पाणलोट विकासाचा ‘लामकानी’ पॅटर्न

धुळे तालुक्यातील बुराई नदीच्या पाणलोट क्षेत्रातील जवळपास आठ ते दहा हजार लोकवस्तीचे लामकानी हे गाव. गावाला लागून असलेला डोंगर वृक्षतोड आणि चराई यामुळे उद्ध्वस्त झालेला. कुठेतरी तग धरून असलेली खुरटी हिवराची व बाभळाची झाडं आणि ७००-८०० फुटांपर्यंत गेलेली भूजल पातळी अशा परिस्थितीत डॉ. धनंजय नेवाडकर यांनी भगीरथ प्रयत्न करून पाणलोट विकास कार्यक्रम राबवला. त्यांच्या या उपक्रमाविषयी... 

अवघ्या चार तालुक्यांचा धुळे जिल्हा. त्यात शिरपूर वगळता धुळे, साक्री, शिंदखेडा हे तीन तालुके कायम अवर्षणप्रवण. या तीन तालुक्यांत धुळे तालुका अग्रभागी. धुळे तालुक्यातील ज्या परिसरास दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो त्या बुराई नदीच्या पाणलोट क्षेत्रातील लामकानी हे गाव. धुळ्याच्या पश्चिमेस ३५ किमी अंतरावर. आठ ते दहा हजार लोकवस्तीच्या लामकानीची बाजारपेठेचे गाव अशीही ओळख आहे. गावाला लागून असलेला डोंगर वृक्षतोड आणि चराई यामुळे संपूर्ण उद्ध्वस्त झालेला. मुरूम, दगड आणि खडकांशिवाय मातीचा लवलेश नसलेला. कुठेतरी तग धरून असलेली खुरटी हिवराची व बाभळाची झाडं ! पावसाळ्याच्या सुरुवातीला काही दिवस दिसणाऱ्या लोधडी व कुसळ गवतांच्या काड्या, ज्या नंतर शेळ्या-मेंढ्यांच्या भक्ष्यस्थानी पडायच्या. डोंगरमाथ्याची स्थिती अशी. भूगर्भाची यापेक्षाही वाईट अवस्था. ९० च्या दशकात भूगर्भातील पातळी खालावत गेली व ९७-९८ या दोन वर्षांत कूपनलिकांद्वारे अमर्याद उपसा झाला. ग्रामस्थांनी ७००-८०० फूट खोलीपर्यंत जाऊन उपसा सुरू केला. गावात अशा सुमारे २०० कूपनलिका झाल्या आहेत. त्यापैकी ५० टक्के कूपनलिका पुढील वर्षी कोरड्या पडल्या. दुष्काळ- कर्ज- दुष्काळ असे आवर्तन सुरू झाले.

यावर एका निष्णात पॅथॉलॉजिस्टच्या भूमिकेतून मानवी आरोग्याचे मर्म अचूक जाणणाऱ्या डॉ.धनंजय नेवाडकर यांनी सुमारे १५ वर्षांपूर्वी एक निदान केले होते. अर्थात, हे निदान एरवी लॅबमध्ये चेहऱ्यावर असंख्य ताणतणावांचं जाळं घेऊन येणाऱ्या पेशंटसंदर्भात नव्हते. तर, अवर्षणप्रवणतेच्या विळख्यातून 'लामकानी' या आपल्या जन्मभूमीस मुक्त करण्यासंदर्भातचे ते अतिशय मूलगामी स्वरूपाचे निदान होते. डॉ. नेवाडकर केवळ निदान करून थांबले नाहीत. पिढ्यानपिढ्या परिसरास जडलेली अवर्षणप्रवणतेची दुर्धर व्याधी मुळासकट दूर करण्याचा दृढ संकल्पच त्यांनी केला. 'इच्छा तिथे मार्ग' या उक्तीचे प्रत्यंतरही आले. राळेगणसिद्धी आणि हिवरे बाजाराच्या धर्तीवर पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्याचा सल्ला प्रत्यक्ष जलतज्ज्ञ डॉ.माधवराव चितळे यांच्याकडून मिळाला. त्यानंतर डॉ. नेवाडकर यांचे 'ऑपरेशन लामकानी' सुरू झाले. 

