधी, त्यातून पर्यटनासाठी संभाव्य क्षमता, आर्थिक वाढ, पर्यावरण संरक्षण व शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी यावर्षी 27 सप्टेंबर रोजी ‘एक अब्ज पर्यटक, एक अब्ज संधी’ या संकल्पनेवर हा ‘जागतिक पर्यटन दिवस’ साजरा करण्यात येत आहे. 1980 सालापासून विविध संकल्पना घेऊन त्या राबविण्याच्या दृष्टीने जागतिक पर्यटन दिवस साजरा केला जातो.

आज शिक्षणाचा प्रसार झाल्याने, स्त्रियांनीही भरपूर शिक्षण घेतल्याने घराघरांमधून स्त्रियांद्वारे पर्यटनासाठी प्रोत्साहन मिळत आहे. शिवाय संपूर्ण कुटुंबही त्यासाठी नियोजन करण्यात गुंतून जाते. ही बाबच पर्यटन वाढीसाठी खूप उपयुक्त ठरत आहे. जागतिक, भारतीय पर्यटनात महाराष्ट्राचे स्थान सर्वात वरचे असल्याने राज्यातील आणि राज्याबाहेरील पर्यटकांना राज्य, राज्याबाहेरील पर्यटन स्थळे तसेच देशविदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडीत आहे. तसेच इतर खाजगी कंपन्यांचे योगदान ही महत्त्वपूर्ण आहे, जे पर्यटकांना मुलभूत सुविधा पुरवितात.

राज्यात अजिंठा, वेरुळसह जागतिक दर्जाचा वारसा असलेली 5 स्थळे (वास्तू), 900 हून अधिक गुंफा, 350 किल्ले, त्यांचा समृद्ध इतिहास, वन्यजीव, जंगल, नॅशनल पार्क, समुद्र किनारे ही पर्यटनस्थळे आहेत. त्यांचे संवर्धन, जतन हे अधिकाधिक पर्यटन वाढीतून शक्य आहे. याची जाणीव शासनासही असून शासन आपल्या स्तरावर सर्व पर्यटनस्थळांचा विकास करण्यावर भर देत आहे. त्याशिवाय देशी-परदेशी पर्यटकांची टक्केवारी वाढण्यासाठी विविध उपाययोजना करुन सोई-सुविधा उपलब्ध करण्यासाठी पर्यटनावर आधारित उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्यात उद्योगधंद्यात गुंतवणूक वाढल्यास त्याचा पर्यटन उद्योगासही फायदा मिळणार हे लक्षात घेऊन ‘मेक इन महाराष्ट्र’, ‘स्वच्छता अभियान’, ‘स्मार्ट सिटी’, ‘जलयुक्त शिवार’ या शासनाच्या योजना जसजशा यशस्वीतेकडे वाटचाल करतील तसतसे पर्यटन उद्योग वाढीस नक्कीच चालना मिळेल. त्याचा मोठ्या प्रमाणात सकारात्मक परिणाम दिसून येईल.

राज्यात मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या पर्यटन क्षेत्राचे जागतिक स्तरावर आकर्षण आहेच. शिवाय आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या आरामदायी प्रवासासाठी ‘डेक्कन ओडीसी’सारखी पंचतारांकित सुविधा असलेली रेल्वेसुद्धा उपलब्ध करुन देण्यात आल्याने परदेशी पर्यटक तिचा लाभही घेत आहेत. अजिंठा, वेरुळसारख्या इतर ठिकाणी असलेल्या बौद्ध लेण्यांचे बौद्ध राष्ट्रांमध्ये मोठे आकर्षण आहे. तेव्हा या राष्ट्रांच्या सहयोगातून राज्य रस्ते, पाणी, वीज, आरोग्य सेवा, सुरक्षित वाहतूक यासारख्या सुविधा उपलब्ध करुन देऊन सुविधांचा दर्जा अधिक सुधारण्याकडे पर्यटन महामंडळ लक्ष देत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केलेल्या जपान दौऱ्यामुळे राज्यातील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढण्यास मदत मिळणार आहे.

पर्यटन म्हणजे नुसतीच भटकंती नसून त्यातून सेवा उद्योग ही महत्वाचा घटक आहे. हॉटेल, आरोग्य, पर्यटन, वन पर्यटन कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, फिल्मसिटी, संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजत आहे. जागतिक पर्यटनाच्या निमित्ताने आंतरराष्ट्रीय स्तरावरच महाराष्ट्राकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी MTDC ने मुंबईत ‘आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्ट’चे आयोजन केले आहे. 28 ते 30 सप्टेंबर या तीन दिवस चालणाऱ्या सोहळ्यास 30 देशांतील हॉटेल मालक, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर्स, साहसी टूर ऑपरेटर्स सहभागी होणार आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी पर्यटन स्थळांची ओळख आणखी जास्त देशांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंगचे प्रयत्न करण्याबरोबरच राज्यातील सर्वोत्तम ऐतिहासिक, बहारदार वारसा, नैसर्गिक आकर्षणे, विविध खाद्य पदार्थ, सांस्कृतिक सण-उत्सव, तीर्थक्षेत्र, सामाजिक आणि अभ्यास पर्यटनास जागतिक पर्यटकांपर्यंत नेण्यात येणार आहे.

या कार्यक्रमातून नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येईल आणि राज्यात अधिक रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे. जगभरात दशहतवादी हल्ल्यांचे सावट असतानाही पर्यटकांना सुरक्षिततेची हमी देण्याची जबाबदारी प्रत्येक राष्ट्राची आहे. तेव्हा पर्यटन दिन जागतिक स्तरावर साजरा करण्यामुळे पर्यटनावर निश्चित सकारात्मक परिणाम होण्यास मदत मिळेल.

-रेखा पालवे
उपसंपादक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.

बारडाचा राजा : पर्यटनाद्वारे पर्यावरण प्रबोधन

27 सप्टेंबर : जागतिक पर्यटन दिनानिमित्त विशेष लेख :
पयर्टन व्यवसायाला अलिकडे अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे. जगभरातील बहुतांशी राष्ट्रे तसेच आपल्या देशातील जवळजवळ सर्वच राज्ये या उद्योगाकडे मोठ्या सकारात्मक दृष्टीने पाहतात. अर्थकारण, रोजगार, मनोरंजन आणि सामाजिक सामंजस्य या गोष्टी प्रामुख्याने या पर्यटन व्यवसायामुळे साध होतात, हे नक्कीच.

हे झाले नेहमीचे. मात्र पर्यटनाच्या माध्यमातून वर्चस्वांचे प्रबोधनही घडावे, यादृष्टीने पालघर जिल्ह्यातील बोर्डीगावाजवळील आदिवासी वसती असलेल्या अस्वाली या खेड्यात येथील सुविद्य व तरुण शेतकरी सुर्यहास लक्ष्मीकान्त चौधरी यांनी बारडाचा राजा ही स्पर्धा सुरु करता करता निसर्ग पर्यटन केंद्रही कार्यान्वित केले आहे.

पश्चिम घाट परिसरातील उत्तरेकडील पार्वत रागांतील बारडाचा हा डोंगर म्हणजे या भागातील पश्चिम परिसराला मिळालेले वरदान आहे. अतिशय विलोभनीय जैवविविधतेने हा डोंगर संपन्न आहे. डोंगराच्या पायथ्याशी 'अस्वाली' हे आदिवासी गाव वसलेले आहे. पिक पाण्याने परिपूर्ण मात्र दऱ्याखोऱ्यांनी संपन्न असा हा भाग आहे. या बारडाच्या डोंगराला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे. डोंगरमाथ्यावर भूचार, पाण्याच्या टाक्या, किल्ला बांधणीचे अवशेष अशा अनेक गोष्टी पहायला मिळतात.

विशेष म्हणजे 14 व्या शतकात पारशी धर्मीय पर्शिया या आपल्या मायदेशातील छळाला कंटाळून जलमार्गाने आले ते थेट भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर. महाराष्ट्र गुजराथ राज्यांच्या सीमेलगत गुजराथेतील संजाण बंदर आणि उधवा या ठिकाणी गुजराथच्या शान्तताप्रिय राजाने त्यांना माणुसकीच्या भावनेतून आश्रय दिला. पर्शियातून येताना त्यांनी आपले दैवत म्हणजे 'अग्नी' देखील आणला होता. त्याचे योग्य रितीने पावित्र्य राखले जावे यादृष्टीने तो महाराष्ट्रातील बारडाच्या डोंगरावर सुरक्षीत स्थळी ठेवण्याचे ठरले. त्याप्रमाणे तो ठेवण्यात आला आणि सतत 73 वर्षे त्याची जपवणूक करण्याचे भाग्य बारडाच्या डोंगराला मिळाले, असे म्हणतात. त्याचा परिणाम म्हणजे बारडाच्या डोंगरानजिकच्या म्हणजे घोलवड, बोर्डी, उडाणू, सार्द-बोरीगाव या विभागात पारसी धर्मियांनी आपले वस्तान बसविले. आजही मोठमोठाले पारशी फलोत्पादक या भागात स्थिरावले आहेत व फलोत्पादन क्षेत्रात मोलाचे योगदान ते देत आहेत.

या सर्व गोष्टी आणि या डोंगराळ असलेल्या प्राचिन अवशेष इत्यादी लक्षात घेता येथील गुंफेची पुरातत्व विभागाने देखील नोंद घेतली आहे, असे सुर्यदास चौधरी पर्यटकांना आत्मियतेने सांगतात.

सुगीच्या दिवसातील 'इव्हेन्ट'

बारडाचा राजा, ही एक गिरीभ्रमणाची स्पर्धा आहे मात्र आज या स्पर्धेला इव्हेन्टचे स्वरुप आले आहे. दिवाळी-दसऱ्याच्या निमित्ताने शाळा-कॉलेजेसना सुट्टी असते. शेतातील धान्य शेतकऱ्यांनी घरी आणलेले असते म्हणून हे दिवस त्यांच्या दृष्टीने सुगीचे दिवस असतात. त्याचवेळी हा भ्रमंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. त्यासोबत अस्वाली ग्रामपंचायतीच्या विद्यमाने क्रीडा-स्पर्धाही आयोजित करण्यात येतात. धनधान्य घरात आल्यावर या सुमारास तारप/नृत्य, सोंगे घेणे, पारंपारिक नाचगाणी या स्वरुपात या भागात आदिवासी संस्कृतीचे सुकृत दर्शन पर्यटकांना घडते.