डॉ. नेवाडकर यांनी बारा वर्षे नियोजनबद्धरीतीने केलेल्या अथक परिश्रमाचे परिणाम समोर आले आहेत. अमर्याद वृक्षतोड आणि अनियंत्रित चराई यामुळे काही वर्षांपूर्वी उघडे बोडके दिसणारे माळरान आता हिरवाई लेऊन वसलेले दिसते. ७००-८०० फुटांपर्यंत गेलेली भूजल पातळी आश्चर्यकारकरित्या वर आली आहे. त्यामुळे बागायतदार शेतकऱ्यांची संख्या वाढली. टंचाईच्या काळात हमखास चारा मिळण्याचे ठिकाण असा लौकिकही 'लामकानी' ने मिळविला. खरेतर याला प्रभावी पाणलोट विकास कार्यक्रमाचे बायप्रॉडक्ट म्हणता येईल. लामकानीच्या या यशोगाथेचे प्रमुख यश आहे, ते त्याची दुष्काळग्रस्त भाग ही ओळख पुसण्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येणं, सहमतीने निर्णय घेणं आणि निर्णयांची अमलबजावणी एक दिलानं करणं. गट-तट, जाती उपजातींच्या अस्मिता दिवसेंदिवस प्रबळ होत असताना दुबळ्या होत चालेल्या ग्रामीण माणसास लामकानीची कहाणी प्रेरणादायी ठरू शकते. 

डॉ. धनंजय विष्णू नेवाडकर धुळ्यातील नामांकित पॅथॉलॉजिस्ट. मूळचे लामकानीचे रहिवासी. सप्टेंबर २००० मध्ये झालेल्या एका भीषण अपघातातून सुदैवाने बचावले. त्याकाळात तीन महिने सक्तीची विश्रांती डॉ.नेवाडकरांना घ्यावी लागली. त्यावेळी प्रेमापोटी भेटायला येणाऱ्या लामकानीवासींच्या गप्पा दुष्काळ, आटलेल्या विहिरी, मान टाकलेल्या कूपनलिका या मुद्यांभोवती गुंफलेल्या असत. परमेश्वराने अपघातातून बालंबाल वाचविले. एक संधी दिली आहे, गावाच्या समस्येवर काही ठोस उपाययोजना करता येईल का? उर्वरित आयुष्यात गावासाठी चिरंतन असे काम करायचेच, असा निर्धार डॉ.नेवाडकरांनी केला. त्याच काळात पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराची यशोगाथा वाचनात आली. जवळपास समस्या सारखीच. फरक होता तो लोकसंख्येचा. लाकमानीची लोकसंख्या आठ ते दहा हजार. शिवाराचे क्षेत्र मोठे. शिवाय राजकीय गटतट, जातीपातीचं राजकारण आणि अन्य राजकीय संवेदशीलता हा मसाला ठासून भरलेला. 

मार्गदर्शनासाठी पहिलेच पत्र प्रसिद्ध जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळेंना पाठविले. गावाची भौगोलिक परिस्थिती बघता, पाणलोट विकास कार्यक्रम राळेगणसिद्धी व हिवरे बाजारच्या धर्तीवर करा, हा सल्ला मिळाला. जानेवारी २००१ मध्ये काठी टेकतच डॉ.नेवाडकरांनी पोपटराव पवारांच्या हिवरे बाजाराला भेट दिली. फेब्रुवारी २००१ पासून दर रविवारी लामकानी भेटीचा धडाका सुरू झाला. प्रथम स्थानिक डॉक्टर मित्र, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, शिक्षक यांच्याशी प्राथमिक चर्चा केली. हिवरे बाजारची व्हीडिओ कॅसेट दाखविली. हा कार्यक्रम पुढे गावाच्या चौकाचौकात सभा घेऊन सुरू झाला. सुरुवातीला प्रतिसाद यथा-तथाच. श्रमदान, चराईबंदी, कुऱ्हाडबंदी हे नियम पाळावे लागतील हे सांगितल्यावर, डॉक्टर रिकामटेकडे उद्योग करून आमचा व तुमचा अमूल्य वेळ कशाला वाया घालविता? गावात तंटे कशाला लावता? असे सल्ले ऐकण्यातच पहिले वर्ष संपले. 