या इव्हेन्टवर आदिवासी युवकांचे वर्चस्व असते. मात्र शेजारच शाळा-कॉलेजचे तरुण आणि तरुणी यामध्ये आवर्जून सहभागी होतात. या इव्हेन्टद्वारे सर्वांनाच भरभरुन आनंद उपभोगता यावा, यादृष्टीने येथील सुविद्य आदिवासी युवकांनी शालेय विद्यार्थी गट, महाविद्यालयीन विद्यार्थी गट, खुला गट, हौशी गट, वगैरे वगैरे विविध गट पाडले आहेत. ज्यायोगे आबालवृध्दांना या भटकंतीचा किंवा इव्हेन्टचा आस्वाद घेता येतो. गेली कित्येक वर्षे 'बारडाचा राजा' ही स्पर्धा सातत्याने सुरु आहे. या गिरीभ्रमण स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या स्पर्धकांना 'बारडाचा राजा' हा किताब दिला जातो.

या स्पर्धेच्या निमित्ताने या डोंगरावरील पुरातन टाक्यांची सफाई, प्लास्टिकची सफाई, या गोष्टी हे स्पर्धक करतात. गिरीभ्रमण करताना पर्यावरणाला धोका पोहोचेल अशा गोष्टी करु नयेत अशा सूचना स्पर्धकांना दिल्या जातात. त्यांचे तंतोतंत पालन सर्वच जण करतात. त्यात वन्यप्राणी, सरपटणारे प्राणी, पक्षी, फुलपाखरे यांना कोणत्याही प्रकारची इजा पोहचणार नाही याची हे सर्व स्पर्धक काळजी घेतात. त्याचबरोबर डोंगरमाथ्यावर बीजारोपणही करतात. ज्यायोगे भविष्यात ती बीजे संकरुन त्यांचे वृक्ष होतील असा विश्वास त्यांच्यात निर्माण करुन देण्यात येतो.

बारडाचा राजा हा इव्हेन्ट विशिष्ट कालावधीत होतो. त्यामुळे दूरवरच्या शाळा-कॉलेजातील विद्यार्थी, नागरिक यांना त्या विशिष्ट कालावधीत त्यात सहभागी होऊन आनंद घेता येत नाही म्हणून दूरुन येणाऱ्या पर्यटकांना संपूर्ण वर्षभर या गिरीभ्रमणाचा व निसर्गाच्या सहवासाचा लाभ व्हावा म्हणून शेजारीच म्हणजे डोंगराच्या पायथ्यालगत निसर्ग पर्यटन केंद्र सुर्यहास चौधरी यांनी सुरु केले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नाशिक इत्यादी शहरातील शाळकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी कँप घेऊन येतात. सतर्क काही दिवस वास्तव करतात. तसेच इतर नागरिक येतात. शहरात येणारे हे पर्यटक येथल्या निसर्गात आणि लोकजीवनात एकरुप होतात. वारली (आदिवासी) संस्कृती, कला, विविध वृक्ष, औषधी वनस्पती, पशुपक्षी, फुलपाखरे, शेती याबद्दली माहिती त्यांना देण्यात येते. ही माहिती पर्यटकांना तेथील आदिवासी युवकच देतात. सुर्यदास चौधरी यांनी येथील स्थानिक युवकांना याबद्दलचे प्रशिक्षण्ण दिले आहे. त्यामुळे ते येथे 'टुरिस्ट गाईडचे' काम करतात. त्यांच्यामुळे झाडाफुलांची अचुक माहिती मिळविणे, सुलभ असे गिरीभ्रमण करणे, इत्यादी गोष्टी पर्यटकांना या युवकांकडून सहजगत्या प्राप्त होतात.

हे स्थानिक सुशिक्षित युवक याशिवाय आपली शेती तसेच शेळ्यामेंढ्या पाठणे, कोंबड्या पाळणे या गोष्टीही करतात. त्यामुळे त्यांचे राहणीमान सुधारते आहे. त्यांच्या वयोवृध मातापित्यांना आता काबाडकष्ट करावे लागत नाहीत आणि योग्य उत्पन्न मिळत असल्यामुळे ते स्थलान्तर करीत नाहीत.

अलिकडे या निसर्ग पर्यटन केंद्राला भरभरुन प्रतिसाद मिळत आहे. केवळ शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थीच नव्हे तर विविध कॉर्पोरेट क्षेत्रातील अधिकारी तसेच कर्मचारी येथे कँप घेऊन येतात आणि निसर्गाशी समरस होतात. ध्वनी प्रदुषण करणाऱ्या लाऊडस्पीकर अथवा डी.जे. (DJ) वाजविण्यास तसेच फटाके उडविण्यास येथे सक्त मनाई आहे. येणाऱ्या पर्यटकांना डोंगरदऱ्यात फिरविण्यात येते. तेथील विविध वृक्ष, फळे, फुले, वेली, झुडपे, पशु-पक्षी, नाग, साप, विंचू घोरपड इत्यादी सरपटणारे प्राणी यांची माहिती देण्यात येते. पर्यावरणाच्या समतोल अविरत टिकण्याच्या दृष्टीने त्यांची गरज कशी आहे, हे देखील त्यांना समजविण्यात येते.

विश्वाच्या उत्पत्तीनंतर 5.6 हजार अब्ज वृक्ष भूतलावर होतेृ त्यातील 3.04 हजार वृक्ष शिल्लक आहेत. जवळजवळ 15 अब्ज वृक्ष दरवर्षी तोडले जातात मात्र फक्त 5 अब्ज वृक्षच दरवर्षी लावले जातात. सुमारे 10 अब्ज झाडे या ना त्या कारणाने नष्ट होतात. असेच जर घडत राहिले तर आगामी केवळ 300 वर्षाच्या कालावधीतच सर्वच वृक्षसंपदा नष्ट होईल, असे अमेरिकेतील 'नेचर' या विज्ञानविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाले आहे, अशी बातमी एका अग्रगण्य मराठी दैनिकाने दिली आहे. अर्थात अशाप्रकारे सर्व वृक्षसंपदा संपुष्टात आल्यावर भूतलावरी सर्व जीवसृष्टीही लोप पावेल, याची जाणीव संबधीत पर्यटकांना व्हावी. ज्यायोगे त्यांचे प्रबोधन होऊन प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे त्यांचा वृक्ष संवंर्धनास हातभार लागावा, हा दृष्टीकोन सुर्यदास चौधरींचा आहे. शासकीय पातळीवर वनीकरणाचे अनेक कार्यक्रम सुरु आहेत. मात्र ज्या गतीने नागरीकरण होत आहे त्याच्या दुप्पट वेगाने हे वनीकरणाची गरज आहे, असे त्यांचे मत आहे. हे करीत असताना इच्छूक पर्यटकांना ते झाडांच्या बियांचे वाटप देखील करतात. जंगलात वाढणारे वृक्ष म्हणजे जांभूळ, चिंच, करवंद, फालसा, आंबा, बांबू, कडूनिंग, अशोक, शिसव, हिरडा, भेडा, भेंड अशा प्रकारचे स्थानिक पर्यावरणाला दाद देणारे आणि वाऱ्यापाण्याने सजगत्या न मोडणारे वृक्ष लावण्याचा ते आग्रह करतात. अधिक उपरोक्त वृक्ष व इतरही वृक्ष यांच्या बिया निसर्ग पर्यंत केंद्रावर आणून द्याव्यात असेही आवाहन करतात. काटेरी बाभूळ, शिंदी, पांगारा इत्यादी काटेरी वृक्षांवर सापांचा आणि ससाणे, गरुड, घार इत्यादी पक्षांचा वावर नसतो. त्यामुळे या वृक्षांवर पक्षी अंडी घालतात व पिल्लांचे संवर्धन करतात. म्हणून काटेरीवृक्षही लावावेत ज्यायोगे संपदेत भर पडेल असेही सुर्यहास चौधरी पटवून देतात. घाणेरी सारख्या झुडुपांवर असंख्य फुलपाखर, मधुमक्षिका बागडत असतात. अशाही झुडपांचे संवर्धन होण्याची गरज आहे. याशिवाय अलिकडे आयुर्वेदाला जगभरात अनन्यसाधारण असे महत्व प्राप्त झाले आहे आणि त्याला पोषक अशी वनौवधी पश्चिम घाटात विपुल प्रमाणात आहेत. त्यांचेही रक्षण व संवर्धन होण, ही काळाची गरज आहे, असेही भावनात्मक आवाहन ते पर्यटकांना करतात. याशिवाय या केंद्रात येणाऱ्या पर्यटकांनी येथे असलेल्या फार्महाऊसवर किंवा बंगल्यात न राहता त्यांनी मचाणावर रात्र घालवावी, असा चौधरींचा आग्रह असतो. अर्थात या आग्रहाला भरभरुन प्रतिसाद मिळतो आणि बहुतांशी पर्यटक रात्री मचाणावरच बसून निसर्गाशी समरस होतात. पहाटे-पहाटे विविध पक्षांच्या नादमधुर आवाजाने त्यांना जाग येते आणि प्रत्यक्ष निसर्ग आणि शहरातील जीवन यात किती पोकळी आहे. याचा विचार त्यांच्या मनात साहजिकच येत असावा.

या भागात भातशेतीचे पीक घेतले जाते. पावसाळ्यात भाताची लावणी चिखळणी करुन करण्यात येते. ही चिखळणी नांगराने होते. पावसाळ्यात जेव्हा पर्यटक येतात तेव्हा स्वत:हून नांगर धरणासाठी चिखललेल्या शेतात उतरतात. ज्यायोगे त्यांना विनासायास 'मड बाथ' घडते काही 'मड बाथ' हा प्रकार काही रिसॉटवर आहे. मात्र हे 'मड बाथ' खूप महागडे असते. परंतु निसर्ग पर्यटन केंद्रानजिक हे 'मड बाथ' विनामूल्य अनुभवता येते.

या सर्वकष भ्रमंतीच्या कार्यक्रमात पर्यटकांना विविध, साप-सर्प म्हणजे नाग, कोंब्रा,धामण, कणेर, घारेपड, विंचू, दिवड इत्यादी सरपटणाऱ्या प्राण्यांची माहिती दिली जाते. काही ठिकाणी त्यांचे दर्शनही घडते. महत्वाचे म्हणजे या पंचक्रोशित कुठे सर्प घरात अथवा परिसरात आढळला तर त्याला मारु नका, तसा या पर्यटन केंद्राला 8007846966 या भ्रमणध्वनीवर निरोप द्या, आचमी टीम त्या सर्पाला इजा न देता पकडेल आणि त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जंगलात सोडण्यात येईल, असा आग्रह सुर्यहास लोकांना असतो. याशिवाय कुठेही जखमी पक्षी अथवा वन्यप्राणी आढळला तर सुर्यहास त्यावर उपचार करुन वन अधिकाऱ्यांच्या ताब्यात देतात. तूर्त ते पर्यावरणाचे शिक्षण देण्यासाठी नेचर कँप को-ऑर्डिनेटर म्हणून बऱ्याच (Nature, Camp P-ordinator) परिसरातील शिक्षण संस्थात विद्यार्थ्यांना पर्यावरण विषयक ज्ञानदान करतात.

अशा प्रकारे पर्यटक, विद्यार्थी व इतर जनतेद्वारे पर्यावरण विषयक संदेश सगळीकडे जावा म्हणून हा अट्टाहास करण्यात मला आलिक आनंद मिळतो असे ते सौजन्याने म्हणतात. 


संपर्काचा पत्ता : श्री. सूर्यहास लक्ष्मीकांत चौधरी,
निसर्ग पर्यटन केंद्र, अस्वाली गाव,
काथा बोर्डी, ता. डहाणू, जिल्हा पालघर. (भ्रमणध्वनी- 8007846966)

शब्दांकन- निरंजन राऊत(9869914981 9594482030)

पर्यटनासाठी खुणावणारे पालघर

पालघर जिल्ह्याकडे पर्यटनाचा एक नवीन पर्याय म्हणून बघितले जात आहे. या शहराला निसर्गाने मुक्तहस्ताने सौंदर्य बहाल केले आहे. पर्वत रांगा, धबधबे, तलाव, पुरातन वास्तुकला, नयनरम्य सनसेट पॉइण्टस, आणि रेखीव मंदिरे या सुंदर आणि शांत शहराला एक परफेक्ट डेस्टीनेशन बनवतात. पालघर जिल्हा उद्या १ ऑगस्ट रोजी आपला पहिला वर्धापन दिन साजरा करीत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील पर्यटन स्थळांची माहिती खास महान्यूजच्या वाचकांसाठी.... चला या पर्यटन स्थळांना एकदा अवश्य भेट देऊन या निसर्गाचा आनंद लुटुया...

दाभोसा आणि दादरकोपरा धबधबा

जव्हार पासून 18 कि. मी. वर तलासरी-सिल्व्हासा रोडवर हे सुंदर धबधबे आहेत. लेंडी नदीपासून वाहणारे पाणी डोगरांच्या दोन्ही बाजूने धबधब्याच्या रूपात खाली येते. दाभोसा हा मुख्य धबधबा असून उंची 300 फूट इतकी आहे. दादरकोपरा धबधबा हा उन्हाळ्यात कोरडा असतो म्हणून त्याला सुका धबधबा असेही म्हणतात. दोन्ही धबधबे हे सुमारे 600 फूट उंच डोंगरांनी वेढलेले आहेत. या भागात अनेक वनऔषधी वनस्पती आढळून येतात. फेब्रुवारी ते जुलै ही या धबधब्यास भेट देण्यासाठी आदर्श वेळ आहे.

शिर्पामाळ


3 शतकांपेक्षा ही जुने असे हे शिल्प शिवरायांच्या स्मरणार्थ बांधले गेले आहे. डोंगराच्या कडेवर असल्यामुळे शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी या भागाचा वापर केला जात असे. या भागातून संपूर्ण जव्हार शहरावर दृष्टीक्षेप टाकता येतो. सुरतच्या दिशेने कूच करताना शिवरायांनी याच भागत थांबून विश्रांती घेतली होती. जव्हारचे त्यावेळचे राजे पहिले विमशहा यांनी छत्रपतींना मानाचा शिरपेच देऊन जव्हारमध्ये स्वागत केले तेच हे ऐतिहासिक स्थळ. हिरव्यागार टेकडीवर फडकणाऱ्या भगव्याचे दृष्य अत्यंत सुंदर दिसते. जव्हारमध्ये अजून बरीच पर्यटन स्थळे आहे ज्यामध्ये दक्षिणमुखी मारूती मंदिर, वर्षभर सतत वाहणारा काळ मांडवी धबधबा, सुंदर आणि शांत खदखद तलाव, शिवरायांनी बांधलेला भोपाटगड किल्ला यांचा समावेश होतो.

जयविलास राजवाडा

जव्हारमधील सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असलेला हा वाडा ‘राज बरी’ या नावाने सुद्धा ओळखला जातो. राजे यशवंतराव मुकणे यांनी बांधलेला हा राजवाडा मुकणे घराण्याच्या राजाला राहण्यासाठी बांधला होता. येणाऱ्या शत्रूवर नजर ठेवण्यासाठी हा वाडा डोंगराच्या माथ्यावर बांधला आहे. आदिवासी संस्कृती दर्शवणारे कोरीवकाम, राजवाड्याची घुमटे आणि आजूबाजूला पसरलेले हिरवे जंगल ही या राजवाड्याची वैशिष्ट्ये आहेत. गुलाबी दगडातून तयार केलेल्या या अद्वितीय अशा वास्तुरचनेमुळे या वाड्याचा वापर अनेक फिल्म शूटस साठी केला गेला आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांपर्यंत हा राजवाडा पाहण्यासाठी खुला असतो. राजवाडा आतून पाहण्यासाठी माफक प्रवेश फी आकारली जाते.

हनुमान पॉइण्ट

शहराच्या मध्यवर्ती भागापासून सुमारे 1 कि. मी. अंतरावर एक हनुमानाचे प्राचीन मंदिर आहे. या पॉइण्टला हनुमान पॉइण्ट असे म्हणतात. तिन्ही बाजूने वेढलेली खोल दरी, दाट जंगले, जवळच्या राजविलास राजवाड्याची प्राचीन घुमटे, दूरवर दिसणारा ऐतिहासिक शहापूर माहोलीचा किल्ला आणि मोकळे आकाश असे नयनरम्य दृष्य येथून दृष्टीस पडते. रात्रीच्यावेळी येथून दिसणारा, कसाऱ्याच्या घाटातून जाणऱ्या ट्रेनचा प्रकाश एक वेगळाच अनुभव देऊन जातो.

सनसेट पॉइण्ट

जव्हारचा अजून एक प्रसिद्ध पॉइण्ट म्हणजेच सनसेट पॉइण्ट आहे. शहराच्या मध्यवर्ती भागापासून पश्चिमेला फक्त अर्धा किमी वर हा पॉइण्ट आहे. जोडप्यांचा लाडका असलेला हा पॉइण्ट सूर्यास्ताचे एक अप्रतिम दृष्य दाखवतो. येथून दिसणाऱ्या दरीचा आकार हा धनुष्यासारखा आहे म्हणून पूर्वी या भागाला ‘धनुकमळ’ असे म्हणत. येथून 60 कि. मी. दूर असलेल्या डहाणू जवळच्या महालक्ष्मी डोंगराचे सुंदर दृष्य दिसते. दरीमधल्या दाट गर्द झाडीवर पडणारी सूर्य किरणे पाहण्याचा अनुभव शब्दात वर्णन न करता येण्यासारखा आहे.

शिरगाव

शांतनिवांत सागरतीर, किनाऱ्यावरच शतकानुशतकांचा इतिहास सांगणारा दुर्ग आणि हिरव्यागार परिसराच्या कोंदणात वसलेलं शिरगाव हे मुंबई-ठाणेकरांसाठी एक निसर्गरम्य ठिकाण आहे. ठाणे जिल्ह्यातल्या पालघर तालुक्याला शांतनिवांत सागरतीर लाभला आहे. शिरगावचा किल्ला हा किनारी दुर्ग प्रकारातला असून तो पालघरच्या पश्चिमेला आहे. पालघरपासून 7 ते 8 कि.मी. अंतरावर शिरगावचा किल्ला आहे. शिरगावचा किल्ला पाहण्यासाठी आपल्याला प्रथम पालघरला पोहोचणं आवश्यक आहे. पोर्तुगीजांनी बांधलेल्या शिरगावच्या किल्ल्यावर छत्रपती संभाजीराजांनी इतर किल्ल्यांबरोबर हल्ला चढवला होता. पण तो त्यावेळी ताब्यात घेता आला नाही. पुढे चिमाजी आप्पांनी उत्तर कोकणाच्या मोहिमेत शिरगावचा किल्ला ताब्यात घेतला. गावाच्या मधोमधच किल्ला आहे. पोर्तुगीजकालीन वैशिष्ट्यपूर्ण बांधणी आणि मनोऱ्यामुळे किल्ला प्रथमदर्शनातच आकर्षून घेतो. पहिला दरवाजा पुर्वाभिमुख असून त्याच्या बाजूने ओवऱ्या आहेत. प्रवेशद्वाराच्या पुढे दुसरा दरवाजा आहे. दरवाजावरील नक्षीकाम पाहण्यासारखं आहे. दोन्ही दरवाजांच्यामध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. दुसऱ्या दरवाजातून आत गेल्यावर किल्ल्यामधील पडझड झालेल्या वास्तू दिसतात. किल्ल्याचा आकार फारसा मोठा नसल्याने गडफेरीला फार वेळ लागत नाही. तटबंदीवर जाण्यासाठी पायऱ्यांचा मार्ग आहे. या पायऱ्यांवरून तटबंदीवर पोहोचल्यावर प्रवेशद्वाराच्या वर बांधलेल्या घुमटाकृती मनोऱ्यावर जाता येते. तटबंदीवरून किल्ल्याला फेरी मारता येते. पूर्वेकडील आयताकृती मनोऱ्यावरून शिरगावचं मनोवेधक दृष्य दिसतं. गडाचा आकार छोटा असल्याने बांधकामं आटोपशीर आणि कमी जागेत बसवलेली आढळून येतात. पश्चिमेकडील बुरूजावरून अथांग सागराचे रमणीय दृश्य दिसते. या बाजुच्या तटबंदीमधे एक चोर दरवाजाही आहे. किल्ल्यामधे असलेल्या ताडवृक्ष आणि त्यांच्या फांद्या सुंदर दिसतात.

कसं पोहोचाल?

मुंबई - अहमदाबाद महामार्गावरील मनोर येथून पालघरला रस्ता जातो. पालघर रेल्वे स्थानकही आहे. शटल- मेल, लोकलने पालघरला जाता येते. तिथून शिरगावला जाण्यासाठी एस.टीची सोय आहे. एस.टी. थांब्यापासून लगेच किल्ल्याजवळ पोहचू शकतो.