कामांचा प्रत्यक्ष अनुभव तसेच कुठलेही पद वा संस्था नसताना हे प्रत्यक्षात करायचे कसे, हा प्रश्न होताच. पुढे माथा ते पायथा तत्त्वानुसार काम करायचे ठरले. गावाचा डोंगर उतार पूर्व-पश्चिम जवळ-जवळ तीन किलोमीटर पसरलेला. हे सुमारे ४०० हेक्टर क्षेत्र वनविभागाच्या ताब्यात आहे. वन विभागात चकरा सुरू झाल्या. 'प्रथम काही क्षेत्रात चराईबंदी व श्रमदानाने फुटलेला बांध दुरुस्त करून दाखवा ', हे आव्हान तत्कालीन फॉरेस्ट अधिकारी व्ही.जे. पाटील यांनी दिले. तोपर्यंत ग्रामस्थांची बऱ्यापैकी मानसिक तयारी झाली होती. २००२ च्या एप्रिल-मे महिन्यात श्रमदान सुरू झाले. दिवसा उन्हाचा तडाखा असल्यामुळे रात्री बत्त्या, कंदील, इमर्जन्सी लॅम्प लावून गावातील तरुण, बुजूर्ग मंडळी कामाला लागली. प्रारंभी ५० हेक्टर क्षेत्रात चराईबंदी, कुऱ्हाडबंदी पालनाचे ग्रामसभेत ठरले. त्यासाठी वनसंरक्षण व वनव्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली. वन विभागाने आश्वासन दिल्याप्रमाणे सन २००२ च्या पावसाळ्यानंतर सलग समतल चरांचे (सीसीटी) काम प्रत्यक्ष सुरू केले. सन २००७ पर्यंत रोहयो आणि श्रमदान या माध्यमातून एकूण ३०० हेक्टर डोंगर उतारावरील जल/ मृदा संधारण काम पूर्ण करण्यात आले. त्याच भागात चराई/ कुऱ्हाडबंदीचे पालन होत गेले. चराईबंदीचा निर्णय सुखासुखी अमलात आला नाही. त्यातून अनेक तंटे उद्भवले. डॉक्टर नेवाडकर आणि लामकानीवासींयाना पोलिस ठाण्यापर्यंत चकरा माराव्या लागल्या. नियम मोडणाऱ्यांकडून दंडापोटी एक लाख रुपये वसूलही करण्यात आले. चराईसाठी विशिष्ट भाग मोकळा ठेवण्यात आला आहे. जसे काम होत गेले व त्याचे दृश्य परिणाम दिसत गेले. तसा लोकांचा सहभाग वाढत गेला. सहसा रोहयोच्या कामाच्या दर्जाबद्दल चांगले बोलले जात नाही. मात्र लामकानीच्या डोंगरउतारावर झालेली कामे यास अपवाद ठरावीत. या चळवळीस वेळोवेळी वैचारिक अधिष्ठान देण्याचं महत्त्वपूर्ण काम वर्तमान जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ, वृक्षमित्र वसंतराव ठाकरे, डॉ.माधवराव चितळे, वॉटर संस्थेचे फदार बाकर, अरुण निकम, वन अधिकारी सुरेश थोरात, वसंतराव टाकळकर, सर्वेश्वकुमार निगम, तत्कालीन जिल्हाधिकारी भास्कर मुंडे या मंडळींनी केलं. 

या प्रयोगांमुळे एकेकाळच्या खडकाळ डोंगरांवर अतिशय दाट स्वरूपाचे पवन्या गवत डोलताना दिसते. परिसरातील २०-२५ गावचे दुग्ध व्यावसायिक हे गवत कापून नेतात. पूर्वी वर्षानुवर्षे खुरटलेल्या अवस्थेत असलेल्या हिवर, बाभळाच्या झाडाझुडपांनी आता चांगलीच वाढ धरली आहे. दरवर्षी केलेल्या बी रोपणाने हजारो नवीन रोपटी तयार झाली आहेत. याशिवाय या परिसरात नवनवीन पक्ष्यांच्या संख्येतही वाढ झाली आहे. पाखरांची वाढलेली संख्या कीटकनाशकांचा कमी वापर करण्यास कारणीभूत ठरली आहे. बंद पडलेल्या कूपनलिका सुरू झाल्या. अस्तंगत झालेली बागायती शेती ही संकल्पना पुन्हा मूळ धरू लागली आहे. जलसंधारणाच्या कामातून एवढ्या मोठ्या लोकसंख्येस दुष्काळचक्रातून बाहेर काढण्याचा लामकानीचा प्रयोग आणि नि:स्वार्थ भावनेतून या प्रयोगाची अंमलबजावणी करणारे डॉ.धनंजय नेवाडकर कौतुकापेक्षा अनुकरणास पात्र आहेत. 

-रणजित राजपूत
जिल्हा माहिती अधिकारी, धुळे

0 comments:

Post a Comment

 

© Copyright PPPMS . All Rights Reserved.

Designed by Avim and sponsored by PPPMS India