गारेश्वर मंदिर वसई

तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत 2177 फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने व प्रसिद्ध आहे . वसई तालुक्यातलं हे ठिकाण येथील निसर्ग सौंदर्यामुळे , धबधब्यांमुळे पर्यटकांचं हिवाळा व पावसाळ्यातलं खास आकर्षण बनलं आहे. परशुरामाच येथे वास्तव्य होते. विमालासूर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला येथे येऊन राहण्यास सांगितले व शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमालासूर या राक्षसाने येथे केली अशी आख्यायिका आहे. तुंगारेश्वर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग आहे. परंतु मुंबई पासून थोडसं लांब असलेलं हे ठिकाण कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे मन रिझवत आहे. धबधब्याचा व थंडगार वातावरणाचा आस्वाद घेण्यासाठी या स्थळाला नक्की भेट द्या.

जीवदानी मंदिर

सतराव्या शतकात म्हणजेच सुमारे 350 वर्षांपूर्वी मुंबईपासून 60 किलोमीटर अंतरावर विरार येथे डोंगरावर जीवदान या किल्ल्याचा शोध लागला. तो पांडवांचा असल्याचे मानले जात होते. तेथील एका गुहेमध्ये जीवदानी आई जी आदिशक्तीचे स्वरूप आहे तिचा वास होता अशी मान्यता आहे. जीवदानी देवी ही 51 शक्तीपीठांपैकी एक आहे येथे रोज हजारो भाविक देवीचे दर्शन घ्यायला येतात. ही देवी नवसाला पावते असा या भाविकांचा विश्वास आहे. या मंदिराला 1500 पायऱ्या आहेत. पायऱ्या न चढता येणाऱ्यांसाठी रोप वे ची सोय देखील उपलब्ध करून दिलेली आहे. डोंगरावर पोहोचल्यावर थंड वातावरणात थकवा कुठच्या कुठे पळून जातो. तसेच शांत वातावरणात देवीची आराधनाही व्यवस्थित करता येते. नवरात्रीमध्ये तर हे मंदिर विशेष आकर्षण ठरते.

डहाणूचा किल्ला

सध्याच्या घडीला या किल्ल्यावर तहसलीदार कार्यालय थाटलेलं आहे. एकेकाळी या किल्ल्याचा उपयोग व्यापारासाठी मोठ्या प्रमाणावर केला जायचा. आजही त्या ठिकाणी त्याच्या काही खुणा दिसतात. किल्ल्याची रचना व मांडणी व्यापारदृष्ट्या पूरक आहे.

कसे पोहोचाल?

पश्चिम रेल्वेने डहाणू स्टेशन गाठायचं. तिथून बसने 15 मिनिटात किल्यावर पोहोचता येतं.

तारापूरचा किल्ला

या किल्ल्याची मांडणी पाहण्यासारखी आहे. खाडीलगत असलेल्या या किल्ल्याचा वापर मालमत्ता ठेवण्यासाठी केला जायचा. सध्या या किल्ल्याला कुलूप लावलेलं आहे. परंतु आत जाण्यास काही अडचण येत नाही. किल्ल्याच्या आतमध्ये गोड्या पाण्याच्या विहिरी आणि चिकू, नारळ यांच्या बागा पाहायला मिळतील. या किल्ल्याच्या तटबंदीतून शत्रूवर गोळीबार केला जायचा. आजही ते झरोके याठिकाणी पाहता येतील. तटबंदीवरून बिनदिक्कतपणे फिरता येईल इतका सुरक्षित हा किल्ला आहे.

कसे पोहोचाल?

बोईसर या रेल्वे स्थानकावर उतरून किंवा एसटी स्टॅण्डवर उतरून या किल्ल्याकडे जाता येते.

शिरगाव किल्ला

वेगळ्या प्रकारची माडाची बने या किल्ल्यात पाहता येतील. हेच या किल्ल्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. सात पानं असलेली ही माडाची बनं इतरत्र कुठेही आढळत नाहीत. शिवाय किल्ल्याचे घुमटाकृती प्रवेशद्वार, आणि आतील रेखीव बांधकामही पाहण्यासारखे आहे. किल्ल्यावर पाण्याची व्यवस्था नसल्याने आपल्याजवळ मुबलक पाण्याचा साठा असणं गरजेचं आहे.

कसे पोहोचाल?

पश्चिम रेल्वे स्थानकाच्या पालघर या स्थानकावर उतरून तिथून शिरगावला जाण्याकरता बसची व्यवस्था आहे. 20 ते 25 मिनिटांचे अंतर पार करून या किल्ल्याजवळ पोहोचू शकतो.

केळवे माहिम

केळवे माहिम हा किल्ला पाणकोट व भुईकोट या दोन्ही प्रकारांमध्ये आहे. भुईकोट किल्ल्यात शितलाई देवीचं मंदिर आहे. येथून बीचवर सहजपणे जाता येतं. या किल्ल्याचा आकार स्टार म्हणजे चांदणीसारखा आहे. किल्लाच्या लगतच सुरूचं बन पसरल्यामुळे पर्यटकांची वर्दळ येथे मोठ्या प्रमाणावर असते. पोर्तुगिजांनी बांधलेला हा किल्ला उत्तम कलाकृतीचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनही ओळखला जातो. पाणकोट किल्ल्यात भरती ओहोटीची वेळ पाहूनच जावं लागतं. पानबुडीसारखा आकार असलेला हा किल्ला 75 फूट लांब व 40 फूट रूंद असून याची उंची 20 फुट आहे. बीचवर किल्ला असल्याने ओहोटीच्या वेळी किल्ल्यात आतमध्ये चालत जाता येतं. आतमध्ये गेल्यावर आठ झरोके पाहायला मिळतील. या झरोक्यामधून दांडा खाडीवर नजर ठेवली जायची. त्याकरता खास हा किल्ला बांधण्यात आला होता. दांडा खाडीलगत त्या काळात जवळपास 17 किल्ले होते आज त्यातील केवळ हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच किल्ले शिल्लक आहेत.

अर्नाळा

संपूर्ण नारळाच्या झाडांनी हे बेट व्यापलेलं आहे. बेटाच्या पश्चिम टोकावर किल्ला असल्याने भर वस्तीच्या बोळातून किल्ला गाठायचा.

अर्नाळा किल्ल्याचं भक्कम प्रवेशद्वार पाहून किल्ल्याच्या बांधकामाची कल्पना येते. या महाद्वारावर व्यास किंवा व्याघ्र आणि हत्ती यांची सुबक शिल्पं कोरलेली आहेत. समोरच्याच कमानीवर वेली-फुलांची बुट्टी आपल्याला खिळवून ठेवते. उत्तराभिमुख असलेल्या या प्रवेशद्वारावर देवनागरीमध्ये शके 1659 मधला शिलालेख लिहिलेला आहे. इथून आत गेल्यावर पहारेकऱ्यांच्या देवड्या दिसतात. उजव्या हातालाच साधारण दहा फुटांवर छोटी देवडी दिसते. ही देवडी थेट प्रवेशद्वारावरील तटरक्षकांच्या इथे मिळते. संरक्षणाच्या योजनेचा एक मोठा नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो.

मुख्य गडात प्रवेश केल्यावर समोरच प्रशस्त शेती दिसते. या आखीव शेतीमुळेच गडाचं रूप खुलून दिसतं. सरळ पुढे चालत गेल्यावर उजव्या हाताला कौलारू घरासारखा दर्गा आहे. तर डाव्या हाताने चालत गेल्यास पूवेच्या तटाजवळ त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या बाहेरच टुमदार वटवृक्ष असल्याने इथे थोडा वेळ बसून विश्रांती घ्यायला हरकत नाही. इथे समोर गोड्या पाण्याचा तलाव बांधून घेतलेला आहे. तर तटांवर उत्खननात सापडलेल्या गणेशाच्या मूतीर्ची स्थापना केलेली आहे. इथूनच मागे वळून तटाच्या आतील बाजूने तटांवर जाण्यास पायऱ्या आहेत. या पायऱ्यांनी तटांवरच्या फेरीस सुरूवात करायची. एकूण नऊ बुरूज असलेला आणि तीन प्रवेशद्वार असलेला हा किल्ला इतिहासात स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून आहे.

या जलदुर्गाची उभारणी गुजरातच्या सुलतानाने इ.स. 1516 मधे केली. पुढे 1530 मधे हा किल्ला पोर्तुगिजांनी आणि त्यानंतर 1737 मध्ये मराठ्यांनी जिंकला. या जलदुर्गाच्या रक्षणासाठी मराठ्यांनी दोन हजारी सैन्य गडावर ठेवलं होतं. असे दाखले इतिहासात सापडतात.

कसे पोहोचाल?

पश्चिम रेल्वेचं विरार रेल्वे स्टेशनवर जायचं. विरारपासून 14 किमीवर अर्नाळा कोळीवाडा आहे. तिथे बससेवा चांगली आहे. किंवा वसईहूनही अर्नाळ्याला जाण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसेस आहेत.

वसईचा किल्ला

चिमाजी आप्पांनी मिळवलेला वसईचा विजय ही घटना मराठ्यांनी भारतातून पोर्तुगीज सत्तेचे उच्चाटन करण्याचा जो संकल्प केला होता, त्यापैकी एक महत्त्वाचा टप्पा होय. म्हणूनच आजही या ऐतिहासिक प्रसंगाची आठवण भारतीयांच्या हृदयास तीव्रतेने जाऊन भिडते. समृद्ध अशी ऐतिहाससिक पार्श्वभूमी लाभलेला हा किल्ला व्यवस्थितपणे पाहण्यासाठी हातात किमान दोन दिवस हवेत. नाहीतर घाईघाईत हा किल्ला नीटपणे पाहता येणार नाही. वसई किल्ला जिंकल्यावर चिमाजी आप्पांनी किल्ल्यात 27 जुलै 1739 रोजी मारूतीच्या मूर्तीची स्थापना केली. इतकंच नव्हे तर चिमाजी आप्पांनी विजयासाठी वगोश्वरी देवीस नवस केला होता. त्याप्रमाणे विजय मिळाला. मग पेशवे बाळाजी बाजीराव यांनी वगोश्वरीचे देऊळ बांधले. त्याचबरोबर चिमाजी आप्पांचा पुतळा, वगोश्वरी देवीचं मंदिर, नागेश्वरी मंदिर, बाजारपेठ, तलाव, अनाथालय, भुयारं अशी नानाविध आकर्षणे या किल्ल्यावर असल्याने हे सर्व पाहण्यासाठी व अनुभवण्यासाठी गाठीशी किमान दोन दिवस हवेत.

डहाणू – बोर्डी बीच व महालक्ष्मी

डहाणू हे समुद्रकिनाऱ्याला लागूनच विस्तारलेले शहर आहे. डहाणू ते बोर्डी असा 17 किलोमीटरचा किनारा विस्तारला आहे. डहाणूला स्वच्छ, सुंदर व शांत समुद्रकिनारा लाभला आहे. मत्स्यव्यवसाय, फळे, भाज्या व चीकू यासाठी डहाणू प्रसिद्ध आहे. येथून जवळच डहाणूचा किल्ला आहे. डहाणूवरूनच आपण नरपडचा समुद्रकिनारा तसेच येथून 27 कि.मी. अंतरावर असलेल्या उंच डोंगरावरील श्री महालक्ष्मीचे जागृत स्थानही पाहू शकतो. डहाणूचीमहालक्ष्मी देशातल्या एकावन्न शक्तिपीठांपैकी एक आहे. डहाणू फळझाडांच्या रांगांनी सजलेले आहे. चिक्कूसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

महालक्ष्मीची यात्रा चैत्र महिन्याच्या पौर्णिमेपासून कृष्णपक्षातील अष्टमीपर्यंतमंदिराच्या सभोवती असलेल्या विशाल मैदानात भरते. डहाणू तालुक्यातील बोर्डीयेथे उदवाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ आहे. डहाणू रेल्वे स्थानकापासून 15 कि.मी. अंतरावर बोर्डी बीच आहे. हा अतिशय शांत व सुरक्षित बीच आहे. तसेच डहाणू आगर येथील केवडावंतीचे मंदिर व हनुमान मंदिर ही मंदिरे प्रसिद्धआहेत.

पालघर जिल्हयातील डहाणू-बोर्डीचे समुद्रकिनाऱ्यंना रेल्वे किंवा बसमार्गाने जातायेते. बोर्डी येथे एम.टी.डी.सी. चे निवासस्थाने उपलब्ध आहेत.

-मनीषा पिंगळे
जिल्हा माहिती अधिकारी, पालघर

रत्नागिरीतले नव्या स्वरुपातील मत्स्यालय बनले…फेव्हरेट टुरिस्ट डेस्टिनेशन

रत्नागिरी म्हटले की, डोळ्यासमोर येतो लांबच लांब भाट्ये आणि मांडवीचा सागरी किनारा… समुद्राच्या लाटा झेलत ताठपणाने उभा असलेला रत्नदुर्ग...देशभक्त लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान... स्वातंत्र्यवीर सावरकरांचे पदस्पर्श लाभलेले पतितपावन मंदीर... इंग्रज काळातील बंदिवान राजाची स्मृती जागविणारा थिबा पॅलेस... पर्यटकांना भुरळ घालणाऱ्या या यादीत आणखी एका नाविण्यपूर्ण ठिकाणाची भर पडली आहे ती म्हणजे दापोलीच्या डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाअंतर्गत असणाऱ्या सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या मत्स्यालय आणि संग्रहालयाची. गोड्या पाण्यातील व सागरी जीवनाची सफर घडविणारे हे ठिकाण आता फेव्हरेट टुरिस्ट डेस्टिनेशन ठरत आहे.

रत्नागिरीत सागरी जीवसृष्टीची ओळख करुन देणारे हे संग्रहालय यापूर्वीही कार्यरत होते. परंतु काही कारणास्तव त्याचे स्थलांतर झाल्याने आता रत्नागिरी शहरातील झाडगाव येथील नयनरम्य परिसरात ते नवीन वैशिष्ट्यांसह पुन्हा पर्यटकांच्या सेवेत कार्यरत झाले आहे. येथील मत्स्यालयात गोड्या व खाऱ्या पाण्यातील शोभिवंत मासे व पान वनस्पती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. गोडे पाणी विभागात 28 टाक्यांमध्ये अरोवाना, डिस्कस, कॅट फिश, टेट्रा, फ्लॅावर, सिल्व्हर शार्क आणि खारे पाणी विभागात 26 टाक्यांमध्ये मोनोअँजेल, केंड, बटरफ्लाय, लायन, निमो, गोबरा अशा विविध जातींचे मासे पाहायला मिळतात. गेल्या 50 वर्षांपासून जोपासलेली दोन जातीची समुद्री कासवेही मत्स्यालयाचे आकर्षण ठरत आहेत. तसेच 350 वेगवेगळ्या जातीची शास्त्रीय पद्धतीने रसायनामध्ये संग्रहीत मासे विद्यार्थी, संशोधकांसह पर्यटकांना सागरी जीवांची अधिक व्यापक पद्धतीने ओळख करुन देतात.

संग्रहालयातील 55 फुट लांब व 5 टन वजनाचा देवमाशाचा सांगाडा सागरी जीवांच्या भव्यतेची कल्पना पर्यटकांना करुन देतात. सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्य जीवनाची शास्त्रीय पद्धतीने ओळख करुन देणारे मत्स्यालय आणि संग्रहालय हे विद्यार्थी, संशोधक, शेतकऱ्यांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी महत्वाचे माध्यम ठरत आहे.
अवघ्या सात महिन्यात एक लाखाच्यावर पर्यटकांची भेट

मत्स्यालय आणि संग्रहालय नव्या स्वरुपात 11 डिसेंबर 2014 पासून कार्यरत झाल्यानंतर अवघ्या सात महिन्यातच महाराष्ट्रासह, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश येथील पर्यटकांचा ओघ याठिकाणी सुरू आहे. यामुळे गेल्या सात महिन्यात मत्स्यालयास भेट देणाऱ्या पर्यटकांचा आकडा एक लाखाच्यावर पोहोचला आहे.

पर्यटकांच्या वाढत्या ओघाबाबत बोलताना केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. हुकुमसिंह ढाकर सांगतात, पर्यटकांना याठिकाणी सागरी जीवनाबाबत शास्त्रीय माहिती सहज-सोप्या पद्धतीने सांगितली जाते. विविध शोभिवंत मासे, सागरी जीव यांच्या आकर्षक मांडणीमुळे मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. येत्या काळात पर्यटकांची संख्या वाढतच राहणार असून त्यांच्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

निसर्गरम्य सागरी किनारा लाभलेल्या रत्नागिरी शहरात सागरातील जीवसृष्टीची माहिती देणारे हे केंद्र स्थलांतरानंतर अधिक प्रेक्षणीय आणि ज्ञानवर्धक ठरले आहे. त्यामुळेच पर्यटकांची पावलेदेखील सहजपणे या ठिकाणाकडे वळत आहेत. चला मग येताय ना ... सागरी जीवनाची अद्भुतरम्य सफर करण्यासाठी.
-विजय कोळी
प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी.

वनडे टुरिझम डेस्टिनेशन; अमरावती

वनडे टुरिझम डेस्टिनेशन; अमरावती
पर्यटनासाठी शॉर्ट टर्म टुरिझम किंवा वन डे पिकनीक हा हल्लीचा ट्रेंड आहे. अमरावती हा पर्यटनासाठी प्रसिद्ध असा जिल्हा आहे. यामध्ये प्रामुख्याने मेळघाट, चिखलदरा याठिकाणी पर्यटक जाण्यासाठी उत्सुक असतात. परंतु या जिल्ह्यात अनेक अशी धार्मिक व प्रेक्षणीयस्थळे आहे जिथे एका दिवसात वनडे पिकनीक उत्तम करता येऊ शकते.
महानुभाव पंथाची काशी असलेल्या रिद्धपूर येथे सुमारे 175 स्थाने तसेच समाधीस्थळ असलेल्या या गावी महानुभाव पंथियाचे श्रद्धास्थान आहे.

दुसरे महत्वाचे आहे ते म्हणजे कौंडण्यपूर रुक्मिणी हरणाचा प्रसंग यादव काळात जो घडला तो येथेच. येथे विठ्ठल मंदीर असल्याने येथे आषाढी व कार्तिकेला मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला येतात. विदर्भाची पंढरी म्हणून ही कौंडण्यपूरला ओळखले जाते.

यासोबतच पेढी नदीकाठी असलेले भातकुली हे जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाते. वैराग्यमुर्ती गाडगेबाबा यांचा जन्म दर्यापूर तालुक्यातील शेंडगाव येथे झाला. ऋणमोचन या अमरावतीपासून जवळच्या गावी त्यांनी गोरगरिबांची सेवा केली. अपंगाना अन्नछत्र त्यांनी याच ठिकाणी दिले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव यावली व कार्यही गुरूकुंज मोझरी येथे भव्य प्रार्थना मंदीर व तुकडोजी महाराजांचे समाधीस्थळ येथेच आहे. त्याशिवाय महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर मोर्शी तालुक्यात उंच पहाडावर डोंगराच्या गुहेत 25 ते 30 फूट खोल स्वयंभू महादेवाचे लिंग आहे. ज्यावर पहाडातून सतत जलाभिषेक सुरू असतो.

तसेच गरम व थंड गंधकासारखा वास येणाऱ्या पाण्याचे कुंड असुन त्यात आंघोळ केल्याने त्वचारोग बरे होतात, अशीही भाविकांची श्रद्धा आहे… तर मग येताय न अमरावतीला.

-शैलजा वाघ-दांदळे,
अमरावती.

विश्वविख्यात कलामहर्षी केकी मूस

विश्वविख्यात कलामहर्षी केकी मूस
विश्वविख्यात छायाचित्रकार व चित्रकार कैकुश्री माणेकजी उर्फ केकी मूस यांचा जन्म मुंबईच्या मलबार हिल या उच्चभ्रू वस्तीत 2 ऑक्टोबर 1912 रोजी जन्म झाला. त्यांचे मामा हे सुप्रसिद्ध आर.सी. कन्स्ट्रक्शनचे मालक होते. ज्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस या रेल्वे स्टेशनची निर्मिती केली आहे.

लहानपणापासून कलेच्या प्रचंड आवडीमुळे केकी मूस यांनी ऐश्वर्याचे जीवन सोडून त्यांनी कलेचा मार्ग स्विकारला. मुंबईच्या विल्सन कॉलेजमधून कलेची पदवी आणि पुढे लंडनमधून उच्च शिक्षण घेतले. देशोदेशीच्या कला पाहिल्या. कलाकारांना भेटले. कलेलाच त्यांनी आपले जीवन समर्पित केले. मुंबई येथून ते चाळीसगाव, जि.जळगाव येथे आईच्या आग्रहाखातर 1938 मध्ये परतले. चाळीसगावात आल्यावर प्रथम त्यांनी चित्रे रंगवायला घेतली. केकी मूस यांनी उभे केलेले शेक्सपियर कॉटेज, जहाँगीर, नूरजहाँ, उमर खैय्याम, वादळवारा असे एकाहून एक सरस देखावे आजही पाहताना गुंतवून टाकतात. त्यांची टेबल टॉप फोटोग्राफी जगप्रसिद्ध आहे. स्थिरचित्रण फोटोग्राफी, व्यंगचित्र फोटोग्राफी आणि फेक्ड फोटोग्राफी अशा विविध प्रकारात केकी मूस यांनी कामे केली. त्यांच्या टेबल टॉप फोटोग्राफीच्या प्रकारातील छायाचित्रांना तीनशेहून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

आंतरराष्ट्रीय पातळीवर कीर्तिध्वज फडकवणारे छायाचित्रकार केकी मूस अर्थात बाबुजी हेमहान कलायोगी मुंबईहून चाळीसगावी परतल्यानंतर तब्बल 48 वर्षे एखादा अपवाद वगळता आपल्या घरातून बाहेरही पडले नाहीत. कलेसाठी संपूर्ण जीवन समर्पित करणाऱ्या या कलायोगीने आपल्या कलेच्या माध्यमातून कलासृष्टीची निमिर्ती आपल्या चाळीसगावच्या राहत्या घरातच केली. केकी मूस यांनी आयुष्यभर कला निमिर्तीशिवाय दुसरे काहीही केले नाही. मूस यांच्यात विश्वात जी कला आहे त्या साऱ्या शिकण्याची जिद्द होती. रंगकाम, चित्रकाम, रेखाचित्र, छायाचित्र, मूर्तीकला, कातरकाम, काष्ठशिल्प, ओरिगामी, सतारवादन अशा अनेक कलांमध्ये ते पारंगत होते.

आपल्या पाच दशकाच्या वास्तवात त्यांनी अनेक कलाकृतींची निमिर्ती केली. केवळ मीठ, भुसा, कापूस, वाळलेल्या काड्या यातून त्यांनी गोठवणारा हिवाळा उभा केला. त्या दृश्यावर धुरकट प्रकाश टाकला आणि छायाचित्र घेतले. हे छायाचित्र पाहिल्यानंतर देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू म्हणाले... ‘धिस इज माय नेटिव्ह प्लेस. मिस्टर मूस टेल मी व्हेन यू हॅव व्हिजिटेड काश्मीर’. पंडित नेहरू मूस यांच्या कलाकृती बघण्यासाठी ओढीने त्यांच्या कला दालनाला धावती भेट देण्यासाठी आले अन् कलाकृती पाहताना सर्व कार्यक्रम रद्द करीत दिवसभर रमले.

मूस यांनी त्यांच्या कला दालनाला भेट देणाऱ्या जवळपास प्रत्येक मान्यवरांचे त्यांनी एक आगळे छायाचित्र काढलेले आहे. त्यांच्या कला दालनाला ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे, समाजवादी नेते जयप्रकाश नारायण, शंकरराव देव, साने गुरुजी, पंडीत महादेव शास्त्री, महर्षी कर्वे, आचार्य अत्रे, ना.सी. फडके या दिग्गजांनी भेटी दिल्यात. मूस हे उत्कृष्ट सितारवादकही होते. त्यांना संगीताची व वाचनाची प्रचंड आवड होती. त्यांच्या कला दालनात जवळपास पाच हजार संगीताच्या ग्रामफोन्स तर चार हजार पर्यंत पुस्तकांचा संच आजही संग्रही ठेवण्यात आला आहे. विश्वविख्यात कलामहर्षी केकी मूस हेमान, सन्मान, पुरस्कार, प्रसिद्धी, पैसा या साऱ्यांपासून कायम दूर राहिले. त्यांनी प्रचंड मेहनतीने तयार केलेल्या शेकडो कलाकृती जतन करण्याचे काम कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान, चाळीसगाव करीत आहे. परंतु अपुरा निधी आणि संग्रहालयाच्या वास्तू जतनासाठी संस्थेला मोठ्या आर्थिक मदतीची गरज आहे. या कलाकृतींना उर्जितावस्था देण्यासाठी सर्व स्तरातून मदतीची अपेक्षा आहे.

कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान चाळीसगाव ही संस्था जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहराच्या रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूलगतच आहे. कलेची आवड असणाऱ्यांनी या कला दालनाला एकवेळ तरी नक्कीच भेट दिली पाहिजे.
-निलेश परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव. (मोबाईल 7588646750)

निसर्गरम्य ऐतिहासिक पाटणादेवी

निसर्गरम्य ऐतिहासिक पाटणादेवी
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावपासून 18 कि.मी. अंतरावर असलेले पाटणादेवी हे जागृत आदिशक्ती चंडिकादेवीचे बाराव्या शतकातील पुरातन मंदीर आहे. हे मंदीर सातमाळेच्या सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी उंच चौथऱ्यावर धवलतीर्थापासून उगम पावलेल्या डोंगरी नदीच्या किनारी आहे. जवळच असलेल्या पाटणा या लहान गावाच्या नावामुळे हे ठिकाण पाटणादेवी या नावाने ओळखले जाते.

मंदिराजवळचा परिसर अतिशय नयनरम्य आणि मनमोहक अशा निसर्ग सौंदर्याने बहरलेला आहे. तिन्ही बाजूने अर्धचंद्रकार सह्याद्री पर्वताचे उंच कडे, विविध वृक्ष, डोंगरातून खळखळ वाहणारे ओढे यामुळे मन मोहून जाते.

विशेषत: पावसाळ्यात ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये येथील वातावरण मनाला प्रसन्न करणारे शांत व आल्हाददायक असते. या दिवसात मंदिराच्या चौथऱ्यावरून मंदिराचा भोवतालचा परिसर म्हणजे वनराईने नटलेले पर्वताचे उंच कडे, रंगबिरंगी फुलाफळांनी बहरलेले वृक्ष, खळखळ वाहणारेओढे हेसर्व निसर्गरम्य दृश्य पाहताना मन निसर्गाशी एकरूप होवून जाते. अशा रमणीय ठिकाणाचा पूर्व इतिहास तितकाच ऐतिहासिक व महत्वाचा आहे. मंदिरात दोन गाभारे असून एका गाभाऱ्यात देवीची मुर्ती व दुसऱ्या गाभाऱ्यात शिवपार्वतीची मुर्ती आहे. या दोन गाभाऱ्यांमधील कक्षेत विष्णूची मुर्ती आहे. या परिसरात सापडलेल्या असंख्य मुर्ती व शिल्प हे येथे एका खोलीत ठेवण्यात आले आहे.

मंदिराच्या पूर्व दिशेला दोन कि.मी. डोंगर चढून गेल्यावर सुप्रसिद्ध पितळखोरे लेणी आहे. अजिंठा लेण्याच्या समकालीन ही लेणी असून अतिशय भव्य अशी आहे. या लेण्याजवळून वाहणारा पाण्याचा प्रवाह उंच कड्यावरून खाली कोसळतो. यामुळे देवी मंदिराच्या पूर्वेस उजव्या बाजूला मोठा धबधबा तयार होतो. त्याला धावलतीर्थ किंवा धारातीर्थ म्हणतात.

उंचावरून कोसळणाऱ्या धबधब्याखाली खडकात तयार झालेल्या खोलगट भांड्यासारख्या डोहातून पाण्याचे फवारे दूरवर उडतात आणि पर्यटकांना आल्हाददायक आनंद देऊन जातात. पाटणादेवी मंदिरापासून एक कि.मी. अंतरावर जुन्या पाटणा गावाचे अवशेष आहेत. हा परिसर पुराणवास्तू शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असून अतिप्राचीन सामुहिक ग्राम रचनेचे पुरावे याठिकाणी पहावयास मिळतात. याच परिसरातून आणखी एक वास्तुशिल्पीदृष्ट्या चांगले मंदीर आहे. त्याला हेमाडपंथी माहेश्वर मंदीर असे म्हणतात.

मंदिराचा गाभारा, अंतराळ, उघडा मंडप, मुख मंडप इ. भाग आहे. मंदिरातील मंडपात मोठा नंदी लक्ष वेधून घेतो. या मंदिराच्या मागील बाजूस जुन्या पाटणे गावाच्या दक्षिणेस एक पडका किल्ला आहे, त्यास बिज्जलगड असे म्हणतात. या गडाच्या उत्तर-पश्चिम बाजूस शृंगारचावडी नावाचे अतिप्राचीन दुर्मिळ असे लेणे आहे. त्यातील बहुतेक प्रतिमा शृंगारिक असून त्या खाली नक्षी पट्ट्या आहेत. शृंगारचावडी लेण्यांच्या शेजारी महेश्वर मंदिराकडे उतरताना सीता न्हाणी व नागार्जुन अशी दोन लेणी आहेत. या उंच प्रदेशातून उत्तरेकडे पसरलेल्या वनराजीचे दृश्य अतिशय विहंगम वाटते. निसर्ग सौंदर्याबरोबरच पुराण वास्तुशिल्पे, शून्याचा वेध घेणारे गणिततज्ज्ञ भास्कराचार्य यांचे गणितीपीठ बघताना पर्यटक वेळ-काळाचे भान विसरुन जातात.

आज मंदीर भारतीय पुरातन विभागाच्या निगराणीत आहे. येणाऱ्या भाविक, पर्यटक, अभ्यासकांसाठी वनखात्यामार्फत विश्रामगृहे व निसर्गवाचन केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे. तर चला जाऊया पाटणादेवीला…

-निलेश परदेशी,
चाळीसगाव, जि.जळगाव. (मो.नं.7588646750)

पर्यटकांचे आकर्षण : हाजराफॉल

पर्यटकांचे आकर्षण : हाजराफॉल
निसर्गाने मुक्त हस्ताने उधळण करुन गोंदिया जिल्ह्याला भरभरुन दिले आहे. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांमुळे अनेकांना रोजगार देखील मिळत आहे. जिल्ह्यातील सालेकसा हा मागास, दुर्गम, नक्षल प्रभावित, आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो. जंगलाने मोठ्या प्रमाणात व्यापलेला हा जिल्हा नैसर्गिकदृष्ट्या संपन्न आहे.

गोंदिया जिल्हा मुख्यालयापासून 52 किलोमीटर अंतरावर आणि छत्तीसगडच्या सीमेजवळील सालेकसा तालुक्यात असलेल्या ब्रिटीशकालीन हाजराफॉल धबधबा बघायला पावसाळा व हिवाळ्याच्या दिवसात पर्यटकांची मांदियाळी असते. सातपुडा पर्वतरांगेच्या कुशीत असलेल्या या धबधब्याला बघायला छत्तीसगड, मध्यप्रदेश राज्यासह विदर्भातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात.

सालेकसा-दरेकसा मार्गावरुन हाजराफॉलकडे वळतांना हिरवीगार वनराई, विविध जातीची असंख्य झाडे, औषधी गुणधर्म असलेली वृक्ष दिसून येतात. हाजराफॉलकडे जाण्यासाठी जिल्हा पर्यटन समितीने लावलेला दिशादर्शक हाजराफॉल सचित्र रेट्रो रिफ्लेक्टीव्ह फलक पर्यटकांना हाजराफॉलकडे जाण्यासाठी आकर्षिक करतो.

नवाटोला हे 667 लोकसंख्येचे गांव. गावातील 95 टक्के लोक आदिवासी असून ते गोंड जमातीचे आहेत. अल्पशिक्षीत असलेल्या काही आदिवासी युवक-युवतींना हाजराफॉलमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे. जिल्हा पर्यटन समितीच्या माध्यमातून हाजराफॉल परिसराचा विकास करण्यात येत आहे. नवाटोला संयुक्त वन व्यवस्थापन समिती हाजराफॉलच्या व्यवस्थापनाचे काम करीत असल्यामुळे नवाटोलाच्या जवळपास 25 ते 30 बेरोजगार युवक-युवतींना समितीने रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. या युवक-युवतींना पर्यटकांशी अतिथ्य, बुडत्या पर्यटकाला वाचविणे, हाजराफॉल परिसराची स्वच्छता राखण्याचे प्रशिक्षण दिले आहे. सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत ही युवा मंडळी पर्यटकांच्या सेवेत असते. हाजराफॉलकडे जाणाऱ्या मार्गावरील प्रवेशद्वारावर प्रत्येक पर्यटक व प्रत्येक वाहनाचे 10 रुपये प्रवेश शुल्क आकारण्यात येते. नवाटोला येथे सन 2012 मध्ये स्थापन करण्यात आलेली संयुक्त वन व्यवस्थापन समिती हाजराफॉलसाठी 17 ऑक्टोबर 2014 पासून सक्रीय झाली आहे. महिन्याकाठी सरासरी 50 ते 55 हजार रुपये उत्पन्न समितीला हाजराफॉलमुळे मिळत आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून हाजराफॉल येथे चहा कॅन्टीन, बुट्टा विक्री केंद्र, लाकडापासून तयार करण्यात आलेल्या साहित्याची विक्री केंद्र सुरु करण्यात आले आहे. पर्यटकांना बसण्यासाठी पर्यटक संकुल मचान, पर्यावरणपूरक बांबूपासून कचरा पेट्या तयार करण्यात आल्या आहेत. बायोटॉयलेटची सुविधा तेथे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

साहसी खेळासाठी बर्मा ब्रीज, मल्टीवाईन ब्रीज, व्हीसेफ ब्रीज, कमांडो नेट, हॅंगींग ब्रीज, सीसा बॅलन्स, झिकझॅक बॅलन्स तयार करण्यात आले आहे. यासाठी पर्यटकांकडून प्रती ब्रीज 10 रुपये शुल्क आकारण्यात येते. संयुक्त वन व्यवस्थापन समितीने जवळपास दिड लक्ष रुपये खर्च केले आहेत.

भविष्यात हाजराफॉल येथे चिल्ड्रेन पार्क, फुलपाखरु गार्डन, झीप लाईन, बोटींगची सुविधा, औषधीयुक्त वनस्पतीची लागवड, गौण वनोपजावर प्रक्रिया करुन विक्री, पर्यटकांना अल्पदरात भोजन, कचऱ्याचे वर्गीकरण करुन त्याचे व्यवस्थापन करणे, पिण्याच्या पाण्याची सुविधा तयार करण्यात येणार आहे.

नवाटोला येथील संयुक्त वन व्यवस्थापन समितीची सक्रियता आणि जिल्हा पर्यटन समितीकडून हाजराफॉलच्या विकासासाठी करण्यात येत असलेल्या कामामुळे पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नवाटोला येथील आदिवासी युवक-युवतींना पर्यटनातून रोजगार उपलब्ध झाला आहे. हाजराफॉल हे पर्यटनस्थळ ग्रीनव्हॅली म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

हाजराफॉल बघण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात अल्पोपहार किंवा भोजन करता यावे यासाठी मोबाईल कॅन्टीन जेएफएमच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे.

हाजराफॉल या पर्यटन स्थळाला 17 ऑक्टोबर 2014 ते 28 ऑक्टोबर 2015 या कालावधीत 64 हजार 761 पर्यटकांनी भेट दिली असून या पर्यटन स्थळापासून नवाटोला संयुक्त वनव्यवस्थापन समितीला 6 लाख 42 हजार 990 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 15 ऑगस्ट 2015 रोजी स्वातंत्र्य दिनी 3400 पर्यटकांनी भेट दिली. हाजराफॉलमुळे नवाटोला संयुक्त वनव्यवस्थापन समितीला उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध झाले आहे. नवाटोलातील काही बेरोजगार युवक-युवतींना काही महिन्यापुरता हाजराफॉलमुळे रोजगार उपलब्ध झाला आहे.
- जिल्हा माहिती अधिकारी, गोंदिया

सिंधुदुर्गात बहरला पर्यटन हंगाम !

सिंधुदुर्गात बहरला पर्यटन हंगाम !
दिवाळीच्या सुट्या आणि थंडीची चाहूल या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात पर्यटन हंगाम बहरला असून विशेषतः मालवण येथील स्कुबा डायव्हिंग आणि किल्ले दर्शनाच्या ओढीने दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ वाढत असल्याचे चित्र सध्या सिंधुदुर्गात दिसत आहे. 

गेल्या सहा सात दिवसात मालावांचा सागरी किनारा देशी-विदेशी पर्यटकांनी फुलून गेला असून या काळात पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे. बंदर विभागाच्या आकडेवारी नुसार दिवाळी सुटीच्या कालावधीत आतापर्यंत 20 हजार पर्यटकांनी सिंधुदुर्ग किल्ला भ्रमंती केली आहे. तर 1300 पेक्षा जास्त पर्यटकांनी स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेतला आहे. यातून शासन तिजोरीत कर स्वरूपात चार लाखाचा महसूल जमा झाला आहे.

1 मे 1981 रोजी स्थापन झालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पर्यटन हे मुख्य बलस्थान आहे. या जिल्ह्याची पर्यटनाची क्षमता लक्षात घेऊन शासनाने 30 एप्रिल 1997 साली हा जिल्हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित केला आहे. अशा स्वरूपाची शासकीय मान्यता असलेला सिंधुदुर्ग जिल्हा हा भारतातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला पर्यटन व्यवसायाच्या माध्यमातून स्थानिक रोजगार उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष गती दिली आहे. पर्यटन विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे मालवण येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग ट्रेनिंग सेंटर विकसित करण्यात आले आहे. या सुविधेमुळे पर्यटकांना समुद्रांतर्गत जीवसृष्टीचा स्नार्कलींग तसेच स्कुबा डायव्हिंग करून प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. पर्यटकांसाठी ही बाब पर्वणी ठरली असून त्यामुळे मालवण येथील स्कुबा डायव्हिंग हे देशी-विदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरले आहे. 

शासनाच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सेवा संस्थेला स्कुबा डायव्हिंगकरिता अधिकृत मान्यता देण्यात आली असून एक खिडकी योजनेखाली मालवणातील सर्व स्कुबा डायव्हिंग व्यावसायिक एकत्रित आले आहेत. स्कुबा डायव्हिंगसाठी संस्थेच्यावतीने एका पर्यटकामागे 1725 रुपये घेतले जातात. त्यानुसार या हंगामात गेल्या चार-पाच दिवसात सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन सेवा संस्थेचा जवळपास 23 लाख 30 हजार पेक्षा अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. याचा लाभ सर्व स्थानिक स्कुबा डायव्हिंग व्यावसायिकांना मिळणार आहे. 

दरम्यान सिंधुदुर्ग किल्ला दर्शनासाठी दि. 13 ते 17 नोव्हेंबर या कालावधीत 20 हजार 641 पर्यटकांनी भेट दिली असून त्यानुसार दि. 13 नोव्हेंबर रोजी 2899, दि. 14 नोव्हेंबर रोजी 4625, दि. 15 नोव्हेंबर रोजी 5185, दि. 16 नोव्हेंबर 4267 तर दि. 17 नोव्हेंबर रोजी 3665 पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत. किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक संघटनेच्यावतीने प्रती पर्यटक 53 रुपये घेतले जातात. त्यानुसार पर्यटक प्रवासी होडी वाहतुकीच्या व्यवसायातून स्थानिक व्यावसायिकांना गेल्या चार- पाच दिवसात 10 लाख 93 हजार पेक्षा अधिक रुपयांचा व्यवसाय झाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील देवबाग, तारकर्ली, तोंडवली, वेंगुर्ला, सागरेश्वर तसेच इतर सागरी किनारे त्याचबरोबर देवगड, विजयदुर्ग, रांगणागड या आणि यांसारखे इतर किल्ले, गड व पर्यटन स्थळांनाही मोठ्या प्रमाणात पर्यटक भेटी देत आहेत. एकूण सिंधुदुर्गात पर्यटन हंगामाला चांगली सुरूवात झाली असून त्या अनुषंगाने स्थानिक व्यावसायिकांना रोजगार उपलब्ध होत आहे. 

आर्थिक विकासाचे व रोजगाराचे प्रमुख साधन म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसायाचे महत्व लक्षात घेता गेल्या वर्षभरात ग्रामीण पर्यटन, सागरीय तटीय क्षेत्रांचा विकास, पर्यटन स्थळांचा विकास, दळणवळणाच्या सोयी या व यासारख्या पर्यटन व्यवसायाच्या इतर बाबींच्या विकासाकरिता केंद्र तसेच राज्य शासनाकडून पुरेशा निधीची तरतूद करण्यात आली आहे. तसेच पूरक योजनांच्या अंमलबजावणीकरीता व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. एकूणच जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी महाराष्ट्र शासन वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात यावर्षी चालू हंगामात पर्यटन व्यवसायाला मिळालेले हे समाधानकारक ओपनिंग म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विकासाच्या दिशेने पडलेले पाऊल म्हणावे लागेल. 

-अर्चना जगन्नाथ माने 
माहिती सहाय्यक, सिंधुदुर्ग.

निसर्गरम्य चिखलदरा



निसर्गरम्य चिखलदरा   भुगोलाच्या पुस्तकात विदर्भातील एकमात्र थंड हवेचे ठिकाण अशी ओळख असलेल्या “चिखलदरा”चे सौंदर्य चांगलेच बहरले आहे. उन्हाळ्यातही गारवा, नजर टाकावी तेथे विहंगम दृश्य, विविध प्रजातींची फुले-झाडे, हिरवा-गालिचा अन डोंगर दऱ्यातून जाणाऱ्या ढगांची मालिका पाहून कुणालाही वारंवार यावेसे वाटणाऱ्या चिखलदऱ्याच्या सौंदर्याची किमया ही न्यारीच आहे. विदर्भाचे नंदनवन म्हणून ओळख असलेले थंड हवेचे ठिकाण चिखलदऱ्याला आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नंदनवन म्हटल्यास वावगे ठरु नये. कारण महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख पर्यटन स्थळांना लाजवेल एवढी मनसोक्त निसर्ग सौंदर्याची उधळण चिखलदऱ्यात केली आहे. विदर्भाच्या नंदनवनात पर्यटकांची मांदियाळी
“चिखलदरा” चे सौंदर्य बहरले

ब्रिटीशांच्या राजवटीत उदयास आलेले चिखलदरा हे विदर्भातील एकमात्र थंड हवेचे ठिकाण आहे. हैद्राबाद फलठणीचा कॅप्टन रॉबिन्सन याने 1823 साली चिखलदरा या थंड हवेच्या ठिकाणाचा शोध लावला. खरंतर इंग्रजांनीच या स्थळाचा विकास घडवून आणला आणि आज चिखलदरा “पर्यटनस्थळ” म्हणून नावारुपास आले आहे. ब्रिटीशांबरोबर काम करणारे ख्रिश्चन मिशनरी आजही येथे कार्यरत आहेत. 1850 च्या सुमारास ब्रिटीशांनी येथील कारभार पाहण्यासाठी प्लॅटो फंड कमिटीची स्थापना केली आहे. मध्यप्रांत व बेरार राज्य असताना 1 ऑगस्ट 1948 साली चिखलदरा येथे गिरीस्थान नगरपरिषदेची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून खऱ्या अर्थाने विदर्भाचे नंदनवन चिखलदरा या नावाने सर्वदूर चिखलदऱ्याची ओळख झाली. समुद्र वनस्पतींनी नटलेल्या निसर्गसौंदर्याने बहरलेले चिखलदरा सातपुडा पर्वतरांगाच्या कुशीत वसले असले तरी पर्यटकांना भुरळ घालण्यात कुठलीही कसर सोडत नाही हे विशेष.

सातपुडाच्या शिखरावर चिखलदऱ्याचे पठार असून मोथा ते वैराटपर्यंत 25 ते 30 कि.मी. हा परिसर पसरलेला दिसतो. मात्र त्याची रुंदी 1 ते 5 किमी एवढीच आढळते. चिखलदरा शहराचे क्षेत्रफळ 394 हेक्टरच्या वर आहे. हे शहर दोन पातळ्यांमध्ये विभागले गेले आहे. समुद्रसपाटीपासून लोअर प्लॅटोची उंची 3 हजार 600 फूट तर अप्पर प्लॅटोची उंची 3 हजार 650 फूट इतकी आहे. चिखलदऱ्यातील हवामान थंड आणि आरोग्यदायी आहे.

चिखलदरा पर्यटननगरीत साधारणपणे 10-12 प्रेक्षणीय स्थळे आहेत. यातील सर्वात महत्त्‍चाचा पॉईंट म्हणजे सनसेट आहे. पण तो केवळ उन्हाळ्यात पहायला मिळतो. सद्य:स्थितीत भिमकुंड पर्यटकांना खुणावतो आहे. पंचबोल पॉईंटवर पाच वेळा आवाज ऐकू येत असल्याने पर्यटक या पॉईंटकडे धाव घेत आहेत. येथेच इतिहासाची साक्ष देणारा ऐतिहासिक गावीलगढ मोठ्या डौलाने उभा आहे. याशिवाय देवी पॉईंट, शक्कर तलावातील बोटींग, शासकीय वनउद्यान, आमझरी रोपवाटीका, जगाडोह येथील धबधबा, सेमाडोहची जंगल सफारी या शिवाय अनेक पॉईंट पाहण्या लायक आहेत. पावसात व्हॅली क्रासींग, रॉक क्लॉइंम्बिंग, वॉटर फॉल, रॅपलिंगची सोय वन विभागाने केल्यामुळे पर्यटकांचा उत्साह आणखी द्विगुणीत होऊ लागला आहे.

विदर्भातील पहिला व एकमेव पवनऊर्जा प्रकल्प मोथा येथे 13 मार्च 2003 रोजी कार्यान्वित झाला आहे. 2 मेगावॅट पवनऊर्जा निर्मितीची क्षमता असलेले दोन मोठे पंख पर्यटन नगरीत येण्यापूर्वीच पर्यटकांना आकर्षित करतात.
कसे पोहोचाल

चिखलदरा येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. एक सर्वाधिक जुना परतवाडावरुन घटांग - सलोना मार्गे (48 किमी) पर्यटकांचे एसटीबस आणि खाजगी गाड्या परतवाडा येथे उपलब्ध आहेत. तर दुसरा मार्ग म्हणजे परतवाड्यावरुन धामणगाव गढी - मोथा मार्गे (32 किमी) चिखलदऱ्यास जाता येते. शिवाय धारणीवरुन जायचे असल्यास सेमाडोह वरुनही येता येते.
राहण्याची व्यवस्था

या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग, विजवितरण कंपनी, जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जिल्हा सहकारी बँक, वनविभाग यांचे स्वतंत्र विश्रामगृह आहेत. शिवाय खाजगी होटेल, लॉज देखील मोठ्या संख्येने आहेत. जंगलात मुक्काम करायचे असेल तर आमझरी येथे वनविभागाने वन कुटीची निर्मिती केली आहे.
जवळचे रेल्वे स्थानक

जवळचे रेल्वे स्थानक बडनेरा असून चिखलदऱ्यापासून हे 130 किमी अंतरावर आहे. तर नागपूर हे दुसरे रेल्वे स्थानक असून त्यांचे अंतर 250 किमी एवढे आहे.

सुरेश काचावार,
जिल्हा माहिती अधिकारी, अमरावती

‘नशीबावर सोडलेल्या सांजवीला नव्या आयुष्याचे दान’

राजीव गांधी जीवनदायी योजनेतून यशस्वी हृदय शस्त्रक्रिया 

घरची परिस्थिती अगदीच बेताची. अशातच पहिल्याच मुलीला जन्मताच हृदयाचा आजार, शुद्ध- अशुद्ध रक्त वेगळे करणारा पडदाच हृदयाला नसल्यामुळे हृदयाकडून शरीराला अशुद्ध रक्ताचाच पुरवठा होत होता. त्यामुळे थोडं चाललं- बोललं तरी धाप लागायची. ओठ, हातापायाची नखं काळी-निळी पडायची. खाजगी डॉक्टरांनी ऑपरेशनचा खर्च तीन लाख रूपये सांगितला. पण एवढे पैसे नसल्यामुळे आई वडीलांनी तिला नशीबावर सोडून दिल होतं. अशावेळी राजीव गांधी जीवनदायी योजना सांजवीसाठी वरदान ठरली. या योजनेतून सांजवीवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आणि सांजवीला नव्या आयुष्याचे दान मिळाले.

भंडारा तालुक्यातील 5 किलोमीटरवर असलेल्या फुलमोगरा या गावी मनोज आणि अंजू बडगे हे कुटुंब राहतं. त्यांना दोन मुली व एक मुलगा. तीन भावंडामध्ये सांजवी सगळ्यात मोठी. ती अडीच वर्षाची असताना तिला खूप ताप आला. त्यावेळी तिला नागपुरला सुपर स्पेशालिटीला दाखल केले, तेव्हा डॉक्टरांनी तिला हृदयाला छिद्र असल्याचे निदान केले. ऑपरेशन शिवाय हा आजार बरा होऊ शकत नाही त्यामुळे ऑपरेशन करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण बागडे कुटूंबियांची आर्थिक परिस्थिती अगदीच खराब होती. त्यामुळे तिचे ऑपरेशन पैशांअभावी होऊ शकले नाही.

सांजवी मोठी व्हायला लागली तसा तिचा त्रास वाढत होता. 10 पावलं चालली तरी तिचा श्वास भरून यायचा. ओठ, हाता-पायाची नखं निळी पडायची. शाळेत नाव घातलं पण मध्येच शाळेतील शिक्षक तिला घरी आणून सोडायचे. तिची अभ्यासातील प्रगतीही त्यामुळे जेमतेमच होती. सतत आजारी पडायची. अशाच अवस्थेत सांजवी 9 वर्षाची झाली.

ऑगस्ट 2013 मध्ये राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत शाळेतील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये सांजवीला हृदयाचा आजार असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात आले. नेमकी काय समस्या आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांनी सांजवीच्या आईवडिलांना तिच्या सगळ्या तपासण्या करण्यास सांगितले. इको तपासणीत तिच्या हृदयाला छिद्र असल्याचे लक्षात आले. डॉ. वासनिक आणि डॉ. मेश्राम यांनी राजीव गांधी जीवनदायी योजनेतून तिचे ऑपरेशन करून घेण्यासाठी सांजवीच्या आर्इवडिलांकडे पाठपुरावा केला. वर्धा जिल्ह्यातील सावंगी येथील विनोबा भावे रूग्णालयात ऑगस्ट 2015 मध्ये सांजवीवर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. पैशांशिवाय राजीव गांधी जीवनदायी योजनेतून सांजवीला जीवनदान मिळाले. आज ती स्वस्थ जीवन जगत आहे.

आम्ही नशिबावर सोडून दिलेल्या सांजवीच्या जगण्यात राजीव गांधी जीवनदायी योजनेनं नवीन प्राण ओतला. आज सांजवी हसत खेळत शाळेत जाताना पाहून तिच्या भविष्याची चिंता मिटली. अशी प्रतिक्रिया सांजवीची आई अंजू बडगे यांनी व्यक्त केली.

-मनीषा सावळे
जिल्हा माहिती अधिकारी, भंडारा
 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India